सलग पाचव्यांदा विधानपरिषदेवर निवड; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पत्रकारांशी स्नेहसंवाद
आगामी काळात विद्यार्थी, महिला सुरक्षा, सुशासन यांबाबत प्रभावी काम करण्याचा संकल्प
पुणे- शिवसेना नेत्या आणिआमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच १४ मे रोजी सलग पाचव्यांदा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी सदिच्छा संवाद साधण्यासाठी तसेच स्नेहबंध अधिक दृढ करण्यासाठी विशेष अनौपचारिक भेट व चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, २००२ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला प्रथम विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर, २००८, २०१४,२०२० व आज २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची जबाबदारी मला दिली आहे. २००२ ते २०२६ या सलग कालावधीत सातत्याने विधान परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी शिवसेना पक्षाची अत्यंत ऋणी असल्याचे सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीचा आढावा घेताना विशेष हक्क समिती प्रमुख म्हणून केलेले काम, विविध समित्यांमधील जबाबदाऱ्या, देवस्थानांच्या प्रश्नांवर केलेले कार्य, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी घेतलेले पुढाकार तसेच महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नांवर सभागृहात सातत्याने आवाज उठवल्याचा उल्लेख केला. लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारात पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडल्याचे सांगताना त्यांनी बारा वर्षे प्रवक्त्या आणि पाच वेळा लोकसभा, पाच वेळा विधानसभा व पाचवेळा मनपा निवडणुकीत असे १५ निवडणुकात स्टार प्रचारक म्हणूनही कार्य केल्याचे नमूद केले.२००५ निवडणुकीत शिवसेना भाजपा वचननामा समिती व २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीच्या प. महाराष्ट्र समन्वय युतीच्या समन्वयक म्हणून कै. गिरीश बापट यांच्या सोबत काम केले होते,
“२०१९ ते २०२६ या कालावधीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यातील दोन वर्षे सभापतीपद रिक्त असल्याने ती अतिरिक्त जबाबदारीही पार पाडली. या सर्व कामाची दखल घेत पक्षाने पुन्हा एकदा विधान परिषद सदस्यपदाची संधी दिली,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
आगामी काळात विद्यार्थी, महिला सुरक्षा, सुशासन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आगामी काळात निश्चितच सार्थ ठरवेन,” असे सांगत त्यांनी शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

