एक बैठक अन् संपूर्ण महापालिका यंत्रणा लागली कामाला, अवघ्या काही तासांत पालखी विठोबा मंदिर परिसरातील खासगी जागेचे अधिग्रहण
महापालिकेकडून नाना पेठेत अवघ्या काही तासांत जागेचे अधिग्रहण; वारकऱ्यांसाठी वाढणार सुविधा
पुणे (दि ४): विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ९ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर परिसरात दरवर्षी लाखो वारकरी विसाव्यासाठी येत असल्याने जागेची कमतरता जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने तातडीने हालचाली करत नाना पेठेतील दिवेकर कुटुंबाची जागा अवघ्या काही तासांत अधिग्रहित करून मोकळी केली आहे. यापूर्वीच बाजूच्या दोन मिळकतींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून आणखीन एक जागा पालिकेकडे आल्याने यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त प्रशांत ठोंबरे, उपआयुक्त निखिल मोरे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप महाराज, आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य लोंढे महाराज तसेच संबंधित जागामालक व भाडेकरू उपस्थित होते.
बैठकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित जागेचे अधिग्रहण पूर्ण केले. त्यानंतर गणेश बिडकर यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. रात्रीच पाडकाम करून संपूर्ण जागा मोकळी करण्यात आली. त्यामुळे पालखी विठोबा मंदिर परिसर अधिक प्रशस्त झाला असून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजनाला मोठी मदत मिळणार आहे.
सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया…
“वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भक्ती परंपरेचे प्रतीक आहेत. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात, ही महापालिकेची जबाबदारी आहे. जागेच्या कमतरतेची समस्या लक्षात घेऊन प्रशासन, देवस्थान आणि संबंधित जागामालक यांच्या सहकार्याने अत्यंत कमी वेळात हा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.”

