Home Blog Page 43

रेल्वेने अहमदाबाद आणि रतलाम विभागांसाठी 398.36 कोटी रुपये खर्चाच्या ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रकल्पाला दिली मंजुरी

नवी दिल्‍ली-

भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील दळणवळण विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एका महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामध्ये अहमदाबाद आणि रतलाम विभागांमध्ये 398.36 कोटी रुपये खर्चून 4×48 ऑप्टिकल फायबर केबल (OFC) बॅकबोन टाकण्याची  तरतूद आहे.

हा प्रकल्प “भारतीय रेल्वेच्या उर्वरित मार्गांवर लाँग टर्म इव्होल्यूशन (LTE) च्या कम्युनिकेशन बॅकबोनसह कवच प्रणालीची  तरतूद (समग्र योजना  2024–25)” या शीर्षकांतर्गत मंजूर करण्यात आला आहे, ज्यासाठी कृती कार्यक्रम 2024–25 (PH-33) अंतर्गत एकूण मंजूर खर्च 27,693 कोटी रुपये  आहे. पश्चिम रेल्वेसाठी 2,800 कोटी रुपये  खर्चासह एक विशिष्ट छोटा प्रकल्प  देखील मंजूर करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मंजूर कामाचा भाग म्हणून, पश्चिम रेल्वेवर 1929 रूट किलोमीटर (RKm) मार्गावर 2×48 फायबर ओएफसी केबल्स टाकण्यात येतील. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

  • अहमदाबाद विभागात 1456 रूट किलोमीटर
  • रतलाम विभागात 473 रूट किलोमीटर

दळणवळण प्रणालीच्या या महत्त्वपूर्ण विस्तारामुळे रेल्वेच्या दळणवळण प्रणालीची क्षमता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता वाढेल. यामुळे ‘कवच’च्या अंमलबजावणीसह आधुनिक सिग्नलिंग प्रणालीलाही मदत  मिळेल, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्कवर निर्बाध डेटा प्रसारण शक्य होईल.

हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण, सुरक्षा वृद्धी आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यामुळे परिचालन कार्यक्षमता सुधारेल आणि प्रवासी तसेच माल वाहतुकीसाठी उत्तम सेवा प्रदान केल्या जातील.

 निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या

4 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी एकूण 1,955 उमेदवार रिंगणात

नवी दिल्‍ली-

  1. निवडणूक आयोगाने 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तसेच गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा येथील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
  2. 9 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुका तसेच 4 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी एकूण 1,955 उमेदवार रिंगणात आहेत.
  3. पश्चिम बंगाल (पहिला व दुसरा टप्पा) आणि तामिळनाडू येथील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) साठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल असून पश्चिम बंगाल (दुसरा टप्पा) साठी 13 एप्रिल आहे.
  4. नागरिकांना ईसीआयनेटमधील “Know Your Candidates ” केवायसी मॉड्युलद्वारे उमेदवारांविषयीची माहिती, गुन्हेगारी प्रकरणे, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वर मिळू शकते.
  5. वापरकर्ते ईसीआयनेटमधील “Conduct of Elections” या टॅबखालील केवायसी मॉड्युल वापरू शकतात. तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्राची (फॉर्म 26) संपूर्ण प्रत डाउनलोड करता येते.
  6. ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा प्लॅटफॉर्म असून, भारताच्या निवडणूक आयोगाच्या 40 पेक्षा अधिक अ‍ॅप्स व पोर्टल्स एकत्रित करून सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते.
  7. ईसीआयनेटद्वारे मतदारांना मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्ज स्थिती तपासणी, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, बीएलओशी संवादासाठी कॉल बुकिंग, ई-ईपिक डाउनलोड, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
  8. याशिवाय, नियमभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी सी विजिल आणि दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा सुनिश्चित करण्यासाठी सक्षम यांसारखी साधनेही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी पुण्यातील एफटीआयआय, एनएफडीसी-एनएफएआय आणि दूरदर्शन केंद्र येथे भेट दिली

पुणे-

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) आणि दूरदर्शन केंद्र या संस्थांना भेट दिली. 1 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर  या संस्थांना त्यांनी प्रथमच भेट दिली.

या भेटीदरम्यान कुमार यांनी एफटीआयआयच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि परिसराची व्यापक पाहणी केली. एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक  प्रकाश मगदूम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी एफटीआयआयमधील नवीन थिएटर संकुल, कॅमेरा स्टोअर, ग्रंथालय, शैक्षणिक विभाग आणि स्टुडिओ यांसारख्या प्रमुख सुविधांना भेट दिली. वरिष्ठ प्राध्यापकांनी त्यांना संस्थेची अत्याधुनिक उपकरणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली.

या प्रसंगी चंचल कुमार यांनी विविध व्यासपीठांवर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर करण्यात चित्रपट आणि डिजिटल मीडिया शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि एफटीआयआयसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी व्यापक भूमिका बजावावी असे आवाहन केले.

अशा संस्थांनी युवा प्रतिभेला केवळ दर्जेदार चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीसाठीच नव्हे, तर चित्रपट आणि माध्यम उद्योगातील उद्योजकतेसाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांनी पुढे नमूद केले.

या भेटीला विशेष महत्त्व आहे, कारण एफटीआयआय, पुणेने अलीकडेच विद्यापीठ म्हणून नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे, ज्याचा उद्देश शैक्षणिक संधींचा विस्तार करणे आणि विकसित होत असलेल्या माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सहभाग अधिक वाढवणे हा आहे.

सचिवांनी पुण्यातील एनएफडीसी-एनएफएआयच्या संकुलांनाही भेट दिली. त्यांनी प्रोजेक्शन रूम, थिएटर, व्हॉल्ट आणि ग्रंथालयाची पाहणी केली, तसेच दुसऱ्या टप्प्यातील सुविधेलाही भेट दिली, ज्याठिकाणी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत डिजिटायझेशनचे काम सध्या सुरू आहे.

दूरदर्शन केंद्र, पुणे येथे त्यांनी केंद्राच्या कामकाजाचा आणि कार्यक्रम निर्मिती सुविधांचा आढावा घेतला, तसेच आशय निर्मिती आणि प्रसारासंदर्भात अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

‘गुरू-देव स्वरोत्सवा’तून श्रद्धा, भक्तीचे सुरेल दर्शन

पुणे : पंडित गजानन बुवा जोशी व पंडित भालचंद्र देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रसिद्ध व्हायोलिन वादक चारुशीला गोसावी यांच्या संकल्पनेतून ‘गुरू-देव स्वरोत्सवा’चे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चारुशीला गोसावी यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग मियाँ मल्हारने केली. शांत, संयमी परंतु बहारदार वादनातून रसिकांना मोहित करत त्यांनी तीन तालातील एक चीज ऐकविली. त्यानंतर व्हायोलीनमधून उमटणाऱ्या आर्त स्वरातून ‘याद पिया की आये’ ही ठुमरी नजाकतीने सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना मोहन पारसनीस यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि गुरू डॉ. विकास कशाळकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात पंडित गजानन बुवांच्या आवडत्या छायानट या रागाने केली. ‘गरवा कैसे’, ‘मलानिया गुंद लाओ री’, ‘पिया बन जा’ या आग्रा घराण्यातील रचना ऐकवून ‘बिगीबेगी आओ सैया’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. तानांमधील वैविध्य, दमदार गायकी आणि रागातील बारकावे दर्शविणाऱ्या सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. कशाळकर यांनी दुर्मिळ रागातील बंदिश तसेच ‘करन मोरी लागी कलाई’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता तराण्याने केली. त्यांना परिमल कोल्हटकर (स्वरसाथ), दिपीन दास (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने मैफलीत रंग भरले.  आनंद देशमुख यांच्या निवेदनाचा जागतिक स्तरावर सन्मान झाल्याने त्यांचा चारुशीला गोसावी व राजय गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सनई वादक शैलेश भागवत, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, वृद्धी रिॲलिटीचे अमोल शहा, माधव मोडक, रत्नाकर गोखले उपस्थित होते.

सिमेंटचा रस्ता हे 1997 सालचं फॅड,अन गल्लीबोळ ही कॉंक्रीटच्या जाळ्यात,अभूतपूर्व विरोध होऊनही फॅड मानगुटीवर

पुणे- अमेरीकेत सुध्दा सर्वत्र डांबरीकरणाचाच उपयोग होतो.मग उष्णता वाढविणारे , भूजल पातळीवर परिणाम करणारे रस्त्यांच्या कॉंक्रीटीकारणाचा हट्ट का ? कशासाठी ? पुणं गेलं खड्ड्यात … अशी आरोळी मारून रस्तोरास्तीचे खड्डे डांबरीकरणाच्या माथी मारून कॉंक्रीटीकारणाचे हे फॅड 1997 साली आणलं गेलं . पूर्वीही पूर येत होता पण तो नदीला येत होता , पाटील इस्टेट झोपडपट्टी हि पूर्वी पुराचं ठरलेलं ठिकाण होतं जिथे अय्याज काझी आणि जे कोणी असतील ते महापौर वगैरे मान्यवर आणि पत्रकार छायाचित्रकार झोपडपट्टीत शिरलेल्या पाण्याची पाहणी करत , मग शाळांमध्ये तात्पुरते निवास , नुकसान भरपाई सारे सोपस्कार उरकले जात. पण १९९७ नंतर हे चित्र बदलत गेलं नदीला पूर येणारी ठिकाणे वाढली , आणि शहरात देखील पूरस्थिती आता निर्माण झाली . का कशामुळे झाले हे याचे उत्तर अगदी सोपे आहे त्यातले एक कारण आज भाजपचे माजी नगरसेवक जे सभागृहात आढाव , बापट , कुलकर्णी नंतर गाजत . प्राध्यापक विकास मठकरी … आज त्यांनी या साऱ्या आठवणी तीन एक वाक्यात ताज्या केल्या. आणि सध्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर रामयांचे अभिनंदन केले .

नेमके काय म्हटलेय मठकरी यांनी ते त्यांच्याच शब्दात …

नवलकिशोर राम
पुणे मनपा आयुक्त
नमस्कार..!!

तुमचे मनापासून खुप खुप अभिनंदन..!
सिमेंट नव्हे , डांबरी रस्ते हाच उपाय ..!

1997 साली सिमेंटच्या रस्ताचं फॅड निघाल होतं. परंतू मी तेव्हा सुद्धा GB मधे विरोध केला होता.
सुहास कुळकर्णी आणि उज्ज्वल केसकर सुध्दा माझ्या बाजूने लढले.

पण काल अचानक 2 एप्रिल ला प्रचंड पावूस झाला. अगदी 130 वर्षांत अभूतपुर्व ..!
सिमेंटचे रस्ते धोधोऽऽ वाहणाऱ्या नद्याच बनल्या. त्यामुळे घरामधे आणि पार्किंग एरियामधे पाणी शिरलं. कॅाक्रीटीकरणामुळे ते पाणी सोसायट्या मधेच अडकून बसलं.
परंतू आता निर्णय झाला. रस्ते काही प्रमाणात का होईना [ 9 मिटर पेक्षा लहान… ] पण डांबराचे होणार. सिमेंटची उष्णता तर काही महाभयानकच असते. आता ते ही काही प्रमाणात थांबणार.
अमेरीकेत सुध्दा सर्वत्र डांबरीकरणाचाच उपयोग होतो.
पण आता हे होणार हे शहाणपण..!

—— प्रा. विकास मठकरी.

पीएमआरडीएकडून ५,५०० नव्या वृक्षांची लागवड!झाडांना ‘क्यूआर कोड’ची जोड !नव्याने लावलेली १०० टक्के, तर पुनर्रोपित ८० टक्के झाडे जगली

विकासासोबतच निसर्गाचेही जतन

पुणे: पुणे महानगर व पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग-३’ च्या कामात केवळ पायाभूत विकासालाच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनालाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तितकेच प्राधान्य दिले जात आहे. या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या झाडांच्या बदल्यात तब्बल ५ हजार ५०० नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या नव्याने लावलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण १०० टक्के असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

मेट्रो मार्गावरील खांब (पियर्स), स्थानके आणि जिन्यांच्या उभारणीमध्ये एकूण १,३०५ झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने पर्यावरणपूरक भूमिका घेत यापैकी केवळ ५५७ झाडे तोडली, तर उर्वरित ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण केले. तसेच, पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी तब्बल ५,५०० नवीन झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-३ मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत.

या मोहिमेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून सर्व वृक्षांचे ‘जिओटॅगिंग’ करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर एक ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. नागरिकांनी मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व (फायदे) याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. कंत्राटदार आणि ‘सायन्स अँड टेक पार्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व वृक्षांचा सविस्तर डेटाबेस तयार करण्यात आला आहे.

पुनर्रोपित झाडांना आली फळे-फुले!

नव्याने लागवड केलेल्या सर्व ५,५०० वृक्षांनी मूळ धरले असून ते १०० टक्के जगले आहेत. तर, पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाणही ८० टक्के इतके नोंदवले गेले आहे. हिंजवडी फेज-२ मधील वनक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे सुमारे ३,००० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे या झाडांना आता फुले आणि फळे येण्यास सुरुवात झाली असून, हे या पर्यावरण मोहिमेच्या यशाचे मोठे द्योतक मानले जात आहे. मेट्रोच्या या प्रकल्पामुळे पायाभूत विकासकामांसोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखता येतो, याचा एक उत्तम आणि अनुकरणीय वस्तुपाठ समोर आला असून, शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

“मेट्रो प्रकल्पामुळे होणारा पायाभूत विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पुनर्रोपित झाडांना आलेली फळे-फुले हे या मोहिमेच्या यशाचे गमक आहे.”
— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

सतरा वर्ष ड्रेनेज डिपार्टमेंटमध्ये असलेले अधिकारी आणि अनेक टेंडर घेणाऱ्या जोडगळीची ACB चौकशी करा -केसकर,कुलकर्णी, बधेंची मागणी

पुणे- दरवर्षीच पाऊस पडतो पण जेव्हा जेव्हा तो कोसळतो तेव्हा तेव्हा महापालिकेचे वाभाडे काढतो अशी स्थिती कायम दिसली आहे . ड्रेनेज विभागाचा नेहमीचा फज्जा उडतो या विभागाची लाज रस्त्यावर येते .आता याच विभागात गेली १७ वर्षे कार्यरत असणारे जगदीश खानोरेआणि अनेक टेंडर घेणारे एम. बी. पाटील आणि संदीप पटेल यांच्या सर्व व्यवहाराची आणि केलेल्या कामाची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करणे आवश्यक आहे.असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी म्हटले आहे.

महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची आणि तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी नुकतीच केली होती .

प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जायका’ प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणार

0

अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण  डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.

‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी  रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’च्या नवीन कार्यालयाचे उदघाटन

केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले साहेबांकडून शैक्षणिक संस्थेचे कौतुक
पुणे : संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना बालवयातच शिक्षित करीत सामाजिक-शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रेरित करणारी शैक्षणिक संस्था समाज निर्मितीसह देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतेय, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी चलवादी शिक्षण संस्थेच्या ‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अॅड ज्युनियर कॉलेज’च्या कार्याचे कौतुक केले.

शिक्षण संस्थेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यातून पार पडले.यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून शैक्षणिक संस्थेची संस्कृती संवर्धनासाठीची कटिबद्धता दिसून आली.

उदघाटन सोहळ्यासाठी आठवले यांचे मुख्य प्रवेशद्वारावर आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने आणि विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध स्वागताने वातावरणात रंगत चढली. प्रवेशद्वारावर पाच सुवासिनींकडून औक्षण करीत, बॅच लावून आणि पुष्पगुच्छ देवून औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर फीत कापून नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.

उद्घाटनानंतर कार्यालयातील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करीत वंदन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थेचे संस्थापक मरीअप्पा चलवादी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उदघाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात शाळेने केलेली प्रगती दाखवून दिली. कार्यक्रमांची सुरूवात भतरनाट्यातून गणेश वंदनेच्या सादरीकरणातून झाली.

 ‘मी जिजाई बोलते’ हे प्रभावी एकपात्री सादरीकरण राजश्री शेलार यांनी केले. यासोबतच सर्व शिक्षकांकडून “दोनच राजे इथे गाजले…” हे गीत सादर करीत पाहुण्याचे स्वागत केले. लहान गटातील विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले.

पुणे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन हुलगेश चलवादी यांच्या हस्ते व उपाध्यक्ष ॲड.रेणुका चलवादी, स्वप्नील शिर्के यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रामदास आठवले यांचा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती , महात्मा फुले पगडी , संविधान,  शाल , स्कूल डायरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मा.आठवले साहेबांसोबत असलेल्या सर्व मान्यवरांचा शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे सर्व आर्किटेक्चरल काम करणारे आर्किटेक सोमनाथ केरूर आणि सदाशिव कुलकर्णी यांना मा.आठवले साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व उपमुख्याध्यापकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अतूट प्रयत्न केले.

कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात चेअरमन हुलगेश चलवादी यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. सूत्रसंचालन डॉ उल्हास औटी यांनी तर आभार प्राचार्या सौ.स्मिता लोंढे यांनी मानले.हा सोहळा शाळेच्या प्रगतीचा आणि शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून,विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारा ठरला, असे समाधान संस्थाचालकांकडून व्यक्त करण्यात आले.

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश

पुणे, दि.४: राज्यशासनाने गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे, या समितीचे कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचे स्वरूप लवकरच ठरविण्याचा निर्णय विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतला.

ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्य विषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करावी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावे, असेही निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

पुणे विधान भवन येथील झुंबर सभागृह येथे गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात स्थापित राज्य समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ. मनीषा कायंदे (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तर आमदार नमिता मुंदडा, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांचे प्रमुख, समिती सदस्या डॉ. संगीता चव्हाण, युनिसेफचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. मंगेश गढरी यांच्यासह तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हस्तरीय समितीमार्फत मागील ३ वर्षातील राज्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत तपासणी करावी. खाजगी रुग्णालयात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी करावी. रुग्णालयामार्फत अनावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत किंवा कसे या बाबतीत तपास करणे. अनावश्यक शस्त्रक्रियांवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि या समितीच्या वर्षातून कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करावे .

शासन ऊसतोड महिला कामगाराचे जीवनमान अधिक सुखकर करण्याकरिता प्रयत्नशील आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सुमारे एक लाख ऊसतोड महिला कामगारांना आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम केले आहे. या कामगारासोबत राज्यातील १७ जिल्ह्यातून ऊसतोडीकरिता स्थालांरित होणाऱ्या कामगारासोबत सुमारे ५ हजार मुले सोबत असतात, या मुलांच्या आरोग्य, शिक्षणाकरिता करावयाच्या उपाययोजना, मासिक पाळीच्यावेळी वापरण्यात येणारी आयुधे, सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरवठा, अधिकच्या आरोग्य पुरविण्यासोबत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या काळात सहकार विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभाग आणि यासंबंधित काम करणारे घटकांसोबत घेवून बैठक आयोजित करण्यात येईल. त्यापूर्वी समाजातील आरोग्य व महिला क्षेत्रात काम करणारे घटक, सामाजिक संघटनांनी पुढे येवून आपल्या सूचना मांडाव्यात, असेही आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले.

बीड जिल्हा प्रशासनाचा “मिशन साथी” स्त्युत्य उपक्रम
जिल्हा परिषद बीडमार्फत स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या विविध आरोग्य विषयक समस्यांकरिता प्रायोगिकतत्वावर “मिशन साथी” स्त्युत्य उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागमार्फत “आरोग्य साथी उपक्रम” सुरु करण्यात आले आहेत. ऊसतोड कामगारांची माहिती संकलित करण्यासोबतच त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ७७० आरोग्य साथी असून त्यापैकी ४४६ चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशा प्रकारचे उपक्रम इतर जिल्ह्याने राबवावे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.

आमदार श्रीमती मुदंडा यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या मुलाच्या आरोग्य व शिक्षणाबाबत सूचना केल्या. कामगारांकरिता करण्यात आलेल्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी शासकीय पातळीवरुन होत आहे, कामगारांचे हीत लक्षात घेता साखर कारखाने आणि मुकादमांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी समिती सदस्याने बैठकीच्या अनुषंगाने सूचना केल्या.

या बैठकीत डॉ. कंदेवाड यांनी जिल्ह्यानिहाय साखर कारखान्याची संख्या, ऊसतोड पुरुष व महिला कामगाराची संख्या, हंगाम काळात स्थालंतरीत होणारे कामगार, आरोग्य कृतीदल स्थापन केल्या गावांची संख्या, ऊसतोड कामगार तपासणी शिबीर, मासिक पाळी गर्भनिरोधक साधनांचा वापर, आरोग्य पत्रिका, आभा कार्डचे वितरण, रक्तक्षय बाधित महिला कामगारांची संख्या, गर्भवती ऊसतोडृ महिला कामगारांची संख्या, तपासणी केलेल्या गर्भवती महिलांची संख्या आदी बाबत माहिती दिली. तसेच बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यांनी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाने माहिती दिली.

बैठकीत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात अग्रक्रमाने काम करण्याची आवश्यकता समोर आली.

मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली:सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणारच; सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या आधी पक्षाची जी भूमिका होती, त्याच भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

वास्तविक या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आमची भावना कळवली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा जरी सुरू असली तरी पक्षाने दोन्ही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराच नाव काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतिम करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ सांगितले आहे. या पोटनिवडणूक संदर्भाची जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस पक्षात ठाम आहे. या संदर्भात राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील सर्व नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सपकाळ यांनी सांगितलं. त्यामुळे या संदर्भात उद्या दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले.

मन मोठे करून पाठिंबा दिला पाहिजे:फडणवीसांचे आवाहन

या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

डॉ.हुलगेश चलवादी यांची ‘आरपीआय’ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती 

राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री .रामदास आठवलेंच्या हस्ते सत्कार 
पुणे:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बहुजन नेते, पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची नियुक्ती केली. संघटनात्मक कौशल्य, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव तसेच लोकसंपर्क आणि बहुजन चळवळीतील सक्रिय सहभाग लक्षात घेत आठवले यांनी ही जबाबदारी डॉ.चलवादी यांच्या खांद्यावर टाकली आहे.

‘रेसिडेन्सी क्लब’येथे पक्षाची महाराष्ट्र प्रदेश वर्किग कमेटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आठवले साहेबांनी राज्यातील जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करीत डॉ.चलवादी यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्तीची संघटनात्मक घोषणा केली.

तीन दशकांहून अधिकचा सामाजिक-राजकीय कार्याचा अनुभव असलेले डॉ.चलवादी यांनी २४ मार्च २०२६ रोजी आरपीआय पक्षात प्रवेश करीत आठवले यांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीत काम करण्याचा निर्धार सोडला होता.पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पक्ष संघटनात्मक कामासह पक्ष विस्ताराचे कार्य प्रामुख्याने हाती घेवू, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

आठवले यांनी एवढी मोठी जबाबदारी देवून आपल्यावरील त्यांचा विश्वास दाखवून दिला आहे. हा विश्वास सार्थकी ठरवून बहुजन चळवळ आणखी व्यापक करीत आठवलेंच्या माध्यमातून वंचित-पीडित-शोषित-उपेक्षितांना न्याय मिळवून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने सुरु ठेऊ, असे डॉ.चलवादी म्हणाले.

बैठकीत आठवले यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश महासचिव गौतम सोनावणे, प्रदेश महिला अध्यक्ष चंद्रकला सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महापालिकेच्या गटनेत्या हिमालीताई कांबळे , नगरसेविका निशा मानवतकर , नगरसेविका अश्विनीताई भंडारी, पिंपरी-चिंचवड चे नगरसेवक धर्मा तंतरपाले ,नगरसेवक कुणाल वाव्हळकर , महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सचिव बाळासाहेब जानराव , माजी नगरसेवक जयदेव रंधवे पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील आजी-माजी नगरसेवक, प्रदेश कार्यकारिणी तील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

औंध-बोपोडीकरांसाठी मोठा दिलासा : संजय गांधी रुग्णालय होणार मल्टीस्पेशालिटी, लवकरच उद्घाटन – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची ग्वाही

नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : औंध-बोपोडी प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. औंध-बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय लवकरच अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असून त्याचे उद्घाटनही लवकरात लवकर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे.

नगरसेवक सनी निम्हण यांनी या संदर्भात पाठपुरावा करत सविस्तर निवेदन सादर केले होते. त्या मागणीची दखल घेत अध्यक्ष भिमाले यांनी सकारात्मक भूमिका घेत, संबंधित रुग्णालयाचा मल्टीस्पेशालिटी योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी विशेषत्वाने स्पष्ट केले की, हे रुग्णालय पीपीपी (Public-Private Partnership) मॉडेलवर देण्यात येणार नाही. रुग्णालय पूर्णतः पुणे महानगरपालिकेद्वारेच चालवले व व्यवस्थापित केले जाईल.

ही भूमिका नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

औंध, बोपोडी तसेच पिंपरी-चिंचवड सीमेलगतच्या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे त्वरित कार्यान्वित होणे व मल्टीस्पेशालिटीमध्ये रूपांतर होणे अत्यंत गरजेचे होते. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना खालील सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत :

  • अत्याधुनिक ट्रॉमा केअर व आपत्कालीन सेवा
  • आयसीयू व एनआयसीयू सुविधा
  • माता व बाल आरोग्य सेवा
  • विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार

नगरसेवक सनी निम्हण यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की,
“औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. स्थायी समिती अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

या निर्णयामुळे औंध-बोपोडी व आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.

शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

  • सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत; सभागृह नेते गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

पुणे ४ एप्रिल: पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणी साठणाऱ्या भागांची माहिती संकलित करून संबंधित विभागांना तत्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

आज सुट्टीचा दिवस असतानाही महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आला आहे. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथ विभागाचे राजेश बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने, नगरसेविका अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील पाणी साठणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करत तात्काळ उपाययोजनांसोबतच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दीर्घकालीन नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी व्यापक योजना आखण्यावर भर देण्याची सूचना गणेश बिडकर यांनी केली आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया
“पुणे शहरात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही भागात पाणी साचू नये, यासाठी ड्रेनेज व्यवस्थेत आणखीन तात्काळ आणि दीर्घकालीन सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर ॲक्शन प्लॅन बनवण्याची सूचना केली आहे.

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन-केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली माहिती

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न

पुणे:

दलित समाजावरील अन्याय दूर करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या संघर्षात महिलाचा टप्पा ठरलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली. या बैठकीला राजाभाऊ सरोदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अविनाश महातेकर प्रदेश सरचिटणीस, गौतम सोनवणे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, बाबूराव कदम प्रदेश कार्याध्यक्ष, आशाताई लांडगे राष्ट्रीय सरचिटणीस, प्रदेश सचिव बाळसाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनाकांबळे, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपाबद्दल चर्चा करण्यात आली.

या शताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी समता परिवर्तन यात्रेचे आयोजन केले जाणार असून तिच्या प्रारंभ 14 ऑक्टोबर या धम्मचक्र परिवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे स्मारक असलेल्या सातारा येथून केला जाणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समारोप पुणे येथे दहा नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक विभागात सामाजिक समता परिषदा आयोजित करून दलित समाजाचा विकास, सवर्ण व दलित यांच्यातील समता यासाठी आवश्यक कार्यक्रमाबाबत परिषदांच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात येणार आहे. याच उद्देशाने समतावादी विचारवंत आणि साहित्यिक यांच्या संमेलनांचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. सध्याच्या काळात अस्पृश्यता संपुष्टात आली असली तरी जातीभेद नष्ट झालेले नाहीत.अजूनही दलितांवर अत्याचारांच्या घटना घडतच आहेत, हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

त्याचप्रमाणे या वर्षात 15 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात महिला समता परिषदा, आंबेडकरी चळवळीतील शाहीर कलावंतांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

आपल्याला तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेत जाऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आणि रिपब्लिकन पक्षाचा देशव्यापी विस्तार यासाठी या संधीचा उपयोग करणार असल्याची ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दमनशाहीचा पराभव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण पाठिंबा राहील. या ठिकाणी पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सात तारखेपासून दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष तामिळनाडूमध्ये 40 जागा लढवणार असून आसाममध्ये चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. केरळमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असेल तर पद्दुचेरी येथे सर्व जागांवर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना पक्षाचा पाठिंबा असेल, असेही आठवले यांनी सांगितले.

लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या 816 होणार आहेत. अर्थातच महिलांसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही 273 पर्यंत वाढ होणार आहे. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी 16 तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

महिलांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागांचा लाभ इतर मागास प्रवर्ग व भटके विमुक्त प्रवर्ग यातील महिलांना मिळणार नाही. कारण या प्रवर्गांना अद्याप राजकीय आरक्षण दिले गेलेले नाही. मात्र, अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांना देखील राजकीय आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विविध महामंडळांवरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाव्या, अशी मागणी ही आठवले यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेतील एक जागा, प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे किमान एक सदस्यत्व आणि काही महामंडळांवर अध्यक्ष पद देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. नेत्यांनी काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथकाकडून काटेकोर चौकशी केली जात असून संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होईल आणि दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, जयदेव रंधवे, संदीप धाडोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकटयांनी प्रयत्न केले.  

सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे

भाजपा कडून महापालिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मोठ्या मनाने उपमहापौरपद मिळाले आहे. त्यानंतर उपमहापौरांना योग्य सन्मान मिळत नसल्याची चर्चा आहे. ही चर्चा अयोग्य आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घ्यावे. सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे. वेळ पडली तर यासाठी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही चर्चा करू, असे आठवले यांनी सांगितले.