पुणे : रोजगार वाढवण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडे नोंदणी करून संस्था विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क लुबाडत आहेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही किंवा रोजगार दिला नाही. मोदींच्या कौशल्य विकास कार्यक्रमात अशा पद्धतीने गैरव्यवहार सुरू असून राज्य सरकारचा त्याला अभय आहे काय ? असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पुण्यात याबाबत एक प्रकार उघडकीस आला आहे. विमान कर्मचारी, आतिथ्य व्यवस्थापन, प्रवास व पर्यटन तसेच ग्राहक सेवा व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देणाऱ्या, पुण्यातील अमिगो ॲकॅडमीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी वसूल करून त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण न देता,त्यांची परीक्षा न घेता फसवणूक केली आहे. या संस्थेच्या मुंबईतील घाटकोपर, बोरिवली, बांद्रा, ठाणे पश्चिम येथे प्रत्येकी दोन तर अंधेरी व पुणे येथे एक शाखा आहे. मुंबई व ठाण्यातील अमिगो ॲकॅडमीच्या या शाखांची ही सरकारने चौकशी करावी. त्याचप्रमाणे कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखों रुपये लाटणाऱ्या अमिगो ॲकॅडमी सारख्या संस्था शोधून सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
अमिगो ॲकॅडमी या संस्थेने विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून यातील काही विद्यार्थ्यांनी पत्र देऊन याबाबत मदत करण्याची विनंती केली आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत पुण्यातील २७ विद्यार्थ्यांनी मदत मागितली असून त्यांच्या फसवणुकीचा आकडा ३७,९६,५०० लाख रुपये इतका होतोय. अजूनही काही मुले माझ्याशी संपर्क करत असून फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात ही संस्था २०२२ पासून अस्तित्वात आहे. २०२२ पासून ढोले पाटील रस्ता येथे या संस्थेची शाखा होती. ७ जानेवारी २०२६ पासून ही संस्था सौरभ हॉल, पुणे स्टेशन येथे स्थलांतरीत झाली आहे. मात्र याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली नाही. २०२२ पासून २०२४ -२५ या वर्षापर्यंत या संस्थेत जवळपास १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. हा अभ्यासक्रम पूर्ण होण्याअगोदर विद्यार्थ्यांकडे एव्हीएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम तसेच कस्टमर सर्व्हिस या क्षेत्रातील नोकरी असेल, त्याचे किमान वेतन ३० ते ३५ हजार असेल याची हमी संस्थेने घेतली होती. संस्था महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांचेकडे नोंदणीकृत आहे. ही नोंदणी संस्थेने २०२४-२५ साली केली आहे. संस्था स्वयंअर्थसहाय्य तत्वावर असल्याने विद्यार्थ्यांकडून त्यांनी वेगवेगळी फी वसूल केली आहे. अमीगो ॲकॅडमीने ८० हजारांपासून १ लाख ९५ हजार पर्यंत विद्यार्थ्यांची फी आकारली आहे. यातील काही जणांना रोख रक्कम भरल्यानंतर त्याची पावतीही दिली नसल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले आहे.
प्रवेश घेतलेल्या १७० पैकी जवळपास ८० विद्यार्थ्यांची या संस्थेने परीक्षा घेतलेली नाही. त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले नाही. याबाबत या संस्थेकडे विचारणा केली असता शासनाकडूनच अद्याप परीक्षा घेण्यात आली नसल्याचे सांगितले. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडे चौकशी केली असता, त्यांनी संस्थेने विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतची प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याची माहिती मला माहिती अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तरात मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याने संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा मंडळाचा दाखला त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी देण्याचा दावा करणाऱ्या अमीगो ॲकॅडमीने अत्यल्प विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे. ती सुद्धा केवळ १० ते १५ हजार रुपयांची. यातील काही जणांना तर विमानतळावरील कँटिन मध्ये ‘वेटर’ची नोकरी लावली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती संस्थेची फी भरण्यासारखी नव्हती मात्र मुलांचे ‘करियर’ होईल या आशेवर त्यांनी कर्ज काढून फी भरली. मात्र आजपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा नसल्याने तसेच नोकरी न लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्यार्थ्यांची दोन वर्ष वाया घालवल्याबद्दल विद्यार्थी व पालक संस्थेच्या पुणे कार्यालयात सातत्याने विचारणा करत आहेत मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळत आहे. याच प्रमाणे या संस्थेच्या संचालकांना फोनवरून विचारणा केली असता ते संस्था विद्यार्थी हीत जपेल असे सांगत याबाबत पुण्यात येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देतात मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने संपर्क करून सुद्धा याबाबत ते सकारात्मक दिसत नाहीत. आम्ही याबाबत पुणे पोलिस आयुक्त मा. अमितेश कुमार साहेब यांच्याकडे तक्रार देत आहोत. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून या अशा अकॅडमींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

