Home Blog Page 45

प्रजित नायर आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे-

आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा पदभार प्रजित नायर यांनी स्वीकारला. ते २०१७ च्या बॅचचे भाप्रसे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, उप विभागीय अधिकारी, जव्हार (पालघर) तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया या पदांवर कामकाज केलेले आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नवीन योजना राबविण्यात येतील असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जायका’ प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच, राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून २८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १२५ कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश होते. मात्र, या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने साधारण ४२ कोटी रुपये खर्च केल्याचेही निवेदनात नमूद आहे.

मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोबदला देण्यात आला, तसेच विविध कामांची बिले काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः, नव्याने समाविष्ट नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३१ नुसार, महानगरपालिकेला विशेष विषयांच्या चौकशीसाठी नैमित्तिक समिती स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या समितीत निवडून आलेले सदस्य तसेच विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना सहभागी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाची मनमानी वाढली असून, हजारो कोटींच्या खर्चाची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ड्रेनेज विभागासाठी स्वतंत्र नैमित्तिक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद नवनियुक्त सदस्यांची बैठक

0

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील भाजपा, शिवसेना (एकनाथजी शिंदे), शिवसेना (उबाठा गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले सर्वांचे ध्येय असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीला आ. राहुल कुल, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आ. संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.

फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उबाठा गट) ६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) १ सदस्य निवडून आले. ह्या सर्व सदस्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. तसेच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा

प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचा पुणे विभागीय आढावा

पुणे, दि. 3 – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सर्किट हाऊस, पुणे येथे घेण्यात आला.

बैठकीस पुणे विभागाचे आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हनकारे, योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड तसेच पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे उपस्थित होत्या.

बैठकीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी (PHC) योजनेंतर्गत २५ उपचार प्रक्रियांची तरतूद असून, त्या प्रक्रियांमध्ये बसणाऱ्या रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन योजनेच्या पोर्टलवरून पाठविल्यास संबंधित पीएचसीला क्लेम मिळणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

योजनेतील २२३ ‘गव्हर्नमेंट रिझर्व्ह्ड’ प्रक्रियांतर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी पात्र रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन करणे अनिवार्य असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

पुणे विभागातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी पुढील एका महिन्यात योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू करावेत, त्याचा आढावा महिन्यानंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. योजनेंतर्गत उपचार न करणाऱ्या रुग्णालयांच्या नोडल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.

पुणे विभागातील सर्व शासकीय रुग्णालये पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करतील, असा विश्वास आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार यांनी व्यक्त केला.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कामात हलगर्जीपणा: दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.

पुणे, दि. ०३ एप्रिल २०२६ : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

मात्र, कामात कोणतीही प्रगती न करणाऱ्या, हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मतदारांना प्रतिसाद न देणाऱ्या २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्र. २२८ व २३० येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कठोर पावले उचलली आहेत.

त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ४-५ एप्रिलला विशेष शिबिर

आगामी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यमान मतदार यादीतील नोंदींची पडताळणी २००२ च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलांमध्ये (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दि. ०४ एप्रिल २०२६ व ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून संपर्क साधून आपले मॅपिंग व आवश्यक दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.

भोंदू खरात प्रकरणात काही लोकांनी जीव दिले:मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार

मुंबई-भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा फसवणुकीपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात काही लोकांनी जीव दिल्याचाही प्रकार समोर येत आहे, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे.

हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला नाही. बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते.संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुढाऱ्यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे.

कशाचे फोन होते, काय होते हे पाहावे लागेल. माझेही फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार असेल तर मी सुद्धा जेलमध्ये गेले पाहिजे. मी कुणालाही स्पेअर करा असे म्हणत नाही. पण खरातने ज्या पद्धतीचे गुन्हे गेलेत, ते महाराष्ट्राच्या इतिसात असे करणारा तो पहिला गुन्हेगार असावा. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही सर्वसामान्य लोकांसह आमचीही इच्छा आहे. थोडी कळ काढा सर्व पर्दाफाश येईल, असे शिरसाट म्हणाले.

भारताला सज्ज राहण्यासाठी आणि तिचा सामना करण्यासाठी दिवसरात्र देखरेख आणि सुनियोजित प्रतिसाद आवश्यक – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतावर होणारा परिणाम कमीत कमी करण्यासाठी सक्रिय उपाययोजना सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक आंतर मंत्रालयीन गटाची (आयजीओएम) दुसरी बैठक  2,एप्रिल  2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे  पार पडली. या मंत्रिगटाने, बदलत्या परिस्थितीचा आणि त्याचा भारतातील विविध क्षेत्रांवर होणारा  प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सरकारद्वारे उचलल्या जाणाऱ्या पुढील पावलांबाबत  विचारविनिमय करण्यात आला.

“अनिश्चित परिस्थिती”च्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्र्यांनी परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुनियोजित प्रतिसाद देण्याच्या गरजेवर भर दिला. देशातील जनतेवर या  संघर्षाचा कमीत कमी प्रभाव पडेल हे सुनिश्चित करण्यात कोणतीही कसर सोडू नये, यावर त्यांनी भर  दिला.”

बैठकीदरम्यान, सचिवांच्या सात अधिकारप्राप्त गटांनी परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयजीओएमला दिली. जागतिक व्यापारातील व्यत्ययांमुळे निर्माण झालेल्या समस्या  दूर करण्यासाठी, उद्योगाला, विशेषतः उत्पादन क्षेत्राला, दिलासा व मदत देण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनांची माहिती आयजीओएमला देण्यात आली. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • 01, एप्रिल 2026 रोजी  अधिसूचना जारी करण्यात आली, त्यानुसार  40 महत्त्वपूर्ण पेट्रोकेमिकल उत्पादनांवर  30,जून  2026 पर्यंत  संपूर्ण सीमा शुल्क सूट  लागू करण्यात आली आहे.   
  • विशेष आर्थिक क्षेत्रांमधील (सेझ ) पात्र युनिट्सना देशांतर्गत शुल्क क्षेत्रात (डीटीए ) सवलतीच्या सीमा शुल्क दराने उत्पादित वस्तू विकण्यासाठी एका विशेष एक-वेळच्या सवलतीच्या उपाययोजनेची घोषणा करण्यात आली जी 01,एप्रिल  2026 ते 31,मार्च  2027 पर्यंत लागू  राहील.
  • महसूल विभागाने  31, मार्च 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,  01, एप्रिल 2017 पूर्वी केलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत करचुकवेगिरी प्रतिबंधक  कायद्याच्या (GAAR) तरतुदी लागू राहणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योग, पॅकेजिंग आणि औषधनिर्माण यांसारख्या  क्षेत्रांवरील खर्चाचा दबाव कमी होईल, देशातील पुरवठ्यात स्थिरता येईल आणि भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक स्पष्टता मिळेल.

राजनाथ सिंह यांनी  देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या दरातील मासिक वाढीवर 01, एप्रिल 2026 पासून  25% ची मर्यादा आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत  केले. या निर्णयामुळे लोकांना विमानप्रवास भाड्यांमध्ये होणाऱ्या  अचानक वाढीपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. वापरासाठी आवश्यक गरज  पूर्णतः भागवण्यासाठी शुद्धीकरण केंद्रांमधील उत्पादनात वाढ करण्यात आली आहे. एलपीजी वितरकांकडे साठा संपल्याचे कोणती नोंद नसल्याचे तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरचे वितरण सामान्य वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहिती आंतर-मंत्रालयीन गटाला (IGoM) दिली गेली. साठेबाजी आणि काळाबाजारामुळे पुरवठ्याबाबत तात्पुरती समस्या निर्माण झाली होती. यामुळेच काही भागात भितीमुळे ताणात येऊन खरेदी करणे सुरू झाले होते याबाबतही त्यांना अवगत केले गेले.

एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अंमलबजावणी विषयक कारवाया कठोरपणे केल्या जात आहे, त्यासोबतच अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये छापे टाकले जात असल्याची माहितीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. गैरप्रकार करत असलेल्या काही एलपीजी वितरकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

स्थलांतरित मजूर आणि कमी वापर असलेल्या कुटुंबांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार मुक्त व्यापार तत्वावरील  5 किलोचे एलपीजी सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याचीही सुनिश्चित करत आहे. 23 मार्च 2026 पासून अशा 4.3 लाख पेक्षा जास्त सिलिंडरची विक्री झाली आहे. ज्या राज्यांमध्ये जास्त मागणी आहे, त्या तिथे विशेषत्वाने लक्ष दिले जात आहे.

व्यावसायिक एलपीजीवर अवलंबून असलेल्या औद्योगिक गरजाही भागवल्या जात आहेत. त्याचबरोबर कार्यान्वयन आणि काममकज सातत्यपूर्णतेने सुरु राहावे याची सुनिश्चिती करण्याकरता, या बाबतीतील संकटपूर्व काळातील पुरवठ्याच्या तुलनेत, 80% पेक्षा जास्त पुरवठा राखला जात असल्याची माहितीही आंतर मंत्रालयीन गटाला दिली गेली. उद्योग जगताची मागणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध मंत्रालये आणि संबंधित भागधारकांसोबत विशेष बैठकाही घेतल्या गेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून देशभरात मोटारवाहनांसाठीच्या एलपीजीचा पुरवठा विना अडथळा सुरू राहील याचीही सुनिश्चिती केली जात जात आहे. मात्र, खाजगी चालकांना त्यांच्या खरेदीप्रक्रियेशी संबंधीत काही समस्या जाणवत असल्याने पुरवठ्याच्या बाबतीत काही मर्यादांनाही सामोरे जावे लागत आहे. याच कारणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मोटार वाहनांसाठीच्या एलपीजी पंपांवर रांगा पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी ड्युअल फीड (इंधनाचे दोन पर्याय असलेल्या) प्रणालीवर चालणाऱ्या रिक्षा आहेत आणि जर त्या पेट्रोलवर चालू शकत आहेत, तर अशावेळी चालकांनी पेट्रोलचा वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे.

भितीमुळे ताणात येऊन नागरिकांनी केलेल्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी पूर्ण करण्याकरता दररोजच्या एलपीजी वितरणाच्या संख्येतही लक्षणीय वाढ केली गेली असल्याची माहितीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. यासोबतच ग्राहकांना कोणत्याही प्रकारे तुटवडा भासणार नाही याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी औद्योगिक वापरासाठी पीएनजी हा एक विश्वासार्ह पर्याय असल्याबाबत प्रचार प्रसार केला जात आहे. ज्या क्षेत्रांमध्ये पीएनजीचा वापर आधीपासूनच सुरु आहे, अशा ठिकाणी औद्योगिक वापरासाठी त्याचा पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती केली जात आहे, त्यासोबतच कामकाज आणि कार्यान्वयही सुरुळीत राखले जात आहे.

काही समाजकंटक समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक फोटोशॉप केलेले आणि मॉर्फ केलेले फोटो, तसेच दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही आंतर मंत्रालयीन गटाला सांगितले गेले. अशा घडामोडींवर यंत्रणेद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, अथवा ती प्रसारित करू नये, तसेच योग्य आणि अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत स्त्रोतांवरच अवलंबून राहावे, अशी सल्लाही जारी केला गेला आहे.

‘तारागिरी’ भारताची वाढती तांत्रिक क्षमता,आत्मनिर्भरता नौदलाच्या अदम्य सामर्थ्याचे प्रतीक : संरक्षणमंत्री


नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

‘प्रकल्प 17-ए’ श्रेणीतील चौथी शक्तिशाली युद्धनौका असलेली ‘आयएनएस तारागिरी’, आ‍ज 3 एप्रिल, 2026  रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आधुनिक युध्‍दनौकाबांधणी क्षेत्रातील एक उत्कृष्ट नमुना असलेली ही अद्ययावत स्टेल्थ फ्रिगेटचे वजन  अंदाजे 6,670  टन आहे. या युद्धनौकेची रचना ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली असून, ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या  सहकार्याने तिची बांधणी केली आहे. शत्रूच्या रडारवर सहजपणे दृष्‍टीस पडू शकणार नाही,  अशा  (कमी ‘रडार सिग्नेचर’ राखण्यासाठी) अतिप्रगत ‘स्टेल्थ तंत्रज्ञाना’चा वापर या युध्‍दनौकेच्या बांधणीसाठी  करण्यात आला आहे. यामुळे संघर्षप्रवण वातावरणात या युद्धनौकेकडे शत्रूवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.

‘तारागिरी’ ची बांधणी करताना 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला असून, अत्यंत कमी कालावधीत तिची बांधण्यात आली आहे. ‘तारागिरी’ ही युद्धनौका, भारताचे  नौकाबांधणी क्षेत्रातील नैपुण्य आणि सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांमधील भक्कम सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी ‘आयएनएस तारागिरी’चे वर्णन केवळ एक युद्धनौका म्हणून न करता, भारताची वाढती तांत्रिक क्षमता, आत्मनिर्भरता आणि  नौदलाच्या  अदम्य  सामर्थ्याचे प्रतीक असे केले.

“ही युद्धनौका अत्यंत वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून, दीर्घकाळापर्यंत समुद्रात तैनात राहू शकते. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, स्वतःच्या सुरक्षेची खात्री करणे आणि गरज भासल्यास त्वरित प्रत्युत्तर देणे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रणालींनी ही युद्धनौका सुसज्ज आहे. यात आधुनिक रडार, सोनार आणि ‘ब्रह्मोस’ सारखी  ‘पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी’  क्षेपणास्त्रे यांसारख्या अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे.  या सर्व आधुनिक साधनांमुळे ‘तारागिरी’ची  क्षमता  आणखी वाढली आहे. तीव्र स्वरूपाच्या लढायांपासून ते सागरी सुरक्षा, चाचेगिरीविरोधी मोहिमा, किनारपट्टीवर  देखरेख  ठेवणे  आणि मानवतावादी मोहिमांपर्यंत—प्रत्येक भूमिकेत ही युद्धनौका अगदी चपखलपणे सामावून जावू शकणार आहे,  त्यामुळे ‘तारागिरी’  एक अद्वितीय नौदल मंच ठरते,” असे संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

सुमारे अकरा हजार  किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या आणि तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या भारताचा विकास, समुद्राला वेगळे  ठेवून पाहता येणार नाही; यावर संरक्षणमंत्र्यांनी  भर देऊन, पुढे नमूद केले की, देशाचा सुमारे 95 टक्के व्यापार सागरी मार्गांद्वारे चालतो आणि देशाची ऊर्जा सुरक्षा समुद्रावर अवलंबून आहे.  यामुळेच एक सामर्थ्यवान आणि सक्षम नौदल उभारणे ही केवळ एक निवड अथवा पर्याय राहिलेले नाही तर, ती एक नितांत आवश्यकता बनली आहे.

बदलत्या सुरक्षा परिस्थितीमध्ये सागरी क्षेत्राला असलेल्या अपार महत्त्वावर प्रकाश टाकताना, राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या काळात भारतीय नौदल संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रात अहोरात्र आपली उपस्थिती कायम राखून असते. ” या विशाल महासागरात अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत.  यामध्‍ये  मालाची वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी, हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे नौदल सातत्याने आपली सक्रिय उपस्थिती राखून असते. ज्यावेळी   तणाव निर्माण होतो, त्यावेळी  व्यापारी जहाजे आणि तेलवाहू टँकर्स यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी भारतीय नौदल तत्परतेने पुढे सरसावते.”भारताचे नौदल आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासोबतच, जगभरातील आपले नागरिक आणि व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठी गरजेचे असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी सज्ज असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. नौदलाच्या याच क्षमतेने भारताला एक उत्तरदायी आणि सामर्थ्यवान सागरी शक्ती म्हणून भक्कम स्थान मिळवून दिले असल्याचे ते म्हणाले.

आजच्या आधुनिक डिजिटल युगात जगातील बहुतांश माहितीसाठ्याची देवाणघेवाण ही समुद्राखालील इंटरनेट केबल्सच्या माध्यमातून होत असते. त्यांना कोणतेही नुकसान झाले तर जागतिक व्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले. त्यामुळेच सागरी सुरक्षेकडे केवळ पारंपारिक दृष्टिकोनातून न पाहता, त्याकडे एक सर्वसमावेशक आणि भविष्यासाठीची सज्जता अशा दृष्टीकोनातून पाहायला हवे  असे आवाहन त्यांनी केले. आपण केवळ आपल्या किनारपट्टी प्रदेशांचे रक्षण करण्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांशी अविभाज्यपणे जोडले असलेले महत्त्वाचे समुद्री मार्ग, मोक्याची ठिकाणे    आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या  सुरक्षेची सुनिश्चितीही आपण केली पाहिजे असं ते म्हणाले. यासंबंधीच्या सर्व सुरक्षा विषयक प्रयत्नांमध्ये भारतीय नौदल सक्रियपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दृष्टिकोनामुळेच आपण भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत असतो असे त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भारत आयएनएस तारागिरी सारखी प्रगत जहाजे तयार करतो आणि तैनात करतो, तेव्हा तेव्हा अशी जहाजे संपूर्ण प्रदेशासाठी शांतता आणि समृद्धीची हमी ठरत असतात ही बाब त्यांनी अधोरेखीत केली.

जेव्हा कोणतेही संकट उद्भवते, तेव्हा नागरिकांच्या सुटकेशी संबंधीत मोहीमा असोत, अथवा मानवतावादी मदत असो, भारतीय नौदल सदैव आघाडीवर असते, ते भारताची मूळ गाभ्याशी जोडलेली मूल्ये आणि अटळ वचनबद्धतेचे प्रतिनिधीत्व करत असते असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी आपल्या नौदलाचे सामर्थ्य, मूल्ये आणि वचनबद्धता अधिक वृद्धींगत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येत्या काळात स्वदेशी उद्योगाच्या पाठबळावर भारतीय नौदलाला, जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्र, एखाद्या राष्ट्रीय मोहिमेप्रमाणेच पुढे वाटचाल करते आहे. आज आपण केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते मर्यादित राहिलेलो नाही, तर जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थानही अधिक भक्कम करू लागलो आहोत असे ते म्हणाले. अशा उत्पादनांचे डिझाईन तयार करण्यापासून ते विकसित करण्यासह, ते प्रत्यक्ष तैनात करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर भारताचा सहभाग अविभाज्य झाला असल्याचे ते म्हणाले. यातूनच आज भारताकडे स्वतःच्या सुरक्षेसोबतच, तर स्वतःच्या भविष्याचे डिझाईन करण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास मिळतो असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी हे याच दूरदृष्टीचे मूर्त रूप आहे, असे ते म्हणाले.

गेल्या दशकभरात देशात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दलही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने युवा वर्ग आणि उद्योग जगतासाठी, सातत्यपूर्णतेने नवोन्मेष, उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारी परिसंस्था उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असावे, याकरता भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. सुरक्षेच्या अनुषंगाने होत असलेले प्रयत्न केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरते मर्यादित असता कामा नयेत , तर त्यासोबतच अंतराळ, सायबर क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रांपर्यंत या प्रयत्नांची व्याप्ती विस्तारायला हवी असे ते म्हणाले. याच दृष्टीकोनापासून प्रेरित होऊन केंद्र सरकारने अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले असून, त्यांचे परिणाम आता दिसून येऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षणमंत्र्यांनी  भारताची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या दिशेने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि इतर संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या सातत्यपूर्ण सकारात्मक योगदानाचे कौतुक केले. त्यांनी 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना संरक्षणातील आत्मनिर्भरतेची केंद्रे असे संबोधले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर नेल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, 13-14 वर्षांपूर्वी आपण 1,200 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याची निर्यात करत होतो. आज त्यात वाढ होऊन ती  जवळपास 39,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारताची आत्मनिर्भरता सातत्याने वाढत असल्याचा हा पुरावा असून आपण आपल्या पायावर उभे राहत आहोत, याचे हे प्रतीक आहे.

याप्रसंगी बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी राष्ट्रीय सागरी हितसंबंधांचे कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल सदैव युद्धसज्ज, विश्वासार्ह, सुसंगत आणि भविष्यवेधी दल म्हणून राहण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले.

आयएनएस तारागिरी विषयी :

ही युद्धनौका जुन्या संरचनेच्या तुलनेत मोठी झेप असून, तिचे स्वरूप अधिक डौलदार आणि रडार क्रॉस – सेक्शन  लक्षणीयरीत्या कमी आहे. यामुळे ही नौका शत्रूच्या नजरेत न येता अत्यंत घातकपणे आणि गुप्तपणे कामगिरी करण्यास सक्षम आहे. 75 टक्क्याहून अधिक स्वदेशी बनावटीचे साहित्य असलेली ही युद्धनौका देशांतर्गत औद्योगिक परिसंस्थेच्या परिपक्वतेचे दर्शन घडवते. यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश असून, यामुळे सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमाला चालना मिळण्यासोबतच हजारो भारतीयांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

या जहाजाची लढाऊ क्षमता जागतिक दर्जाची असून, यामध्ये  पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि प्रगत स्वदेशी पाणबुडीविरोधी यंत्रणेचा समावेश आहे.

“ किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारुढ पुतळा आणि स्मारक उभारणार “ शिवंशभु प्रतिष्ठाण आणि सरहद संस्थेचा निर्धार

पुणे: मराठे शाहीचे ज्येष्ठ इतिहासकार व ज्यांनी तथ्यांवर आधारित इतिहास लेखन करून महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा दिली असे थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी कात्रज येथील रस्त्याला महाराणी ताराराणी पथ असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्याच्या समारंभात तसेच नंतर झालेल्या भेटीत त्यांनी माझ्या हयातीत किल्ले पन्हाळा येथे महाराणी ताराराणी यांचा त्यांच्या 351व्या जयंती वर्षात अश्वारूढ पुतळा आणि यथोचित स्मारक व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपूरावाही केला होता. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत त्यांना आश्वासनही दिले होते.
औरंगजेबाने जेव्हा मराठा स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले, तेव्हा ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून लढा दिला होता. सन १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो किल्ला ९ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. ताराराणींनी अतिशय कौशल्याने आणि धैर्याने मोगलांना टक्कर दिली, ज्यामुळे किल्ले पन्हाळा हा त्या काळातील मराठा सत्तेचा बळकट आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिव शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि याविषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या स्मारक उभारणीस शासनाने विलंब न लावता परवानगी द्यावी असे आवाहन महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी केले आहे

सरहदच्या वतीने,ज्याेतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करणार.

दिल्ली:
महाराजा यशवंतराव हाेळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष “महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार” भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा. ज्याेतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कारासाठीची निवड डाॅ. सदानंद माेरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने केली असून, समितीत महाराजा यशवंतराव हाेळकर गाैरव प्रतिष्ठानचे संजय साेनवणी आणि प्रकाश खाडे यांचा समावेश हाेता. समितीने हा निर्णय घेताना शिंदे घराण्याने हाेळकर घराण्याच्या खांद्याला खांदा लावून मराठेशाहीचा उत्तरेत विस्तार करण्यात बजावलेल्या माेलाच्या कामगिरीचा सन्मान यांचा विचार केला आहे. मराठा इतिहासात शिंदे आणि हाेळकर ही दाेन घराणी अनेक निर्णायक प्रसंगी परस्पर सहकार्य, सामूहिक युद्धकाैशल्य आणि राष्ट्रदृष्टिकाेनाची प्रतीके हाेती.
इतिहासात राणाेजी शिंदे आणि मल्हारराव हाेळकर यांनी दिल्लीतील मराठा प्रभाव दृढ करण्यासाठी एकत्रित भूमिका बजावली; पुढे महादजी शिंदे यांनी मराठा मुत्सद्देगिरीला सर्वाेच्च शिखरावर नेले; तर पानिपतपूर्व आणि पानिपतनंतरच्या अनेक लढायांत शिंदे-हाेळकर सहकार्याचे अनेक संदर्भ आढळतात. काही बखरींमुळे आणि नंतरच्या किरकाेळ संघर्षांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांपलीकडे जाऊन या दाेन घराण्यांच्या व्यापक ऐतिहासिक याेगदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षात दिल्लीत सरहद संस्था आयाेजित, महाराष्ट्र सदन – दिल्ली आणि मराठी भाषा विभाग – महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयाेजित केलेल्या पहिल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 राेजी महाराजा यशवंतराव हाेळकर यांच्या स्वातंत्र्यनिष्ठ परंपरेचा आणि शिंदे घराण्याच्या ऐतिहासिक राष्ट्रकार्यातील याेगदानाचा सन्मान एकाच व्यासपीठावर हाेणे, हा राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे.
ज्याेतिरादित्य शिंदे यांनी लाेकसभा सदस्य, संसदीय कार्यातील सक्रिय सहभाग, विविध केंद्रीय जबाबदाऱ्या आणि सध्या भारत सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणून सार्वजनिक जीवनात सातत्य, शिस्त आणि कार्यक्षमतेची छाप निर्माण केली आहे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक राष्ट्रकार्यातील सक्रिय सहभाग यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हि माहिती सरहद संस्थेचे समन्वयक लेशपाल जवळगे यांनी आज दिल्ली येथे एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.

स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम:पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी, अजून किती विकास हवा? विजय वडेट्टीवार यांचा उपरोधिक टोला

पुणे- येथे कालगुरुवारी अर्धा तास तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत ‘स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम’ झाल्याचा टोला हाणला.

पुण्यात 2 एप्रिल रोजी 130 वर्षांनंतरचा विक्रमी पाऊस झाला. यापूर्वी 1896 साली एका दिवसात 51.1 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर काल गुरुवारी एकाच दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला. शहरातील गंगाधाम चौकातील एक मोठी होर्डिंग पावसामुळे कोसळली. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. दुसरीकडे, अन्य एका ठिकाणी झाड कोसळून 1 महिला दगावली. या घटनेत 2 जण बालंबाल बचावले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिलं. 6 आमदार, 119 नगरसेवक, 1 खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असं असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडालं. स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत आहे.
इतरवेळी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे स्वयंघोषित शिल्पकार यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली.. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे? असा प्रश्न वडेट्टीवारांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
विजय वडेट्टीवार व विकास लवांडे या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग असलेले एक बॅनर पोस्ट केले आहे. रस्त्याच्या अगदी शेजारी लावण्यात आलेले हे बॅनर पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. या होर्डिंगवर फडणवीस यांचा उल्लेख पुण्याचे शिल्पकार व महाराष्ट्राचे नवे नेतृत्व म्हणून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पुण्यातील कालचे चित्र पाहिले की नाही? स्मार्ट सिटी होणार होती, मेट्रो सिटी असे स्वप्न दाखवण्यापेक्षा दररोजच्या सांडपाण्याचे आणि कचऱ्याचे प्रश्न जर सरकारला सोडवता येणार नसतील आणि दर पावसाळ्यामध्ये पुण्यातील रस्ते, नाले,गल्ल्या तुडुंब भरणार असतील त्यात दरवर्षी लोकांचे मालमत्तेचे नुकसान होणार असेल तर आपले सरकार नेमके काय करते?

मागील दहा वर्षात पुणे महानगरपालिकेने आलेले कोट्यवधी रुपयांच्या विविध अनुदानाचे काय केले ? त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली की फक्त कंत्राटदारांना कामे देऊन कमिशन खाल्ले? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणालेत.

पुण्यातील नदी – नाल्यांवरील अतिक्रमणे काढणार:महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा; मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

पुणे-पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार, नदी आणि नाल्यांच्या बाजूला असलेल्या बेकायदा बांधकामांचे नव्याने सर्वेक्षण करून ती अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.महापौर मंजुषा नागपुरे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सध्याचा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. यामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत आपत्कालीन बैठक घेण्यात आली.

महापालिकेने स्ट्रॉम वॉटरलाइन ड्रेनेज सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी पाइपलाइनचा आकार वाढवण्यात येणार आहे. झाडे छाटणीचे काम केवळ पावसाळ्यापूर्वीचे नसून वर्षभराचे आहे, असे सांगत नियमानुसार परवानगी देऊन कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी काढली जातील.

ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्याबाबत पंचनामा करण्यात येईल. झाड पडून मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत आणि अतिरिक्त दोन लाख रुपये निधी देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नागपुरे यांनी केली.
यावेळी उपस्थित असलेले पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी माहिती दिली की, नुकताच एका तासात १०४ मिमी पाऊस झाला, ज्यामुळे दोन ठिकाणी ढगफुटीसदृश घटना घडल्या. मनपा प्रशासन सातत्याने काम करत असून, शहराचा विस्तार वाढल्याने आव्हाने वाढली आहेत.

शहरात २२७ ठिकाणी कामे करण्याची गरज असून, ती तीन विभागांत विभागून केली जातील. यापैकी १२० ठिकाणी जूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात येतील. वर्षानुवर्षे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणांचा यात समावेश आहे.

झाड छाटणीसाठी २४ तासांत परवानगी देण्यात येईल. प्रत्येक वॉर्डला कामांसाठी दहा लाख निधी दिला जातो, परंतु खर्चात कमी-अधिकता असल्याने तशा सूचना दिल्या आहेत. शहरातील ३२ धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांचे एप्रिलपूर्वी स्थलांतर करण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकारी दररोज कामावर येण्यापूर्वी दोन तास फिरून त्यांच्या भागातील अडचणींचा आढावा घेतील, असे आयुक्त राम यांनी सांगितले.

पुणे शहर देशातील एक महत्वपूर्ण शहर आहे. दुबई, सिंगापूर मध्ये देखील १०० मिमी पाऊस एक तासात झाला तर पाणी जमा होते. त्यामुळे त्रास सर्वच ठिकाणी होत असतो. पाऊस न साचता ते तात्काळ निघून गेले पाहिजे याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे शहरात जुनी स्ट्रॉम वॉटर पाइपलाइन केवळ १६ टक्के असून ती ११३ मिमी अपेक्षित असल्याने त्याबाबत काम सुरू आहे. बेकायदा होर्डिंग्ज बाबत ऑडिट करून नवीन गाईड लाइननुसार काम करण्यात येईल.

एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकरांचेही कॉल्स

मुंबई- सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.

अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, कोणताही विषय लढण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे बरीच माहिती येते. असाच काहीसा प्रकार आत्ता झाला आहे. अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येत आहे. ती मी माध्यमांनाही देत आहे. पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आले आहे. लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटले की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मला एक सीडीआरची कॉपी मिळाली आहे. ही कॉपी व्हॉट्सएपवर ज्यांनी पाठवली, त्यांना मी ओळखत नाही. पण मी ती पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पाठवली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली.

काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली. त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली. रुपाली चाकणकर आतापर्यंत म्हणायच्या की अशोक खरात हे माझे गुरू आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही माहिती. पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले.

एकनाथ शिंदे – खरातमध्ये 17 वेळा बोलणे
अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत केवळ फोटो व व्हिडिओ पाहिले. पण शिंदे यांनी अशोक खरातला तब्बल 17 कॉल केल्याची माहिती माझ्याकडे आहे. हे सर्व नॉर्मल फोन कॉल्स आहेत. त्यांच्यात व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून किती कॉल झाले याची माहिती मला नाही. पण 17 पैकी 10 इनकमिंग व 7 आऊटगोईंग कॉल होते. त्यात एकदा दोघांत तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. ही सगळी माहिती एक जबाबदार नागरीक म्हणून मी यंत्रणांना दिली. माझी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची इ्च्छा होती. त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यात माझा दुसरा कोणताही हेतू नाही.

चंद्रकांत पाटील, तटकरे, शेलारचाही फोन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोक खरातसारख्या व्यक्तीशी 17 वेळा फोन करत असतील तर त्यांनी ते कशासाठी केले याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. आशिष शेलार यांचाही 1 कॉल आहे. हे सर्व नॉर्मल कॉल्स आहेत. कारण, व्हॉट्सएप कॉल्सची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. या लोकांनी एकमेकांशी नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सएपवरून किती संभाषण केले असेल हे सांगता येत नाही, असे त्या म्हणाल्या.

चाकणकर- खरात यांच्यात 33,727 सेकंद संभाषण

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, प्रस्तुत सीडीआरमध्ये अशोक खरात व तृप्ती खरात यांच्यात सर्वाधिक वेळा बोलणे झाल्याचे नमूद आहे. कुटुंबातील व्यक्तीशी जास्त बोलणे होते, हे आपण समजू शकतो. पण त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 33 हजार 727 सेकंद एवढे संभाषण खरातशी साधले आहे. त्यामुळे चाकणकरांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक झाली पाहिजे. एवढा वेळ कुणीही आपल्या गुरुशी बोलू शकत नाही. दोघांमध्ये एवढे मोठे संभाषण होत असेल, तर ती काय बोलत होती? याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे.

केसरकरांच्या विश्वासूचे 189 कॉल्स

या प्रकरणात तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत. त्यांचे 189 कॉल्स खरातला झाले होते. त्यांनी 30 हजार 579 सेकंद बोलले होते. ही सर्व माहिती धक्कादायक आहेत. अशोक खरातला देश व परदेशातून फोन यायचे. त्याला कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड येथूनही खरातला फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीला दिली आहे. त्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे जी-जी माहिती येईल, ती माहिती मी यंत्रणेला देईल, असे दमानिया म्हणाल्या.

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या!

आवश्यकता असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस (PNG) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक गॅसच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ना. पाटील यांची एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्याबाबत त्यांनी आढावा घेतला.

यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी एमएनजीएलच्या शहरातील पुरवठा, तांत्रिक अडचणी याबबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मागणी आणि पुरवठ्याबाबत ही सविस्तर माहिती जाणून घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने नागरिकांशी समन्वय साधून भागांत पाईप लाईन पोहोचवण्याचे काम जलदगतीने पुरवावे. तसेच, कामाला गती देण्यासाठी जर मनुष्यबळाची कमतरता भासत असेल, तर लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

“शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन”

मुंबई, दि. ३ एप्रिल २०२६ : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या.

यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील, असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.