Home Blog Page 22

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप करायचे होते असे म्हणतात , आणि पोलीस बंदोबस्तातील मोर्चामुळे ती वाहतूक कोंडीत तासभर अडकली ..अन उन्हाच्या तडाख्यात संतापाची लाही लाही झाली ..मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांसह आंदोलक महिलांना असे काही सुनावले कि जणू हि क्रांतीची ठिणगी च म्हणावी …

मुंबई: मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या महिला आघाडीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे काल (21 एप्रिल) दुपारपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत एका तासापासून अडकलेल्या एका सामान्य महिलाने आंदोलनस्थळी धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. संतापाच्या भरात तिने आंदोलन करणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली, पोलिसांना जाब विचारला आणि “बाजूच्या मैदानात आंदोलन करा, रस्त्यावर नाही!” असा आग्रह धरला. या घटनेमुळे मोर्च्याच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या महिला आघाडीने आज सकाळपासून वरळीतील एका प्रमुख रस्त्यावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत संमत न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात हा मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यामुळे वरळी आणि आसपासच्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. दुपारी एक वाजता जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

याच वेळी एका चारचाकी वाहनातून प्रवास करणारी एक महिला ही या कोंडीत अडकली होती. मात्र तासाभरापासून ट्रॅफिक जाम असल्याने महिलेला संताप अनावर झाला. ती आपली कार सोडून थेट मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांकडे धाव घेतली. “एक तासापासून इथे अडकले आहे. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर बाजूच्या मैदानात बसा! आमच्या रोजच्या आयुष्यात अडथळा आणू नका!” अशा शब्दांत तिने आंदोलनकर्त्यांवर तोंडसुख घेतले.

संतापाच्या भरात तिने काही आंदोलनकर्त्या महिलांना शिवीगाळही केली. तसेच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तिने थेट जाब विचारला. “तुम्ही काय करताय? लोकांच्या रोजगाराला, मुलांच्या शाळेला अडथळा होत आहे, तरीही तुम्ही आंदोलन चालू ठेवताय? रस्ता खाली करा!” असे म्हणत तिने पोलिसांनाही धारेवर धरले.
या घटनेमुळे मोर्च्यात काही क्षण गोंधळ निर्माण झाला. काही आंदोलनकर्त्या महिलांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तिच्या संतापाला उत्तर दिले. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सुरक्षितपणे बाजूला नेले. मात्र तिच्या आक्रोशामुळे आसपासच्या वाहनचालकांनीही हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

मंत्री गिरीश महाजन आणि महापौर रितू तावडेंसमोर जाऊन महिलेने व्यक्त केला संताप
दरम्यान, यावेळी या मोर्च्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील सहभागी झाल्या होत्या. याचवेळी संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीबाबत तक्रार केली. तसंच आपला संतापही व्यक्त केला.

सध्या वरळी परिसरात वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.श्रीनाथ भिमाले आणि महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज या परिसरातील नियोजित वाहतूक प्रकल्पांची पाहणी केली.नगरसेवक उमेश गायकवाड, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माधव जगताप, बनकर , मनीषा शेकटकर, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भिमाले म्हणाले, “शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंढवा आणि केशवनगर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयटी पार्क, नव्या निवासी प्रकल्पांची वाढ आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
विशेषतः मुंढवा येथील महात्मा फुले चौक, कल्याणी नगर–कोरेगाव पार्क मार्ग आणि अगा खान ब्रिज परिसर हे मुख्य बॉटलनेक ठरत आहेत. सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून काही महत्त्वाच्या उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कल्याणी नगर–कोरेगाव पार्क दरम्यान नवीन नदीवरील पूल उभारण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणही करण्यात येत आहे. तसेच मुंढवा चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ₹१२६ कोटींच्या फ्लायओव्हर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय हडपसर–मुंढवा–केशवनगर मार्गावरही नवीन पूल आणि रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहेत.”

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली
नाशिक :ज्याचे एन्काऊंटर होईल अशी अनेकांनी भीती व्यक्त केली त्या महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली.खरात चे मेडिकल एन्काऊंटर तर होणार नाही ना ? असा प्रश्न आता काहीजण उपस्थित करू लागलेत

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याची तब्येत अचानक खालावली. त्याला ऑक्सिजन लावण्यात आला आणि तातडीने कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मागवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

खरातच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी न्यायालयात वैद्यकीय तपासणीबाबत महत्त्वाची मागणी केली होती. खरातच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. औषधांनी फारसा फायदा होत नसल्याने त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीनंतर काही दिवसांतच त्याची तब्येत बिघडल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे. खरातशी संबंधित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याची सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि इतर संबंधांबाबत माहिती घेतल्याचे समजते. चौकशीनंतर त्या व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आले.

अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आता गुरुवारी संपणार आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार असून एसआयटीकडून पुढील कारवाई काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. नव्या माहितीच्या आधारे पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

विधान परिषदेवर भाजपचे ६ : कोणाला मिळणार संधी ?आज रात्री वर्षा निवासस्थानी बैठक

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल वाढली आहे.या निवडणुकीत एकूण 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावर पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.

पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असून, अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मुंबईत गाठीभेटी वाढवल्या असून, सह्याद्री अतिथीगृहासह विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी आपापल्या पातळीवर लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत पक्षातील वातावरण तापलेले राहणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून, दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदानाचे गणित असणार आहे.

सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, महायुतीला 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे मानले जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिक नसून, अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी ठरणार आहे. आता अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या धडकेत दोन वीज खांब कोसळले असून वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले असुन, महावितरणने दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले आहे.

या अपघातामुळे सुरुवातीला सुमारे ११ मेगावॅट वीजभार बाधित झाला होता. महावितरणच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे ७ मेगावॅट भार इतर पर्यायी मार्गाने पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, या घटनेत खांब पूर्णपणे कोलमडल्याने ‘सनसेरा’ आणि ‘अल्ट्रा’ या दोन एक्सप्रेस फीडरसह सुमारे १७ ग्राहकांचा ४ मेगावॅट वीजपुरवठा अद्याप बंद आहे. तो ही लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.महावितरणकडून नवीन खांब उभारण्याचे आणि वाहिन्या ओढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही तासांत उर्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजगुरुनगर विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी यांच्या ‘मायनोरटी अँड इंडियन ख्रिचन मेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री’ हि अधिकृत स्थापना शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता. मारिया असुंटा कोन्वेंट हॉल, रुबी हॉल क्लिनिक समोर, संजीवनी आश्रमा समोर, ढोले पाटील रोड, पुणे येथे समारंभपूर्वक संपन्न होणार आहे. बिशप सायमन अल्मेडा, बिशप अल्फ्रेड तिवाडे आणि इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुल क्रिपलानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी दिली.

या कार्यक्रमास सर्व राजकीय, सामाजिक, व्यवसायिक नेते,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,मोहन जोशी, एनआयसीएचई चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विशाल मोरेश्वर,, प्रशांत जगताप, राहुल डंबाळे, खिसाल जाफरी हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.
यासोबतच महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, आयोगाच्या माजी उपाध्यक्षा जेनेट डिसूझा, संस्थेचे अध्यात्मिक संचालक फादर एन्थोनी डिसूझा आणि पीटर जॉर्ज तसेच मारिया गोरेट्टी आणि उद्योगपती पीटर डिसूझा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

पुण्यासारखे प्रमुख शहर उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर असून पुण्यात अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे असंख्य उद्योजक व व्यावसायिक आहेत. त्यांचे संघटन करणे त्यांच्या अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे व नवीन उद्योजक व व्यावसायिक तयार होण्यासाठी प्रयत्न करणे हे संस्थेचे उद्देश असून संस्थेच्या स्थापनेनंतर किमान १००० सदस्य संख्या होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर या मॉडेलचा अनुभव लक्षात घेत महाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या शहरात आणि तालुका व जिल्ह्यामध्ये संस्थेच्या शाखा उघडल्या जातील. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी सांगितले.

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध..

पुणे: नगरसेवक पदाचे मानधान नाकारून तो निधी महापौर वैद्यकीय सहायता निधीमध्ये वर्ग करणारे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग २५ मधील नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची आज विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदभार स्वीकारतानाच बाप्पू मानकर यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारून, त्यातून वाचणारा खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आज पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत, प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांची बिनविरोध झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळातील काम हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले.

गाडीचा मोह टाळला; सेवेला प्राधान्य!

अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श पायंडा घालून दिला. महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी त्यांनी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च हा पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या


गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणा

मध्य रेल्वे (3082 फेऱ्या), पूर्व मध्य रेल्वे (2711 फेऱ्या) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (2245 फेऱ्या) हे विभाग सर्वाधिक उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवणारे प्रमुख विभाग ठरले आहेत

नवी दिल्‍ली

उन्हाळी सुटीच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीत होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने, भारतीय रेल्वे 2026 च्या उन्हाळी हंगामात विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. उन्हाळ्याच्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी, रेल्वे प्रशासनाने देशभरात मोठ्या संख्येने विशेष रेल्वे सेवांना मंजुरी देऊन महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. 15 एप्रिल 2026 ते 15 जुलै 2026 या कालावधीसाठी, एकूण 908 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे; प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या गाड्यांच्या एकूण 18262 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यापैकी, 660 गाड्यांबाबतची सूचना आधीच जारी करण्यात आली असून त्यात 11294 फेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेआधीच आपले आरक्षण आणि प्रवासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. रेल्वेचे हे व्यवस्थान सुट्ट्या, सण-उत्सव आणि गर्दीच्या महिन्यांमध्ये होणाऱ्या हंगामी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात भारतीय रेल्वेचा सक्रिय दृष्टिकोन दाखवत आहे.

विभागनिहाय तपशील

  • उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे संचालन भारतीय रेल्वेच्या सर्व प्रमुख विभागांमध्ये विस्तारलेले आहे, त्यामुळे संतुलित प्रादेशिक संपर्क आणि प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने होऊ शकते.
  • पश्चिम रेल्वेने 106 गाड्यांना (2,078 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी ९2 गाड्यांची (1,667 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.
  • मध्य रेल्वेने 74 गाड्यांना (3,082 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी 70 गाड्यांची (2,238 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.
  • दक्षिण रेल्वेने 72 गाड्यांना (558 फेऱ्या) मंजुरी दिली असून, त्यापैकी 38 गाड्यांची (133 फेऱ्या) सूचना जारी करण्यात आली आहे.

प्रवाशांची मागणी अधिक असलेल्या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडून भारतीय रेल्वे उन्हाळ्याच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याचे नियोजन करत आहे. मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या सोडून भारतीय रेल्वे प्रवाशांची सोय आणि सुखकर प्रवासाला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे.

काही ठिकाणी ओव्हरहेड शिस्तबद्ध केबल आणि काही ठिकाणी भूमिगत, बैठकित सांगितले SOP ठरवा ..

पुणे- महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड केबलचे जाळे शिस्तबद्ध करणे आणि टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यासाठी मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP करण्यासाठी आज मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी दु.१२.३० वा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीत विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर,पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुणे शहरात कोणत्या प्रकारच्या ओव्हरहेड केबल टाकण्यात येतात याविषयी विस्तृत चर्चा झाली. टेलीकम्युनिकेशन अॅक्टनुसार तसेच पॉलीसीनुसार पुणे मनपाकडून ओव्हरहेड केबल कोणत्या पद्धतीने टाकणे व त्यासाठी आवश्यक परवानग्या देणे याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्देश व सूचना देण्यात आल्या.
• ओव्हरहेड केबल्सबाबत यापूर्वी केलेले सर्वेक्षण विचारात घेऊन शहरातील उर्वरित सर्वेक्षण न केलेल्या भागांचे सर्वेक्षण करणेत यावे.
• नागरिकांना अडथळा, अपघात होणार नाही तसेच शहराचे सौंदर्यीकरणास अडथळा येणार नाही अशा पद्धतीने ओव्हरहेड केबल्स व्यवस्थापन करण्यात यावे.
• हैदराबाद शहराच्या उदाहरणाप्रमाणे पुणे शहरातील ओव्हरहेड केबलसाठी असणारी उंचीची मर्यादा, ओव्हरहेड केबल ओढणेसाठी स्वतंत्र पोल उभारणी करायची असल्यास त्यानुसार भाडे दर आकारणी प्रस्ताव तयार करावा.
• पथ विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी भूमिगत डक्ट मार्फतच केबलिंग करण्याची तरतूद करावी.
• केबल सुविधा पुरविणारे अर्जदार यांचेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे व परवानगी प्रक्रिया देणेबाबत संगणक प्रणाली वापरावी. ऑनलाईन पोर्टलद्वारे मंजुरी प्रक्रिया कार्यवाही होईपर्यंत एक खिडकी योजनेद्वारे मंजुरीची कार्यवाही मुदतीत करावी.
• मनपाकडून तसेच सर्व शासकीय विभागाकडून उदा. पोलीस, वाहतूक पोलीस, MSEDCL, MNGL इ.विभागामार्फत याकामी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याद्वारे प्रक्रियेवर देखरेख ठेवणेची व्यवस्था करावी.
• सध्या शहरामध्ये अधिकृत परवानगीशिवाय केबलचे जाळे विस्तारलेले आहे. त्याचे नियमन करणेसाठी सर्व संस्थांचे लोकप्रतिनिधी व संबंधित असोसिएशन यांनी केलेल्या सूचनांवर विचार विनिमय होऊन तसेच पॉलीसीमधील तरतुदीनुसार अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP तयार करण्यात यावी.
• पालखी मार्गाबाबत संबंधित केबल चालकांसोबत झालेल्या चर्चेनुसार सध्या पुणे शहरात असलेल्या विविध ओव्हरहेड केबल्स प्राधान्याने काढण्यात याव्यात.

वरीलप्रमाणे झालेल्या चर्चेनुसार ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्यासाठी विविध मुद्यांचा समावेश करून अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP ड्राफ्ट महापालिका आयुक्त यांचेकडे सादरीकरण करण्यात यावे असे निर्देश देऊन सदरची बैठक संपन्न झाली.

मंत्री माधुरी मिसाळांच्या पत्राने सावळा गोंधळ..

पुणे- राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्य मंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांच्या एका पत्राने पुण्यात मोठी खळबळ उडू शकणार आहे.हे पत्र मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. आणि सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले आहे.या पत्राचा मजकूर एखाद्या बातमीदाराने एखादी संशय असलेली बातमी लिहावी अशा स्वरूपाचा असल्याने आणि तो चक्क सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी दिल्याने हि खळबळ उडू पाहते आहे. तर नेमके काय आहे ते पत्र ते प्रथम पहा

प्रति, पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुणे
विषयः हिंजवडी, पुणे येथील एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात विश्रांती कक्षाच्या वापराबाबत तक्रारींची चौकशी तसेच आवश्यक प्रतिबंधक व तथ्य पडताळणी उपाययोजना करण्याबाबत.
मला विविध स्रोतांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष (resting rooms) यांच्या वापराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आणि त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.
यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वरील माहिती ही अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नसून, तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे
विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने काउन्सलिंग/संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे तरी सदर विषय संवेदनशील असल्याने, आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.

(माधुरी मिसाळ)

आता हि नेमकी कोणती कंपनी, कुठे आहे , तिथे किती महिला -पुरुष कर्मचारी आहेत ? काय चालते तिथे / हा सारा पोलीस तपास म्हणण्यापेक्षा माहिती घ्यायचा भाग आहे. जी माहिती पोलिसाच काय , कोणीही डिटेक्टव्ह, शोध घेऊ शकेल असा इसम ,राजकारणी घेऊ शकतो . मग खरोखर याबाबत मंत्री महोदयांना काहीच ठाऊक नाही काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर … काय उत्तर असेल याचा प्रत्त्येक जण आपापल्या बुद्धीनुसार विचार करू शकतो. मग असे असेल तर नेमके या मंत्री महोदयांच्या डोक्यात चाललेय तरी काय ?असाही प्रश्न उपस्थित होईल. पण आता या सर्व शंका कुशंका याबाबतची उत्तरे कदाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार जेव्हा याबाबतची चौकशी करतील ,किंवा त्यांना माहिती आता पर्यंत मिळाली देखील असेला ते काय भूमिका घेतात आणि त्यानंतर मंत्री महोदय काय भूमिका घेतात यावर मिळविता येऊ शकतील असे दिसते आहे. पण एकूणच या पत्राने पुण्याच्या राजकीय कम धार्मिक वातावरणात काहीतरी घडते आहे / अशी चाहूल जर कोणाला लागली तर नवल वाटणार नाही .

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-समाजवादी पक्ष नेतृत्वाचा समाचार

“महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी एनडीएची बांधिलकी कायम

मुंबई, दि. २१ : लोकसभेच्या अलीकडील अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकासंदर्भात होणाऱ्या बदलांना पुरेसे बहुमत मिळू शकणार नसल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. एका महिला खासदारांनी माध्यमांमध्ये बोलताना राजीव गांधींनी १९८८ सालीच महिला आरक्षण देण्यात आले होते, असा दावा केल्याचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्या काळात असे कोणतेही विधेयक अस्तित्वात नव्हते. “मी स्वतः १९८३-८४ पासून महिला चळवळीत कार्यरत आहे. १९८८ मध्ये ‘नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन’च्या बैठका झाल्या होत्या, मात्र महिला आरक्षणाचा कायदा तेव्हा आलेलाच नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण मिळावे यासाठी देशभरातील महिला चळवळीने सातत्याने संघर्ष केला. त्यातूनच ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती १९९२-९३ मध्ये मंजूर झाली, हे त्यांनी नमूद केले. मात्र त्यानंतरही १९९६ पासून ते २०२३ पर्यंत लोकसभेत महिला आरक्षण विधेयकासाठी काँग्रेसने कधीही ठोस राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोप त्यांनी केला. “आज महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसकडून ‘पुतना मावशीचे प्रेम’ दाखवले जात आहे. महिलांनी हा खोटा डाव ओळखला पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेस व समाजवादी तथा इंडिया आघाडीतील पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर टीका केली आहे. महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या पक्षांनी महिलांच्या न्यायाच्या लढ्याला वारंवार धक्का दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजवादी पक्षातील काही नेत्यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा तसेच शहाबानो खटल्यात महिलांना न्यायापासुन वंचित ठेवणारा जुलमी कायदा केला. याऊलट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मुस्लिम महिलांना कायद्याने पोटगीचा आधार मिळवुन दिल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी दि.२१ च्या वृत्तपत्रातील सविस्तर लेखातून स्पष्ट केले आहे. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, दिल्लीतील तंदुर कांड व महाराष्ट्रातील लातूरमधील कल्पना गिरी प्रकरणासारख्या घटनांचा पाहिल्यातर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर या कॅाग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्टपणे दिसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

एनडीए सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. “महिलांना राजकारणात न्याय व प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी एनडीए ,शिवसेना व महीयुतीतील पक्षांचा लढा कायम राहील,” असे त्या शेवटी म्हणाल्या.

ग्रामीण पोलिसांकडून निसर्गावर आक्रमण:नवल किशोर राम म्हणाले,पोलीस असले म्हणून काय झाले,तातडीने कारवाई करा

विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी उपस्थित केलेल्या मुद्याकडे आयुक्तांनी दिले गंभीरतेने लक्ष

पुणे -चतुश्रृंगी टेकडीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर रस्त्याच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला दस्तुरखुद्द जिल्हा पोलिसांकडून बांधकामासाठी बुजविण्यात येत आहे. यामुळे अभिमानश्री व परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना तातडीने नोटीस पाठवा असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम यांनी यासंदर्भात राम यांना निवेदन देउन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील फोटोग्राफ्स पाहून आयुक्त राम यांनी गांभीर्य ओळखून तातडीने आदेश दिले. ऍड. निकम यांनी सांगितले, की बाणेर रस्त्यावरील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून वाहणार्‍या नैसर्गिक नाला बुजवून त्याठिकाणी इमारत बुजवण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या नाल्यात कचरा असल्याने नाल्यातील पाणी लगतच्या अभिमानश्री सोसायटी व लगतच्या सोसायट्यांमधील बंगल्यांमध्ये शिरले होेते. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने नाल्याची सफाई केली होती. नुकतेच जिल्हा पोलिसांनी नाला बजुवूनच बांधकाम सुरु केल्याने यंदाच्या पावसाळयात भिषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्याची पाहाणी करायला गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली. आयुक्तांनी तातडीने जिल्हा पोलिसांना नोटीस पाठविण्याचे आदेश दिले

मधुमित्र-मधुसखी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन

◾ एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने सन २०२६ या वर्षाकरिता “मधुमित्र-मधुसखी पुरस्कार” देण्यात येणार आहेत; याकरिता नामांकन अर्ज ४ मे २०२६ अखेर सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपालकांचा सन्मान करण्यात येतो.

या पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जाणार असून, त्यापैकी एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये अशी आहे.

जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य (२० मे) साधून जिल्ह्यास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्काराची लिंक https://mskvib.org संकेस्थळावर आहे. नामांकन अर्ज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी (संपर्क क्रमांक ०२०-२५८११८५९) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पुणे जिल्हा देशात व्दितीय क्रमांकावर- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे, दि. २१: महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडयातील जनजागृती उपक्रमामध्ये पुणे जिल्ह्याने देशात द्वित्तीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ९ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यात सर्व अंगणवाडी केंद्रामधे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पंधरवाडयात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४३४ उपक्रम राबविण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्याने देशात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रथम तर बिहार राज्यातील मुझफ्फरपुर जिल्ह्याने तिसऱ्या क्रमांक पटकाविला आहे.

या पंधरवाडयाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपुर्णादेवी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले होते. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. बालकाच्या आयुष्यातील पहिली सहा वर्ष पोषण व शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची असतात. याच अनुषंगाने ‘बालकांच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षातील मेंदूचा विकास’ या मुख्य संकल्पनेवर यंदाचा पंधरवडा केंद्रित आहे. यामधे माता व बालकांचे पोषण, शुन्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदुच्या विकासाकरीता पुर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारीत पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रिनवरील वेळ कमी करण्यासाठी पालकांची भुमिका व अंगणवाडी केंद्र सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविणे या प्रमुख विषयांवर भर दिला जात आहे.

गाव पातळीवर विविध उपक्रम जिल्ह्या परिषदेच्यावतीने गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास व इतर संबंधित विभागाच्या समन्वयाने हे अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता बालक आरोग्य मार्गदर्शन शिबीरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. यामधे महिला, पालक व स्थानिक नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमामधे सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

या उपक्रमामध्ये अंगणवाडीस्तरावर झालेल्या उत्कृष्ट कामाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील तसेच महिला व बाल कल्याण सभापती अंकिता पाटील यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी वॉर रूम स्थापन

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या कामकाजाचा आढावा व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन तसेच राज्यामध्ये कार्यरत आरोग्यविषयक योजनांचे एकत्रिकरण करण्यात येऊन वॉर रूम स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाव्दारे नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी इम्युनो थेरेपी अतिशय खर्चिक असते. तिचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. या थेरेपीचे एक इंजेक्शन साधारणतः दोन लाख रुपयांच्या घरात असून, उपचाराचा एकूण खर्च जवळपास आठ लाख रुपये असतो. या उपचार पद्धतीचा लाभ राज्यातील गरजू रुग्णांना देण्यासाठी नियोजन करावे .आरोग्य योजनाचा लाभ गरजूना मिळावा, परंतु दुहेरी लाभ टाळल्यास त्याचा लाभ खऱ्या गरजुना जास्त प्रमाणात देता येईल. हा उपक्रम चांगला असून याद्वारे खऱ्या गरजुना मदत करता येईल, त्याचप्रमाणे दुहेरी लाभ देण्याचे प्रकारही टाळता येतील.

नवीन वेबसाईटची वैशिष्टे

अर्ज स्थितीची ट्रेकिंगः यापुढे रूग्णांना अर्जाची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएस, लिंकद्वारे रिअल टाईम मिळणार.

टप्प्या-टप्प्याने निधी वितरणः
अर्जाच्या मंजुरीनंतर ३० टक्के रक्कम तात्काळ, उर्वरित ७० टक्के रक्कम अंतिम मंजुरीनंतर वर्ग केली जाणार.

रिअल-टाइम वॉर रूम मॉनिटरिंग :
मंत्रालय स्तरावर वॉर रूमद्वारे सतत देखरेख, निर्णय प्रक्रियेत गती.

तात्काळ मंजुरी (कार्यालयीन आठ तासांत मंजुरी) :
उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ कार्यालयीन आठ तासांत दिली जाते.

पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया : कागदपत्रांची देवाणघेवाण किंवा कार्यालयीन धावपळीशिवाय डिजिटल पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण.

रुग्णालयामार्फत थेट ऑनलाईन अर्ज :
रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही रुग्णालयातूनच अर्ज सादर.

कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी :
आधार, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका इ. तात्काळ डिजिटल पडताळणी.

थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) : मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा पारदर्शकता वाढणार.

३ हजारापेक्षा अधिक रुग्णालयांचे जाळे : राज्यातील सरकारी व खाजगी मिळून ३,०००+ रुग्णालयांचा समावेश.

हेल्पलाईन व डिजिटल मार्गदर्शन : टोल-फ्री १८०० १२३ २२११ व वाट्अॅप द्वारे मार्गदर्शन.

मोबाईल अ‍ॅपद्वारे रुग्णालय शोधता येणार :
योजनेमधील जवळील रुग्णालय, रक्तपेढी, रुग्णवाहिका सहज शोधण्याची सुविधा.

*एनजीओ व सीएसआर भागीदारी मॉडेल * स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट सीएसआर निधीद्वारे अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध.

त्रिपक्षीय करार प्रणाली : रुग्णालय + सीएसआर संस्था + सीएमआरएफ यांच्यात विशिष्ट आजारासाठी करार खर्चाचा संयुक्त भार.

बेड मॅनेजमेंट व संसाधन पारदर्शकता :

  • धर्मादाय रुग्णालयांतील बेड उपलब्धता रिअल-टाइम पाहण्याची सुविधा.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री आरोग्य शिबिर व्यवस्थापन ऑनलाईन प्रणालीमध्ये आरोग्य शिबिरे घेतली जातात असे सांगितले. मुख्यमंत्री आरोग्य शिबिरामधील हृदय उपचाराशी संबंधीत ‘स्टेमि ईसीजी’ या वैद्यकीय तपासणीला ‘मुख्यमंत्री हृदय संजीवनी’ असे नाव देण्यात यावे असे सुचविले.

रुग्णांना तात्काळ आणि सुलभ मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘रुग्ण मित्र’ ही २४x७ टोल-फ्री हेल्पलाईन (१८०० १२३ २२११) सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे रुग्णांना डिजिटल लिंक मिळते, ज्यातून त्यांच्या परिसरातील मान्यताप्राप्त रुग्णालये, रुग्णवाहिका सेवा आणि रक्तपेढ्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.

लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून संस्था नोंदणी करून शासनासोबत भागीदारी करू शकतात. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) संस्था आणि रुग्णालय यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे महागड्या उपचारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरत आहे.

यावेळी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे,मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे,सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, डॉ.निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव – २ ई रविंद्रन, महिला व बालविकास सचिव अनुप कुमार यादव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
00000