Home Blog Page 21

‘त्या’महिलेचा VDO चित्रित करणाऱ्या पत्रकारांना भाजपाकडून धमक्या, म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२६..

भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपाची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे व यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी व मगच महिला आक्षणावर बोलावे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महिला आरक्षणावर बोलताना भाजपाने महिलांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन कोणता ते स्पष्ट करावे. सावित्रिबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली, त्यावेळी त्यांच्यावर शेणाचे गोळे मारणारे कोण होते हे भाजपाने सांगावे. सावित्रीबाईंचा या तथाकथीत धर्ममांर्तंडांनी छळ केला, त्यामुळे महिलांबद्दल भाजपा दाखवत असलेला पुळका सर्वांना माहित आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे, १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत मांडले होते ते डिलिमिटेशनचे होते, या विधेयकाआडून भाजपाला देशाचे तुकडे करायचे होते. तर मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा होता. भाजपाचे नेते डिलिमिटेशनवर काहीच बोलत नाहीत. भाजपाचा हा दुष्ट हेतू इंडिया आघाडीने ओळखला व त्या विधेयकाला विरोध केलेला आहे. भाजपा मात्र विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहे. महिलांना सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण दिले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. महिला आरक्षणाच्या नावावर राजकारण करण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या धमक्यांना घाबरु नका..
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाने वरळीत काढलेल्या मोर्चावेळी एका स्थानिक महिलेने संताप व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावले. या महिलेने मोर्चाचा त्रास झाला म्हणून संताप व्यक्त केला व ते सर्वजगभर पसरले. आपली नाच्चकी झाली हे लक्षात आल्याने आता भाजपाचे लोक मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांनाच धमक्या देत आहेत. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनही पोस्ट केला, तो काँग्रेसकडून कोठून आला अशी विचारणा करण्यात येत आहे. पण अशा धमक्यांना काँग्रेस घाबरत नाही व पत्रकारांनीही भाजपाच्या धमक्यांना घाबरू नये, असेही सपकाळ म्हणाले.

खरगेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या विधानाची मोडतोड करून ते दाखवले जात आहे, खरगे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. नरेंद्र मोदी हे ईडी व सीबीआयच्या मदतीने दहशतीचे राजकारण करत आहेत. भाजपाने या विधानावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे समजते पण निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल आसाममध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काय काय प्रकार केले, त्याकडेही डोळे उघडे ठेवून पहावे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 8 हजार 114 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली आहे.

शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग 30 5.2023 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार अनाथ निराश्रीत निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्यांची गरज असलेल्या ० ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी कौंटुबिंक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सदर योजना ही वैयक्तीक लाभाची योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणासाठी दरमहा 2250 रुपये थेट लाभ देण्यात येतो. अनाथ, निराधार, निराश्रीत बालके, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्याची मुले या योजनेचा लाभ घेतात. क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या अंगणवाडी सेविका, पंचायत समिती , तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती ढवळे यांनी केले आहे.

नदी ही आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची, अस्तित्वाची ओळख:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- नदी ही केवळ वाहणारे पाणी नसून ती आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची आणि अस्तित्वाची ओळख आहे. हीच जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी आणि “स्वच्छ नदी समृद्ध जीवन” या संदेशाला कृतीची जोड देण्यासाठी पुणे महानगरपलिका घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत नदी महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून नदी स्वच्छता, जनजागृती, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे प्रतिपादन येथे महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागामार्फत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी शहरस्तरीय नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक २२/०४/२०२६ रोजी स.६.३० ते १०.०० या वेळेत विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड याठिकाणी “नदी महोत्सब २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन समारंभ महापौर यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सनई-डोल वादनाने करण्यात आली. यानंतर वृक्ष जलार्पण, शंखनाद व नदी आरती यांसारख्या पारंपरिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. पर्यावरण विभाग उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये पंतप्रधान यांनी दिलेल्या मिशन लाईफच्या संकल्पनेनुसार प्रत्यकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत याची आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून आपण पर्यावरणातील पंचमहाभूते भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, बैंड मादरीकरण तसेच नदी संवर्धनावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नदी गीताचे व माहितीपटाचे अनावरण महापौर, मंजुषा नागपुरे यांनी केले.
नदी स्वच्छता व संवर्धनाबाबत मनोगत व्यक्त करताना आयुक्त यांनी नदी महोत्सव यांसारखे उपक्रम वारंवार आयोजित केले पाहिजे तसेच युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास ध्येयांवर विविध विभागांच्या ‘माध्यामातून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. याशिवाय मिशन लाईफच्या प्रत्येक मुद्यांवर काम केल्यास वाराणसी घाट जसा जागतिक दर्जा प्राप्त करू शकतो व पटना शहरातील नदीचा घाट हा एक सुंदर पर्यटन स्थळ होवू शकतो, त्याचप्रमाणे पुणे शहरातील सर्व नागरीकांनी प्रशासनासोबत काम केल्यास मुळा-मुठानदीच्या प्रदूषण कमी होवून लोकसहभागातून येत्या एक ते दिड वर्षांमध्ये नदीचा कायापालट आपण सर्वजण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
महापौर, मंजुषा नागपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना महापालिका आवारात प्लास्टिक बंदी करण्याचे आव्हान प्रशासनास दिले. पर्यावरण संवर्धनाकारीता सर्व स्तरांतून प्रयत्न करणे आवश्यक आहे व प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करताना नागरिकांना पर्याय देखील उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. शहरातील विविध प्रकारचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, तज्ञ व्यक्ती, स्टार्टअप यांच्या सूचना, आभ्यास व उपाययोजना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त आपला ग्रह, आपली उर्जा असून आपण सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास आपले पुणे स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे होवू शकते अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी उपमहापौर व इतर मान्यवर यांनी देखील मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
या उपक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १६ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये संगम वाडी, ओंकारेश्वर तसेच शहरातील सर्व नदी पात्रांमध्ये व घाटांमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह आयोजित करण्यात आले. या डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत नदीच्या पात्राच्या परिसरातून ४.२ टन प्लॅस्टिक, १२.३ टन राडारोडा व ७.४ टन इतर कचरा गोळा करण्यात आला.
नदी महोत्सव कार्यक्रमात महापौर सौ. मंजुषा नागपुरे,महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विरोधी पक्ष नेते निलेश निकम तसेच सोपानकाका चव्हाण, अॅड. रामचंद्र कदम,अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे,कुमार भाऊ गोसावी,नगरसेविका वृषाली आनंद रिठे, प्रिया शिवाजी गदादे, कोमल सारंग नवले, जयश्री सत्यवान भुमकर, ज्योती किशोर गोसावी, सचिन रावसाहेब मोरे, सुनिल शिंदे, . उपायुक्त अविनाश सकपाळ. संतोष वारुळे, किशोरी शिंदे, गणेश सोनुने, संदिप कदम, आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. माधना भांगरे, विजय कुमार वाघमोडे, , सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विविध खातेप्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी इ. उपस्थित होते. तसेच भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था, वर्शिप अर्थ फाउंडेशन, जी.टी.टी. फाउंडेशन, इकोएक्झिस्ट फाउंडेशन, पुणे, सागरमित्र पवनमित्र अभियान, जीटीटी फाउंडेशन, अंकुर सेंटर, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, जल बिरादरी, कर्नल साठे, एल. एम. (ग्रीन थंब, पर्यावरण गट), गंगोत्री एनर्जी प्रोजेक्ट्स प्रा. लि., जीवितनदी, बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पीव्हीजी कॉलेज, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी, विधिवत – धार्मिक साहित्याचा पुनर्वापर (मूर्ती, फ्रेम्स, पुस्तके आणि पवित्र वस्तू), यार्दी CSR, पर्यावरण विभाग, घनकचरा व्यवस्थापनविभाग, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, ड्रेनेज विभाग, उद्यान विभाग, KKNAG, do save foundation, अपेक्स कमिटी सदस्य अशा विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
नदी महोत्सव कार्यक्रमात जवळपास २००० नागरीकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी नदी संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प केला आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत त्यांना ई शपथ देण्यात आली तसेच उद्यान विभागा मार्फत रोपे वाटप करण्यात आली. पुणे शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि अधिक चांगल्या मालमत्ता गुणवत्तेसह चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 26 मधील मजबूत कामगिरी सादर

मुख्य ठळक बाबी:

  • बँकेने आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 44.7% वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी नफा 3,476 कोटी रु. होता. यात 44.5% ने वाढ झाली.
  • ठेवीनी 3 लाख कोटी रु. चा महत्त्वाचा टप्पा ओलांडून 3,18,969 कोटी रु. वर पोहोचल्या. यात वार्षिक 12.1% आणि 9.0% तिमाही वाढ
  • CASA गुणोत्तर 35.1% वर. आर्थिक वर्ष 25 मधील चौथ्या तिमाहीत 34.3% आणि आर्थिक वर्ष 26 मधील तिसऱ्या तिमाहीत 34.0%
  • एकूण ॲडव्हान्सेस 2,73,445 कोटी रु. वर, वार्षिक 11.1% वाढ
  • GNPA गुणोत्तर 1.3% वर, तिमाही ते तिमाही 20 bps ने घट आणि NNPA गुणोत्तर 0.2% वर, वार्षिक आणि तिमाही ते तिमाही दोन्हीमध्ये 10 bps ने घट
  • बँकेचा कामकाज नफा आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत 1,618 कोटी रु. वर पोहोचला, वार्षिक 23.1% वाढ

मुंबई – 20 एप्रिल 2026: YES BANK ने चौथी तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये नफ्यात सातत्यपूर्ण वाढ, सुधारित मालमत्ता गुणवत्ता आणि वेगवान वाढ दिसून आली.बँकेचा तिमाही नफा 1,068 कोटी रु. होता. यात मागील वर्षाच्या तुलनेत 44.7% वाढ आहे, तर पूर्ण वर्षाचा नफा 3,476 कोटी रु. होता. हा 44.5% ने वाढला. आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीत बँकेचे नेट इंटरेस्ट इनकम 2,638 कोटी रु. होते. त्यात वार्षिक  15.9% वाढ होऊन आर्थिक वर्ष 26 मधील चौथ्या तिमाहीसाठी नेट इंटरेस्ट मार्जिन्स वार्षिक 20 bps ने वाढून2.7% झाले. नॉन-इंटरेस्ट इनकम पूर्ण वर्षासाठी वार्षिक 15.4% ने वाढून 6,759 कोटी रु. झाले.

YES BANK चा आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीसाठीचा कामकाज नफा 23.1% वार्षिक ने वाढून 1,618 कोटी रु. झाला. बँकेचा खर्च-उत्पन्न गुणोत्तर 63% पर्यंत सुधारले. ते  आर्थिक वर्ष 25 मधील 67.3% पेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीमध्ये मालमत्तेवरील परतावा (RoA) 1.0% होता, जो आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 0.7% च्या तुलनेत जास्त आहे. एकूण ठेवी 12.1% वार्षिक वाढून 3 लाख कोटी रु. चा टप्पा ओलांडत 3,18,969 कोटी रु. वर पोहोचल्या. CASA ठेवी 14.9% वार्षिक ने वाढून 111,959 कोटी रु. झाल्या. CASA गुणोत्तर 35.1% होते. आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीतील 34.3% च्या तुलनेत जास्त आहे.

एकूण ॲडव्हान्सेस 2,73,445 कोटी रु. वर होती. मागील वर्षाच्या तुलनेत 11.1% ने वाढली. सर्व ग्राहक विभागांमध्ये वाढ दिसून आली:

• रिटेल बँकिंग ॲडव्हान्सेस: 4.7% वार्षिक वाढ

• कमर्शियल बँकिंग ॲडव्हान्सेस: 14.5% वार्षिक वाढ

• कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्युशनल बँकिंग ॲडव्हान्सेस: 19.7% वार्षिक वाढ
• रिटेल मालमत्ता वितरण ~41% वार्षिक

YES BANK देशभरात आपला विस्तार सुरू ठेवत आहे. आर्थिक वर्ष 26 दरम्यान, बँकेने 82 नवीन शाखा उघडल्या. त्यायोगे भारतभरातील एकूण शाखा नेटवर्क 1,334 शाखांपर्यंत पोहोचले. शाखांव्यतिरिक्त, बँक 249 बिझनेस करस्पॉन्डंट (BC) बँकिंग आउटलेट्सद्वारे कार्यरत आहे. बँकेकडे 1,364 एटीएम, कॅश रीसायकलिंग मशीन (CRMs) आणि बंच नोट अॅक्सेप्टर्स (BNAs) देखील ग्राहकांच्या सोयीसाठी 24×7 उपलब्ध आहेत.

YES BANK ची मालमत्ता गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली असून ग्रॉस NPA गुणोत्तर 30 bps वार्षिक ने घटून 1.3% झाले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीत NNPA गुणोत्तर फक्त 0.2% होते, जे वार्षिक आणि तिमाही ते तिमाही दोन्हीमध्ये 10 bps ने घटले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेने 81.9% चा मजबूत प्राव्हिजन कव्हरेज रेशो राखला. आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीमधील 79.7% च्या तुलनेत अधिक आहे.

निकाल आणि आर्थिक कामगिरीबाबत भाष्य करताना YES BANK चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय एम टोंस म्हणाले, “YES BANK ने आर्थिक वर्ष 26 ची सांगता मजबूत पायावर केली. Q4 RoA 1.0% साध्य करत आमच्या मार्गदर्शनाशी सुसंगत कामगिरी केली, ज्याला NIMs मध्ये 20 bps सुधारणा, खर्च-उत्पन्न गुणोत्तरातील सुधारणा आणि आर्थिक वर्ष 20 नंतरचे सर्वात कमी GNPA आणि NNPA स्तर यांचे पाठबळ होते. व्यवसायातील गती अधिक बळकट होत राहिली, ॲडव्हान्सेस आणि ठेवींमध्ये व्यापक वाढ झाली. त्याला मजबूत CASA-आधारित ठेवी प्रणालीने आधार दिला. त्यामुळे ठेवींचा खर्च कमी झाला. आर्थिक वर्ष 26 मध्ये महत्त्वाचे धोरणात्मक टप्पे गाठले गेले. त्यामध्ये SMBC आमचा सर्वात मोठा भागधारक बनला. त्यायोगे बँकेच्या दीर्घकालीन क्षमतेवरील जागतिक संस्थात्मक विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. आर्थिक वर्ष 27 कडे आपण वाटचाल करत असताना आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये फ्रँचायझी मजबूत करणे, उच्च-गुणवत्तेच्या वाढीला गती देणे आणि सर्व भागधारकांसाठी सातत्यपूर्ण मूल्य निर्माण करणारी सक्षम YES BANK उभारण्याच्या प्रवासाला पुढे नेणे यांचा समावेश आहे.” या तिमाहीदरम्यान, YES BANK ला S&P Global Sustainability Yearbook 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आले. हा सन्मान मिळवणारी ही एकमेव भारतीय बँक आहे. आणि सलग तिसऱ्या वर्षी FTSE4Good Index Series मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. बँकेला सलग चौथ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क® म्हणूनही मान्यता मिळाली. जोडीला YES BANK ने प्रीमियम बिझनेस ग्राहकांसाठी YES Grandeur Business यांसारख्या नवीन योजना सादर केल्या आणि तंत्रज्ञान व नाविन्यपूर्णता यामधील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी ACIC Launchpad उपक्रम सुरू केला.

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय

मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली. ग्रुपच्या उत्क्रांतीमधील हा एक निर्णायक क्षण असून, यातून नवी ओळख, धोरण आणि महत्त्वाकांक्षा यांचा भविष्यातील प्रगतीशी मेळ घातला गेला आहे. १२९ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आणि नव्या स्वरूपातील आधुनिक ऊर्जेने प्रेरित ही ओळख, समूहाच्या कंज्यूमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स अशा वैविध्यपूर्ण व्यवसायांमध्ये एक स्पष्ट धोरणात्मक ताळमेळ प्रस्थापित करते. या ऐतिहासिक बदलाची घोषणा मुंबईतील ‘गोदरेज वन’ या समूहाच्या मुख्यालयात आयोजित मीडिया बैठकीत करण्यात आली.

या बदलाच्या केंद्रस्थानी समूहाचे नवीन ध्येय आहे — “१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची”. ही दृष्टी समूहाचा ऐतिहासिक वारसा आणि नाविन्य व उत्तरदायित्व यांच्या संगमातून ‘शाश्वत मूल्य’ निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवते. हे ध्येय समूहाचे संस्थापक अर्देशिर गोदरेज यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, ज्यांनी सदैव आधुनिकता आणि मूल्ये यांचा अतुलनीय समतोल राखला. समूहाने आपल्या तीन मुख्य मूल्यांचा — विश्वास संपादन करणे, आनंद निर्माण करणे आणि धाडसी बनणे — पुनरुच्चार केला आहे, जी मूल्ये संपूर्ण संघटनेत नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरतील.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नियुक्त अध्यक्ष (Chairperson Designate), पिरोजशा गोदरेज म्हणाले, “’१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ हे ब्रीदवाक्य आमचा हा विश्वास अधोरेखित करते की, मूल्ये आणि परिणाम सदैव हातात हात घालून चालले पाहिजेत. जसा आमचा विस्तार होत आहे, हीच विचारधारा आम्हाला असे व्यवसाय उभारण्यासाठी प्रेरणा देत राहील जे यशस्वी असण्यासोबतच जबाबदारीचेही भान राखतील.”

समूहाने प्रगतीचा एक भक्कम ‘ट्रॅक रेकॉर्ड’ सादर केला आहे, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षांत विक्री आणि निव्वळ नफा या दोन्हीमध्ये २०% हून अधिक ‘चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर’ (सीएजीआर) नोंदवला गेला आहे. समूहाने विकासाच्या पुढील टप्प्यासाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यामध्ये १५% पेक्षा जास्त वार्षिक विक्री वाढ आणि प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) मध्ये २०% पेक्षा जास्त वाढीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक व्यवसायाकडून ‘स्टेडी स्टेट’मध्ये १८% पेक्षा जास्त इक्विटी परतावा अपेक्षित आहे. समूहाचा मानस आपल्या तीन सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांची (कंझ्युमर प्रॉडक्ट्स, प्रॉपर्टीज आणि ॲग्रोवेट) संख्या पाचपर्यंत वाढवण्याचा आहे. या पावलांमुळे पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ₹५,००,००० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.समूहाच्या विकास धोरणांचा आधार हा दृढ विश्वास आहे की, भक्कम आर्थिक कामगिरी आणि समाज व पर्यावरणावरील सकारात्मक परिणाम हे एकमेकांना पूरक असले पाहिजेत. २०२५ मध्ये, ‘डाऊ जोन्स बेस्ट-इन-क्लास सस्टेनेबिलिटी इंडेक्स’ मध्ये गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीज या दोघांनीही आपापल्या श्रेणींमध्ये जागतिक स्तरावर प्रथम स्थान पटकावले. याच पायावर भर देत, समूहाने २०३५ पर्यंत ‘नेट-झिरो’ ऑपरेशन्स (स्कोप १ आणि २) आणि २०४७ पर्यंत ‘प्लॅनेट-पॉझिटिव्ह’ सप्लाय चेनचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय, आगामी पाच वर्षांत समूहामध्ये महिला, LGBTQ+ समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व ४०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे—जे गोदरेज प्रॉपर्टीज आणि समूहाच्या कॉर्पोरेट केंद्राने आधीच साध्य केले आहे. तसेच, २०२५ मध्ये ‘गोदरेज फाउंडेशन’ने (ज्यांची गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये १५% भागीदारी आहे) एक मोठा ‘कॅश कॉर्पस’ तयार केला आहे, ज्यामुळे त्यांना आपला वार्षिक परोपकारी खर्च (philanthropic spend) पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढवता येईल.

आपल्या नवीन ध्येयासोबतच, समूहाने एका नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे, जी समूहाच्या ‘DISCO’ या इन-हाउस डिझाइन टीमने साकारली आहे. ही ब्रँड ओळख अधिक एकात्मिक आणि भविष्याचा वेध घेणारी कॉर्पोरेट ब्रँड प्रणाली तयार करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. यामध्ये नवीन व्हिज्युअल भाषा, विशेष टाइपोग्राफी (GI Sans), एक खास सोनिक (ध्वनी) ओळख आणि एका ‘सिग्नेचर’ सुगंधाचा समावेश आहे—जे डिजिटल, भौतिक आणि अनुभवात्मक स्तरावर एक सुसंगत आणि बहु-संवेदी (multi-sensory) अभिव्यक्ती प्रदान करते.

गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, तान्या दुबाश म्हणाल्या, “ही नवी ब्रँड ओळख आम्ही कोण आहोत आणि आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे प्रतिबिंब आहे. हे गोदरेज ब्रँडच्या सामर्थ्याला अधिक बळकटी देते आणि त्याच वेळी भविष्यातील आमच्या महत्त्वाकांक्षांना एक आधुनिक व एकात्मिक स्वरूप प्रदान करते. ही ओळख आमच्या प्रत्येक व्यवसायाला आपापले स्वतंत्र अस्तित्व जपून एका सामायिक ध्येयाशी अधिक सशक्तपणे जोडण्यास सक्षम करते.”

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर-प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली घोषणा

मुंबई-भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे. या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –

महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

श्री. विश्वास पाठक, श्री. प्रमोद जठार, श्री. अजित चव्हाण, श्री. अवधूत वाघ, श्री. गणेश खणकर, श्रीमती श्वेता शालिनी, श्री. शिवराय कुलकर्णी, श्री. राम कुलकर्णी, श्री. अतुल शाह, श्री. विनोद वाघ, श्री. गणेश हाके, श्री. कुणाल टिळक, श्री. विनायक आंबेकर, श्री. राजीव पांडे, श्री. पंकज मोदी, श्री. असिफ भामला, श्री. जितेन गजारिया, श्री. प्रमोद राठोड, श्रीमती प्रिती गांधी, श्रीमती शिवानी दाणी, श्री. अजय पाठक, श्री. लक्ष्मण सावजी, श्री. समीर बाकरे.

विभागीय प्रसिद्धी प्रमुख

कोकण – श्री. सतिश धारप, ठाणे – श्री. दिपेश म्हात्रे, पालघर – श्री. समीर पाटील, पूर्व विदर्भ – श्रीमती कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भ – श्री. अन्नु शर्मा, उत्तर महाराष्ट्र – श्री. गोविंद बोरसे, पश्चिम महाराष्ट्र – श्री. संजय मयेकर.

संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत 33 टक्के खासदार आमदार बसवू त्याचदिवशी ही लढाई संपवू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई- विरोधकांच्या मेंदूमध्ये नारी शक्ती संपवण्याची संकल्पना असल्याने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा संविधानविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. मात्र हे विधेयक पडले म्हणजे महिला आरक्षण थांबले असे होणार नाही. महिलांनी मैदानात उतरण्याची हीच वेळ आहे. जोवर संसदेत 33 टक्के खासदार आणि राज्याच्या विधानसभेत 33 टक्के आमदार बसवू त्याचदिवशी ही लढाई संपवू, अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपातर्फे वरळी येथे काढण्यात आलेल्या जन आक्रोश महिला संमेलनात दिला.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या जन आक्रोश महिला संमेलनात जमलेल्या हजारो महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी राहुल गांधी तसेच काँग्रेस नेतृत्वासह महाविकास आघाडी नेत्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत हजारो महिलांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
आजच्या विराट मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्तीला विरोध केला त्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे अधिकार पायदळी तुडवून ज्यांनी ढोलताशे वाजवले त्यांना इशारा देण्याचे काम या आक्रोश मोर्चाने केले आहे. आज सुरुवात झाली आहे. जोपर्यंत संसदेत मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोवर हा लढा सुरू राहील, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की 1996 सालापासून महिलांना आरक्षण देण्याचा विचार होता. मा. अटलजींनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले होते. मात्र कॉँग्रेसची निती ही महिला आरक्षणाला विरोध करण्याची होती. त्यामुळे कॉँग्रेसने यादृष्टीने कधीच प्रयत्न केले नाहीत. नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 33 टक्के आरक्षण आणण्याचा निर्णय घेतला.
मात्र या देशातील नारी शक्ती जागृत झाली तर कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल. सामान्य जनता मुख्य प्रवाहात आली तर आपली लेकीसूनांचे काय होईल याची कल्पना असल्याने विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. पण आता आग लावली नाही तर विरोधक प्रत्येकवेळी महिलांचा आवाज दाबत राहतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. एक कोटी महिलांच्या सह्या करून त्या राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या थोबाडावर माराव्या लागतील, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मीf वेदनेने बोलत आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी विधेयकाचा नव्हे तर महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. प्रत्येक भाषणात गोंडस नावे घ्यायची आणि वेळ येताच हात मागे घ्यायचे काम केल्याने विरोधकांचा महिलाविरोधी मानसिकतेचा चेहरा उघडा पडला असल्याची जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली.
आपण कित्येक वर्षे केवळ मतदान करत राहिलो. आपल्याला 50 टक्के आरक्षणाची गरज आहे हे माननीय मोदीजींनी ओळखले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर मोदीजींनी तसा विचार केला. मग विरोधकांच्या पोटात का दुखले? हीच तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे का? महिला केवळ वोट बँक म्हणून वापर करण्यासाठी आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

राजीव गांधी यांनी महिलांच्या न्याय हक्कांना डावलले,असत्य विधाने करुन महिला आरक्षणाबाबत काँग्रेस खासदार करतायेत दिशाभूल- निलम गोऱ्हे

मुंबई, दि. २२ : महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पुतना मावशीचं आहे, अशी सडेतोड टीका शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. या दोघींना घराण्याचा वारसा मिळाला आहे. महिला आरक्षणाचा फायदा सामान्य महिलांना मिळणार होता, पण त्याबाबत सुळे आणि शिंदे यांनी घेतलेली भूमिका आरक्षणविरोधी आहे, बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, महिला आयोगाच्या माजी सदस्य व बीड-धाराशिव संपर्कप्रमुख संगीता चव्हाण, विभागप्रमुख सुनीता वैती, शालिनी सुर्वे, नीलम पवार उपस्थित होत्या.

नारी शक्ती वंदन अधिनियमला विरोध करणाऱ्या काँग्रेस खासदारांचा डॉ. गोऱ्हे यांनी समाचार घेतला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत राष्ट्रीय स्तरावर विचारमंथन झाले होते. राजीव गांधी यांनी मुस्लिम महिला संरक्षण विधेयक मांडले होते. मात्र मुस्लिम समाजाती धनदांडग्यांसाठी तलाक घेणाऱ्या महिलांना पोटगीचा अधिकार मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. मुस्लिम महिलांच्या न्याय हक्कांवर कायमचा प्रहार करण्याचे काम राजीव गांधी यांनी केले, अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली. मात्र २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यात सुधारणा केली आणि तलाक पिडित मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार देण्याचे काम केले, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. मात्र काँग्रेस महिला खासदाराने महिला आरक्षणाची गरज नाही, कारण राजीव गांधी यांनी १९८६-८७ साली आरक्षण दिलं होते असे विधान केले ते असत्य आहे. जर राजीव गांधी यांनी आरक्षण दिले होते तर मग १९९६ साली संसदेत महिला आरक्षण विधेयक आणण्याची गरज का पडली, असा सवाल डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केला.

राजीव गांधी यांनी १९८६-८७ साली कोणतेही महिला आरक्षण विधेयक आणले नाही. महिला आरक्षणाचे पहिले विधेयक १९९६ साली आणले गेले, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी माहिती देऊन महिलांची दिशाभूल करु नये. महिला आरक्षणाची गरज नाही, अशी काँग्रेस खासदारांची भूमिका निंदनीय आहे. मग महापालिकांमध्ये राखीव जागांवर का महिला उमेदवार देतात, असा सवाल डॉ. गोऱ्हे यांनी काँग्रेस नेत्यांना केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला मोठं श्रेय मिळेल. त्यामुळेच मतदार संघ पुनर्रचनेला विरोध करताना काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला.
सर्वसामान्य महिला राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ नये, म्हणून काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.

जागतिक पातळीवर राष्ट्रीय संसदेत महिलांचे प्रमाण २७.५ टक्के आहे तर भारतात मात्र हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार २०६३ साली संधी समानता येईल. ४० वर्ष महिलांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवावे, अशी काँग्रेसची कुटनिती आहे. रवांडामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण ६४ टक्के, क्यूबामध्ये ५७ टक्के, बोलिविया ५१ टक्के, मेक्सिको, यूएई आणि एडोरमामध्ये ५० टक्के प्रमाण आहे. मागील २१ वर्षात सभापती पदावरील महिलांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. तत्पूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी आदरांजली वाहिली. या हल्ल्यावेळी पर्यटकांना मदत करणाऱ्या आदिल या घोडेस्वाराला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्काचे घर दिले, असे त्या म्हणाल्या.

२०२३ चे महिला आरक्षण बिल त्वरीत लागू करा,भाजपने खोटा प्रचार बंद करावा-स्वाती शिंदे, अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस

पुणे : भारतीय जनता पक्षाने खोटा प्रचार बंद करून संसदेने २०२३ साली मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी आज बुधवारी केली .

पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ., आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो., महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा’., आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे., आदी घोषणांचे फलक महिला आंदोलकांनी हातात घेतले होते.

महिला आरक्षणाचे श्रेय उपटण्याचा मोदी सरकारचा खटाटोप केविलवाणा आहे. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून महापालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले.

या आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई,दि. २२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नियुक्तीचा करार हस्तांतरण पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

एसटी महामंडळाच्या विविध जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात, तसेच परिवहन विभागाच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ ची परिणामकारकता वाढविणे हा या नियुक्तीमागील प्रमुख उद्देश आहे. रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा पण …

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.

एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल २०२६ रोजी ६५३.६३ टीएमसी आहे. गतवर्षीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२६ अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
त्यासोबतच एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले.

महसूल विभागनिहाय पाणीसाठा (कंसात धरण संख्या) यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
नागपूर – (३८७) ८०.७९, ६३.४०,
अमरावती – (२७६) ७३.७२, ६५.१३.
छत्रपती संभाजीनगर – (९२९) १२९.३७, ९७.०९.
नाशिक – (५३९) १०१.९६, ८९.२८.
पुणे – (७२४) २०६.५५, १७४.०४.
कोकण – (१७३) ६१.२४, ६२.९२.
एकूण – (३०२८) ६५३.६३, ५५१.८६.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टिएमसीमध्ये) या क्रमाने –
कोयना : ३३.६२, ३६.७६ . जायकवाडी : ४२.०३, ३४.४४. उजनी : १३.३९, (०) पेंच प्रकल्प समूह : २६.५७, २६.३५. इसापूर : २१.४५, १७.८२. भातसा : १५.७०, १४.९१. गोसीखुर्द : १४.३१, ५.९३. खडकवासला धरण समूह : ११.३२, ९.८२. मुळा : ९.५४, १०.५३. अप्पर वर्धा : १०.२१, ९.५३. अप्पर वैतरणा : ६.५२, ५.९५, भंडारदरा : ५.२५, ६.०४ टिएमसी.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

मुंबई, : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.
तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.

या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

अस्पृश्यता पाळण्याऱ्या बागेश्वरबाबाला माजी सरन्यायाधीशांचा पाठिंबा आहे का ? – सुनील माने

पुणे ता. २२ : संविधानविरोधी, विज्ञानविरोधी, अस्पृश्यता पाळून हिंदुराष्ट्राची हाक देणाऱ्या बागेश्वरबाबाची देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहकुटुंब भेट घेतली. त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले, त्यामुळे जाहीरपणे अस्पृश्यता पाळणाऱ्या बागेश्वरधाम बाबाला गवई साहेबांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी विचारला आहे.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राज्यघटनेत आपण अस्पृश्यता नष्ट केली आहे. मात्र ही अस्पृश्यता जाहीर कार्यक्रमात जोर जोरात सांगणाऱ्या बागेश्वरधाम महाराजाला भूषण गवई साहेब कुटुंबासह भेटतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात हे खूप क्लेशदायक आहे. बागेश्वरधाम बाबाच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना तयार करण्यासाठी ते प्रयत्न करतात त्यालाच प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे गवई साहेबांनी पाठिंबा व्यक्त केला असाच त्याचा अर्थ घेतला जाईल. गवई साहेबांनी आंबेडकरवादी म्हणून फार मोठी चूक केली आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशाप्रकारच्या कथित सनातनी प्रवृत्तींना दूर करण्यासाठी राज्यघटना निर्माण केली. शिक्षणाचे महत्व सांगितले. ज्या शिक्षणाने गवई साहेब सरन्यायाधीश झाले, ते आज गवई साहेबांच्या बाबत पूर्ण फोल ठरले कि काय ? अशी शंका आता येते. गवई साहेबांवर ज्या एका सनातनी म्हणवणाऱ्या व्यक्तीने बूट फेकला, आम्ही त्याचा निषेध केला. त्या संदर्भात भाषणे करून आवाज उठवला. भाषणात आम्ही आंबेडकरवादाचे, संविधानचे महत्व समजावून सांगितले. कोणी उच्च नीच नाही हे सांगितले. मात्र स्वत: गवई साहेबांनी या सगळ्या गोष्टीला हरताळ फासला. ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. गवई साहेबांकडून खूप मोठी चूक झाली असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसकडून महिलांसमवेत महाराष्ट्राचा विश्वासघात

पुणे : काँग्रेससह इंडी आघाडीने नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचाही विश्वासघात केला आहे, असा घणाघात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी केला. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्ती आणि परीसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

तेजस्वी सूर्या म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही काँग्रेस व इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाची वाट रोखली. संसदीय इतिहासात १९९६ पासून २०२६ पर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला सदैव पाठिंबा दिला आहे. आता आगामी काळात संसदेत पुन्हा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मांडले जाणार असून, त्या वेळी महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत कोणताही पक्ष करणार नाही.’

काँग्रेसचा इतिहास महिलाविरोधीच

‘काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी असून, महिलांच्या प्रगतीत काँग्रेसने कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे तुष्टीकरण करण्यासाठी गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तिहेरी तलाकच्या अमानवी व बेकायदा प्रथेचे समर्थन केले,’ अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली.

महाराष्ट्राचे मोठे नुकसान

‘परीसीमन विधेयकाद्वारे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा प्रो-रेटा बेसवर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शपने त्याला विरोध दर्शविल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असून, त्याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला अवघी एक अतिरिक्त जागा येणार आहे. मोदी सरकारच्या फॉर्म्युलानुसार, महाराष्ट्राला २४ अतिरिक्त जागा मिळतील. त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा होईल. मात्र, विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचाही विश्वासघात केला असून मतदारच विरोधकांना धडा शिकवतील,’ असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला.

इतिहासात प्रथमच महिलेने मंत्र्याला एवढ्या शिव्या दिल्या:भाजपला लोक कंटाळलेत, काँग्रेसचे मंत्री महाजनांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य

मोदी व फडणवीस सीरियल लायर

मुंबई-काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत.

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्हिडिओवरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर असल्याचा आरोप केला आहे.

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते. आज 181 महिला सभागृहात पहायला मिळाल्या असत्या.सरकारने प्रथम सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करू. आता ते सांगत आहेत की, आता प्रथम आम्ही घरांची गणना करू. तुमच्याकडे महापालिका, नगरपंचायत, पंचायती, ग्राम पंचायत आदींमध्ये सर्व रेकॉर्ड आहे. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? बहुजनांवर सातत्याने अन्याय करणारी मानसिकता आज सत्तेत आहे. ही सत्तेतील मानसिकता बहुजनांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या खोटारड्या लोकांना जनतेने आता ओळखले आहे. भाजपला लोक आज कंटाळले आहेत.नाना पटोले म्हणाले, मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे. या सत्तेचे ज्या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, याचे सर्वात मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून दिसून आला. सामान्य लोकांनी त्याला कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या.
नाना पटोले यांनी यावेळी यवतमाळच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून महिला व मुली बेपत्ता होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ यवतमाळच नव्हे तर अनेक जिल्ह्यांतून मुली बेपत्ता होत आहेत. नागपूर सारख्या शहरातूनही मुली बेपत्ता होत आहेत. त्याच्या तक्रारीही आहेत. तिथे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री राहतात. आज महाराष्ट्रातील हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुली असो किंवा महिला या महाराष्ट्रात त्यांचा सन्मान झाला पाहिजे. पण आज भाजप सरकारकडून महिलांचा सातत्याने अवमान होत आहे. ही वस्तुस्थिती आहे की, यवतमाळच नव्हे तर मुली व महिला बेपत्ता होत आहेत.