मुंबई– भाजप नेते गिरीश महाजन यांनी पंजाब दौऱ्यात शिखांच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. “काँग्रेसने शिखांवर अन्याय केला, असे वक्तव्य करून देशाची बेअब्रू केली जात आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली होती. शरद पवारांच्या या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसच्या नेतृत्वात दिल्ली आणि संपूर्ण भारतात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही. काँग्रेसने केलेल्या या अत्याचाराचा निषेध आम्ही जन्मभर आणि शेवटपर्यंत करू,” असा घणाघाती पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या पंजाब दौऱ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मी शरद पवार यांचे संपूर्ण भाषण ऐकलेले नाही, त्यामुळे थेट टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र, गिरीश महाजन यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर कोणताही प्रश्न उरणार नाही. शिखांचे नववे गुरू यांच्या ३०० व्या शहिदी दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. याच कृतज्ञतेपोटी पंजाबमधून महाराष्ट्र सरकारचा गौरव करण्यासाठी गिरीश महाजन यांना निमंत्रण आले होते.”
गिरीश महाजन यांच्या दौऱ्याबाबत पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन केवळ दर्शन घेतले. ते अतिशय थोडा वेळ त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे कोणाचा फोटो लागलेला आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी आपल्या भाषणात केवळ शीख समाजाचा गौरव केला आहे. भारताच्या वाटचालीत शीख समाजाचे योगदान आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेले कार्य यावरच महाजन बोलले आहेत. तसेच पंजाबमधील वाढत्या ड्रग्सच्या समस्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे अन्य कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही.”
शरद पवारांनी गिरीश महाजन यांच्या विधानावरून भाजपवर देशाची बेअब्रू केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींच्या जखमांवर बोट ठेवले. शिखांचा दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, संपूर्ण भारताने कत्लेआम झाला. काँग्रेसच्या नेतृत्त्वात हा कत्लेआम झाला, सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की, आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत नवीन किर्तीमान स्थापित केला आहे. ४३९९ दिवस हा केवळ काळ नाहीये. हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळात लिहिला गेला, असा सुवर्ण काळ आहे.”
“पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ हा देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचा काळ आहे. देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे तयार झाल्याचा हा काळ आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेत, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावले, तो हा सुवर्ण काळ आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला, तो हा काळ आहे. या काळात आत्मनिर्भर भारत तयार होताना आपण बघितला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो. जो भारत संपूर्ण शस्त्रात्रे आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयांचे शस्त्रात्रे निर्यात करतोय. भारताने युपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टम गेटवे जगाला दिला आणि जगातील ३० देश युपीआय वापरत आहेत, असा भारत मोदींनी उभा केला आहे,” असे फडणवीस म्हणाले.
“भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचे कार्य मोदींनी या काळात केलेले आहे. म्हणूनच मला असे वाटते की, केवळ लाँगेस्ट सर्व्हिंग असे नाही, तर ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल. विकासही आणि विरासतही अशा पद्धतीने ज्यांनी कार्य केले, त्या पंतप्रधान महोदयांचे मनापासून आभार मानतो,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलंय. आपले जवळपास १०० धरणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारने मदत केली. महाराष्ट्रात वाढवन सारखे बंदर, हायवेज, मेट्रो, ट्रेनचे नेटवर्क, नवी मुंबईचे एअरपोर्ट, मेट्रो-३ असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे. पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

