गेल्या 15 वर्षांच्या काळात एका नव्हे तर दोनदा मराठी माणसाने दिल्लीचे राजकीय तख्त पार हादरवून सोडले आहे. 2011 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रूपाने, तर आता नव्या दमाच्या अभिजीत दीपके या तरुणाच्या रूपाने मराठी माणसाचा आक्रमक बाणा संपूर्ण देशाने पाहिला.इतिहास साक्षी आहे की, मराठी माणसाने आपल्या हिमतीच्या जोरावर अनेकदा ‘दिल्लीचे तख्त’ राखले आहे. मात्र प्रसंग आल्यास ते तख्त हादरवण्याची क्षमताही त्यांच्यात आहे हे स्पष्ट झाले आहे. 2011 साली अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि भ्रष्टाचाराविरोधात छेडलेल्या आंदोलनाने तत्कालीन यूपीए सरकार पूर्णपणे हादरले होते. त्या आंदोलनातून देशात नवीन नेतृत्व उभे राहिले आणि 2014 मध्ये सत्तांतर झाले.
आता 2016 मध्ये अभिजीत दीपके या तरुणाने सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षांत अनेक मोठी आंदोलने झाली, मात्र एकाही आंदोलनामुळे मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. हा ऐतिहासिक चमत्कार अभिजीत दीपकेच्या आंदोलनामुळे घडला आहे.
कोण आहे अभिजीत दीपके?
मूळ गाव : हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी.
वास्तव्य : वडिलांच्या नोकरीमुळे छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण व वास्तव्य.
शिक्षण : पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण, त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये एम.एस्सी. (M.Sc.).
अनुभव : 2020 ते 2022 दरम्यान ‘आम आदमी पार्टी’च्या (AAP) सोशल मीडिया टीममध्ये प्रमुख स्वयंसेवक म्हणून काम. 2020 च्या दिल्ली निवडणुकीतील अनेक प्रसिद्ध राजकीय मीम्सची संकल्पना त्याचीच होती. शिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना कशी झाली?
या पक्षाच्या स्थापनेमागे सरन्यायाधीशांची एक टिप्पणी कारणीभूत ठरली. 15 मे 2026 रोजी बोगस पदव्यांशी संबंधित एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी “काही बेरोजगार लोक झुरळांसारखे (कॉकरोच) असतात, जे सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून सरकारला ट्रोल करतात,” अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्याला उपरोधिक उत्तर देण्यासाठी 16 मे रोजी अभिजीत दिपकेने ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली. सोशल मीडियावर पक्षाचे सदस्यत्व जाहीर करताच काही दिवसांतच CJP चे फॉलोअर्स भाजप-काँग्रेससारख्या बड्या पक्षांपेक्षाही अधिक झाले.
NEET पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 28 जून रोजी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले. 20 व्या दिवशी, म्हणजे 18 जुलै रोजी पोलिसांनी वांगचुक यांचे उपोषण जबरदस्तीने मोडून त्यांना रुग्णालयात हलवले. यानंतर अभिजीत दीपकेने आंदोलनाची सूत्रे हाती घेत 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चाची हाक दिली.
20 जुलैच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन अधिक चिघळलं. पोलिसांचा लाठीचार्ज आणि दडपशाहीनंतरही ‘जेन झी’ तरुणाईने सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने मुंबई, पुणे, पाटण्यासह देशभर आंदोलनाची आग पसरवली.
सोशल मीडियाच्या हत्याराचा प्रभावशाली वापर करत जेन झी ने हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पसरवलं. परिणामी तरुणाईच्या या आंदोलनामुळे अखेर सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या आधी जवळपास 14 वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने दिल्ली हादरवून सोडली होती. आताही नव्या दमाच्या मराठी माणसाने दुसऱ्यांदा दिल्ली हादरवल्याचं दिसून आलं.

