पुणे, ता. २१ – धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या (रविवारी) ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात ३० हजार हिंदू नागरिक सहभागी होतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, ‘तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.
सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे.
विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण,पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.