पुणे : सन 2017-18 मध्ये राज्यातील यवतमाळ तसेच इतर जिल्ह्यातील शेतमजूर / शेतकरी यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाल्या प्रकरणी कृषि विभागामार्फत कीटकनाशके उत्पादन व साठवणुकस्थळे तपासण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली. या तपासणी दरम्यान कीटकनाशके कायदा, 1968 व कीटकनाशके नियम, 1971 मधिल तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सहा कंपन्यांचे परवाने रद्द, 2344 प्रकरणामध्ये रु. 14.56 कोटीच्या साठ्यास विक्री बंद आदेश,कीटकनाशकाचा रू. 744.46 लाख रक्कमेचा साठा जप्त, 198 परवाने निलंबीत, 53 परवाने रद्द, 13 पोलीस केसेस व 186 कोर्ट केसेस दाखल इत्यादी कारवाईंचा समावेश आहे, अशी माहिती पुणे कृषि आयुक्तालयाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम, 2018 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेची, योग्य शिफारस असलेली कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात उत्पादित तथा आवक होत असलेल्या साठवणुकस्थळांवरील कीटकनाशकांची अचानक तपासणी करून नमुने काढण्याची मोहीम दिनांक 12 जुलै, 2018 ते 14 जुलै, 2018 या कालावधीत राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत राज्यातील प्रमुख स्थळांवरून एकाचवेळी नमुने घेण्यात आले. अशा अचानक तपासणीद्वारे शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या व योग्य शिफारस असलेल्या कीटकनाशकांची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले आहे.
या मोहीमेसाठी प्रत्येक स्थळासाठी एक प्रमाणे 65 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात आली. या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी यांची नियंत्रक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच ही मोहिम योग्यरित्या हाताळणीसाठी राज्यस्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली.
मोहिमेची वैशिष्ट्ये: राज्यातील एकूण 342 कीटकनाशके साठवणुक स्थळांची एकाचवेळी तपासणी करण्यात आली., एकूण 652 कीटकनाशकांचे नमुने एकाचवेळी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले., कीटकनाशके कायदा, 1968 व कीटकनाशके नियम, 1971 मधिल तरतुदींनुसार साठवणुक व विक्री करीत नसलेल्या 17 केंद्रांचे परवाने निलंबित / रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे., राज्यात 9 प्रकरणी कीटकनाशकाच्या 12.75 मे. टन साठ्यास विक्री बंद आदेश.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील कीटकनाशके उत्पादक, वितरक व विक्रेते यांना आवाहन करण्यात येते कि, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची, कीटकनाशके पुरवठा करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत शिफारस व मान्यता नसलेली कीटकनाशके शेतकऱ्यांना विक्री करू नयेत. शिफारस केलेल्या पिकासाठीच कीटकनाशकाचा पुरवठा करावा. कीटकनाशकाच्या वापरासाठी शिफारस केलेले पिक ज्या भागात आहे त्याच भागात कीटकनाशकांची विक्री करावी.
कीटकनाशकांची फवारणीसाठी राज्यात प्रमुख पिकांसाठीच्या शिफारशींची माहिती ‘mahaagricropsap.gov.in’ या वेब साईटवरील ‘Mobile App New’ मधिल ‘Crop-Clinic’ या मेनुमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. सदरची माहिती प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर या वेब साईट वरील “mobile app” डाऊनलोड केल्यावरही सहज बघता येईल. तसेच केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद कीटकनाशक निहाय पिकासाठी केलेल्या शिफारशी कृषि विभागाच्या “krishi.maharashtra.gov.in” या वेबसाईटवर ‘निविष्ठा’ या तपशिलातील ‘कीटकनाशके’ या मेनुमध्ये उपलब्ध केलेली आहे. शेतकरी बांधवांनी या वेब साईटवरील शिफारशींप्रमाणेच कीटकनाशकांचा योग्य वापर करावा. कृषि विद्यापिठे, कृषि शास्त्रज्ञ, कृषि तज्ञ व कृषि विभागाचे कर्मचारी/ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मान्यता असलेले, योग्य शिफारशीचे व योग्य पिकासाठी योग्य त्या कीटकनाशकाचा वापर करावा. कीटकनाशकांची आवश्यकते प्रमाणेच खरेदी करावी. कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा. कीटकनाशकांची फवारणी करतांना संरक्षक कीटस् चा वापर करूनच फवारणी करावी. ज्या पिकासाठी कीटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली आहे त्याच कीटकनाशकाचा वापर करावा. कीटकनाशकांच्या विषबाधेची लक्षणे जाणवताच उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात जावे, असेही आवाहन मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी केले आहे.