आधी स्वतःसाठी एक न्यायालय स्थापन करा. ज्या लोकांना भाजपने आपल्या पक्षात ठेवलं आहे, ज्यांच्यावर आरोप होते, आणि ते आरोप खूप गंभीर होते, ज्यांच्याबद्दल मोदी यांनी स्वतःच आपल्या भाषणांमध्ये सांगितले की या लोकांनी कितीतरी घोटाळे केले आहेत, त्यांनाच यांनी पक्षात आणले, मग त्यांच्यावर जलदगतीने कारवाई का करू नये? त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी का केली जात नाही? जी चौकशी सुरू होती ती का थांबवण्यात आली? आधी या प्रश्नाचे उत्तर द्या, असा थेट हल्लाबोल खासदार कपिल सिब्बल यांनी केला.
मोदी यांनी पेपरफुटीवरून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून कडक शिक्षा केली जाईल, असे म्हटले होते. यानंतर कपिल सिब्बल यांनी तोफ डागली. कपिल सिब्बल म्हणाले की, आज आंदोलनाचा कोणता दिवस आहे? तेव्हापासून त्यांनी काही सांगितले आहे का? काही भाषणे दिली आहेत का? मुलांशी बोलले आहेत का? आणि जेव्हा मुले उपोषणात होती, तेव्हा ते शांत होते, बरोबर? आता त्यांना कल्पना सुचली आहे. कारण उलटगणती सुरू झाली आहे, आता त्यांना वाटते की त्यांचे नियंत्रण सुटले आहे, म्हणूनच ते बोलत आहेत.
ते पुढे म्हणाले, भारतातील लोकांमध्ये खूप राग आहे, तरुण त्यांच्या विरोधात आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, योग्य शिक्षण मिळत नाही, किंवा परीक्षा दिल्यानंतर चांगले निकालही लागत नाहीत. ते म्हणतात की ओएमआर शीट बनावट आहे. आणि हे 2017 पासून घडत आहे. अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. अगदी अलीकडेच, नीट (NEET) नंतर महाराष्ट्रात टीईटी (TET) परीक्षेचा पेपरही फुटला. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त एकाच मुद्द्याची चिंता आहे, हिंदू-मुस्लिम. आणि जय श्री राम आणि मध्य प्रदेश विधानसभेत “जय श्री राम” ची घोषणा दिली जाते. मुख्यमंत्री आपल्या जागेवर बसून फक्त “जय श्री राम” चा जयघोष करतात, असा टोला त्यांनी लगावला.

