पुणे- आचार्य अत्रे हे महाराष्ट्राला लाभलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचे सर्व क्षेत्रांवर प्रभुत्व होते, असे प्रतिपादान गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी केले.
येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे विनोद विद्यापीठ शिवाजीनगर येथे आयोजीत साहित्य सम्राट आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बाबुराव कानडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कोमरपंत म्हणाले, अत्रे हे महाराष्ट्राच्या साहित्यीक, कला, समाजकारण, चित्रपटसृष्टी, राजकारण, पत्रकारीता, या सर्वच क्षेत्रात काम करणारे एक प्रतिभाशाली व्यक्तीमत्व होते. अत्रे महाराष्ट्राचे शक्तीपीठ होते. त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली. जिवनाच्या अनेक समस्यांवर तोडगा काढतांना त्यांच्यातील एक लेखक प्रगल्भ होत गेला. मराठी रंगभुमीला जीवंत ठेवण्यात अत्रेंच योगदान मोठे आहे. नवयुग वाचनमाला आणि दै. मराठा हि त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी व्यंगचित्रे रेखाटली आणि त्यातून टिका देखील केली पण विडंबन कधीच केले नाही.
डॉ. कोमरपंत यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने अत्रे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच चित्रपट, नाटक, कविता, पत्रकारीता, राजकारण, आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात अत्रेंनी दिलेल्या योगदानाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.