पुणे: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव जनसामान्यांवर वाढत आहे. या परिस्थितीत बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील मोठे आव्हान असून पत्रकारांनी त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्य अधिकारी संतोष अजमेरा यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय, पुणे व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते श्री. अजमेरा बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, विभागीय उपसंचालक मोहन राठोड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख संजय तांबट, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होत्या.
श्री. अजमेरा म्हणाले, पत्रकार दिन दररोज साजरा करायला पाहिजे कारण रोजच्या घडामोडींची माहिती घेतल्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. वृत्तपत्र जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व मोठे आहे. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती रिपोर्टर झाला आहे. काही व्यक्ती बातमीची विश्वासार्हता न तपासता बातमी देतात त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात टिकण्यासाठी निर्भिड, नि:पक्षपाती असण्याबरोबरच वाचन व लिखाणाची आवड असणे आवश्क आहे.
श्री. राठोड म्हणाले, दिवसेंदिवस मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच वेब माध्यमांचा प्रभावीपणे वापर होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात सध्या नवनवी आव्हाने समोर येत असून यापुढील काळातही ती येतच राहणार आहेत. पत्रकारांनी व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी या आव्हानांवर मात करुन पुढे जाण्याची गरज आहे.
श्री. काळे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात सुरुवातीपासून वेगवेगळया आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये माध्यमांत टिकून राहून काम करणे हे देखील आव्हान आहे. या क्षेत्रात अभ्यासू, प्रामाणिक, जिज्ञासू व कष्टाळू व्यक्तींची गरज आहे. समाजाच्या बदलत्या परिस्थितीनुसार वृत्तसंस्थांमध्ये व पत्रकारांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास, वाचन व लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. डुंबरे म्हणाले, सध्या सोशल मिडीया वेगवान व प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी माध्यमे व पत्रकार महत्वाचा भाग आहे. माध्यमांमध्ये मालकी रचना बदलल्यामुळे या क्षेत्रात चांगली विचारधारा असणाऱ्या माणसांची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तांबट यांनी केले. तर आभार वृषाली पाटील यांनी मानले. यावेळी पत्रकार, माहिती सहाय्यक जयंत कर्पे, रोहित साबळे, मिलिंद भिंगारे, ज्ञानेश्वर कोकणे, विशाल कार्लेकर, विलास कुंजीर, मोहन मोटे, पंढरीनाथ शेलार, सुनील झुंजार व विशाल तामचीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.