पुणे, दि. 26: अपंगत्वावर मात करुन आयुष्याची परिक्रमा करण्यासाठी व अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
अल्पबचत भवन येथे अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), बालकल्याण संस्था पुणे व अनाथ संस्था, पुणे यांच्यावतीने दिव्यांगासाठी व पुणे जिल्हयातील अपंगांच्या विशेष शाळेतील शिक्षक तसेच मतीमंद व बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. बापट बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, यशदाचे सह-प्राध्यापक डॉ. डी.टी.देशमुख, प्रसिध्द बासरीवादक पंडित केशवजी गिंडे, सुरेश पाटील, वसंत ठकार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. बापट म्हणाले, एकुण लोकसंख्येच्या दहा टक्के इतके विकलांगांचे प्रमाण असून अशा विकलांगांना निर्धारपूर्वक उभे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपला सहयोग देणे आवश्यक आहे. अपंगत्वावर मात करुन त्यांच्या मानसिकता, शारिरीकता आणि भावना यांचा सारासार विकास होण्यासाठी राज्य शासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, कार्येकर्ते यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. विकलांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणात्मक वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अंदाजपत्रकीय तरतूदीमध्ये अधिक तरतूद होण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात अपंग विकास आयुक्त नितीन पाटील यांनी कार्यशाळे मागची भूमिका विषद करताना सांगितले, राज्यात एकुण 700 विकलांगांच्या विशेष शाळा आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अशा प्रोत्साहनपर कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई येथे कार्यशाळा भरविण्यात आल्या आहेत. संगीत,नृत्य, ध्यान धारणा, विविध क्रिडा प्रकारांचा या कार्यशाळेत अंतर्भाव केला असल्याने विकलांग विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढविण्यास याचा मोठा फायदा होत आहे.
दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत पहिल्या सत्रात नृत्य, संगीत, ध्यान धारणा यावर आधारित कार्यक्रम पार पडले. यावेळी पंडित केशवजी गिंडे यांचे बासरीवादन झाले. तर दुसऱ्या सत्रात योगाभ्यास, निसर्गोपचार, आहारचिकित्सा, हास्योपचार याविषयी विशेष शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाची पालकमंत्री यांनी पहाणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मिनल कातर्णेकर यांनी केले. या कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे अनिल मोरे, आशुतोष ठाकूर, मनिषा परब, सतीश नगरे तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.