पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०१६: दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व आपल्या गावातील पाण्यासाठी काम करण्याची आपली जबाबदारी आहे याची जाणीव खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक व्यक्तिंच्या मनामध्ये निर्माण करणे हे आपले ध्येय आहे असे आमीर खान यांनी सांगितले.
आमीर खान यांनी स्थापन केलेल्या ‘पानी फाउंडेशन’तर्फे सुरु करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियाना’मध्ये, आज ‘भारतीय जैन संघटना (बीजेएस)’ सहभागी झाली. २०१६ मध्ये हे अभियान, महाराष्ट्रातील ३ तालुक्यांमधील ११६ गावांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आले. आता हे अभियान, ‘बी.जे.एस.’च्या सहकार्याने, ३० तालुक्यांमध्ये राबविण्यात येईल. या दोन्ही संघटनांच्या स्वयंसेवकांसाठी, आज पुण्यामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी आमीर बोलत होते.
‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’, या टी. व्ही. कार्यक्रमाचे दिग्दर्शक असलेले, सत्यजित भटकळ, ‘बी.जे.एस.’चे संस्थापक शांतीलाल मुथ्था, जलसंधारण तज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ आणि ‘पानी फाउंडेशन’च्या मुख्य संचलन अधिकारी रीना दत्ता, प्रफुल्ल पारख हे यावेळी उपस्थित होते.
आमीर खान आणि भटकळ यांनी, या अभियानाचा संपूर्ण आराखडा सादर केला, व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या योजनेचे स्वरूप समजावून सांगताना आमीर खान म्हणाले, “श्रमदान आणि लोकसहभाग ही या योजनेची मुख्य तत्त्वे आहेत. श्रमदानामुळे लोकांमधील अंतर पूर्णपणे मिटते. ‘पानी फाउंडेशन’चे काम हे केवळ लोकांना माहिती व प्रशिक्षण देण्याचे आहे. त्यांना आम्ही पाणलोट विकास तंत्रामध्ये प्रशिक्षित करतो. त्यांनतर प्रत्येक गाव श्रमदानाच्या बळावर पाणलोट यंत्रणा निर्माण करते. त्यातून जलसंधारण होते. हे पूर्णपणे गावकऱ्यांचे यश आहे.”
‘पानी फाउंडेशन’ने या अभियानाअंतर्गत, या वर्षी एप्रिलमध्ये ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही स्पर्धा, घोषित केली होती. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि अमरावती जिल्हातील वाठोडा, या तीन तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यातून, ११६ गावांनी १३६८ कोटी लिटर बचत होईल, इतकी मोठी यंत्रणा निर्माण केली, ज्याचे मूल्य सुमारे २७० कोटी रुपये एवढे आहे.
यावेळी बोलताना शांतीलाल मुथ्था म्हणाले, “महाराष्ट्र गेली अनेक वर्षे दुष्काळामुळे होरपळत आहे. अनेक जण, महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी काम करीत आहेत. त्यामध्ये आमीरचे काम मोठे लक्षणीय आहे. इतका लोकप्रिय अभिनेता या कामात उतरतो, ज्याच्यापुढे अनेक पर्याय खुले आहेत, त्याचे लक्ष मात्र जाते, ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्याकडे. हे खूप विरळ आहे आणि यातूनच क्रांतीचे बीज रोवले जाते.”
‘बी.जे.एस.’च्या कार्याबद्दल माहिती देताना मुथ्था म्हणाले, की या संस्थेने गेली तीस वर्षे, संकटग्रस्त मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे काम केले आहे. लातूर, गुजरात, नेपाळ, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीर येथील भूकंपांनंतर अशी मदत करण्यात आली. मुलांना पुण्यात आणून, त्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे काम करण्यात आले. तसेच, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील, १००० मुलांचे आणि आदिवासी कुटुंबांतील मुलांचे, शैक्षणिक पुनर्वसनाचे काम सध्या वाघोली येथील ‘भारतीय जैन संघटने’च्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये सुरु आहे.
२०१३च्या दुष्काळामध्ये, संस्थेने बीड जिल्ह्यातील १००हून अधिक तलावांमधून गाळ काढून, त्यांना पाणी साठविण्यासाठी सक्षम केले. अशाच प्रकारचे काम २०१६ मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. आता २०१७ पासून ‘बीजेएस’, ‘पानी फाउंडेशन’ बरोबर संपूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे, मुथा यांनी सांगितले.
आपल्या मनोगतामध्ये भटकळ यांनी ‘बी.जे.एस.’ आणि ‘पानी फाउंडेशन’च्या सहयोगाबद्दल आनंद व्यक्त केला. “या उपक्रमाला ‘बी.जे.एस.’च्या सहभागामुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. दोन संस्था एकत्र येतात, तेव्हा त्यातील माणसे एकत्र येतात.
डॉ. पोळ लोकसहभागाचाच मुद्दा अधोरेखित करताना म्हणाले, “जलसंधारणाच्या कामाचा कणा हे आज मशीन होऊन बसले आहे. मात्र त्याचा केंद्रबिंदू लोक व्हायला हवेत. यानिमित्ताने माणसे स्वतःला एकमेकांशी जोडून घेत असून, एक महत्त्वाचा प्रवास सुरु होत आहे.”आमीर खान आणि शांतीलाल मुथा यांच्या संस्था एकत्र येणे, हा प्रीतीसंगम असल्याचे, डॉ. पोळ यांनी नमूद केले. आमीर खान यांनी बीजेएसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर प्रश्नोतराचा तास घेऊन सर्वांच्या शंका दूर केल्या.
अमीर खान यांनी आपल्या भाषणात जलसंधारणाचे कार्य पूर्ण महाराष्ट्रभर वाढविण्यासाठी शांतीलाल मुथ्था व बीजेएस यांनी यामध्ये सहभाग घेण्यासंदर्भात एक वेगळेच उदाहरण दिले. महाभारतामध्ये कौरव व पांडव यांच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने कौरवांना मी पाहिजे कि माझे सैन्य पाहिजे, काय पाहिजे हे विचारले त्यावेळी कौरवांनी श्रीकृष्णाचे सैन्य मागितले व पांडवानी श्रीकृष्णाला मागितले. आज तर मला या ठिकाणी शांतीलाल मुथ्थाच्या रूपाने कृष्ण मिळाले आहेत व बीजेएसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमाने सर्व सैनिकही मिळाले आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.
- यावेळी शांतीलाल मुथ्था यांनी बीजेएसच्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी तीन वर्षात दुष्काळामध्ये झोकून देऊन काम करण्याची शपथ दिली व महराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने शपथ घेऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या कार्याचा शुभारंभ करून नारळ फोड ला प्रफुल्ल पारख यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच आभारप्रदर्शन केले.