पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०१६ : “माझ्या आयुष्यावर माझ्या आईचा खूप मोठा प्रभाव आहे. माझी आई, हीच माझी प्रेरणा आहे,” असे म्हणत आज प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनी आज वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुनर्वसन केंद्रातील आदिवासी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी, संवाद साधला. सेल्फी काढले, फोटो काढले, गाणी गायली आणि फुल टू धमाल केली. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यावेळी उपस्थित होते.
भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन केंद्रामध्ये, ठाणे आणि मेळघाट परिसरातील आदिवासी विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची, अशी मिळून सुमारे १००० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांचा राहण्याचा आणि शिक्षणाचा सगळा खर्च भारतीय जैन संघटनेतर्फे केला जातो. आमीर खान यांनी ‘सत्यमेव जयते,’ हा सामाजिक विषयाशी संबंधीत टीव्ही शो केला आणि त्यानंतर ‘पाणी’ या विषयाला धरून काम करण्यासाठी, ‘पानी फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यासाठी आज आमीर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यानी आवर्जून वाघोली येथील केंद्राला भेट दिली.
आमीर आल्या आल्याच मुलांनी टाळ्या वाजवून, आमिरचे स्वागत केले. आमीरने भाषण करण्याऐवजी, मुलांशी बोलण्याचा मनोदय व्यक्त केला आणि ते सरळ माईक घेऊन विद्यार्थ्यांमध्ये गेले. तुमच्या आयुष्यात, तुमचा आयडॉल कोण असा प्रश्न, एका विद्यार्थिनीने विचारल्यावर, आमीर म्हणाले, “माझी आई, हीच माझी प्रेरणा आहे. मी जे काही शिकलो, ते आईकडूनच शिकलो.”
एका मुलाने विचारले, की तुम्ही सत्यमेव जयते’,ची निर्मिती का केली. त्याला उत्तर देताना, आमीर म्हणाले, की “मला ज्या समाजाने, इतके काही भरभरून दिले आहे, त्या समाजासाठी काही करावे अशी इच्छा होती. त्यातून ‘सत्यमेव जयते’चा जन्म झाला. क्रियेटीव्ह लोक काय देऊ शकतात समाजाला, आपल्याकडे जे आहे, तेच दिले पाहिजे, आपल्या कृतीतून आपण समाजामध्ये प्रेरणा निर्माण करू शकत असू, तर ती केली पाहिजे, हे लक्षात आले आणि ‘सत्यमेव जयते’ची निर्मिती झाली.
‘पी के चित्रपट काढण्यामागचा उद्देश काय?तुमचे शिक्षण किती झाले आहे, तुम्ही शाळेत असताना कसे होता, ‘पानी फाऊंडेशन’चा उद्देश काय, दंगल हा सिनेमा काय आहे, असे एकामागोमाग एक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. मुलांनी आणि मुलींनी, सत्यमेव जयते’, या कार्यक्रमातील भोलीसी चिडिया’, ‘मुझे क्या रोकेगा पैसा’, ही गाणी, पहेला नशा, पहेला खुमार’, अशी आमीरच्या चित्रपटातील गाणी मुलांनी गायली, तर ‘भगवान है कहा है तू’, या गाण्यावर एका मुलाने नाच केला. यावेळी आमीर हे मुलांमध्ये गेले, खाली जमिनीवर बसले, मुलांना त्यांनी आलिंगन दिले आणि थोडावेळ ते लहान मुलच झाले होते. आमीर यांनी यावेळी ‘थ्री इडियट’ चित्रपटातील संवाद म्हंटले आणि ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपटातील, ‘आये हो मेरे जिंदगीमे, तुम बहार बनके’, हे गाणे म्हंटले.
विद्यार्थ्यांना सल्ला देताना, आमीर म्हणाले, “मी लहानपणी पतंग उडवायचो, खूप खेळायचो. तुम्हीही खूप खेळा. या वेळेचा उपयोग करून घ्या. नापास झालात तरी घाबरू नका, टेन्शन घेऊ नका.”
यावेळी मुथ्था यांनी आमीर यांना प्रत्येक विद्यार्थ्यांची त्याच्या वैशिष्ठ्यासह खास ओळख करून दिली आणि ६ महिन्यांपूर्वी रडत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आमीर यांच्यामुळे, जोश आल्याचे सांगितले.
मुथ्था म्हणाले, “सत्यमेव जयते’, बघून मोठ्या वयातील मुलांमध्ये सकारात्मक बदल घडतात, हे आमचे संशोधन आहे. म्हणून याचा महाराष्ट्रातील शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये समावेश करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.” आज या केंद्रांमध्ये शिक्षण घेणारी मुले, उद्या आपल्या भागामध्ये जाऊन मोठे काम उभे करतील, यासाठी ते या ठिकाणी सक्षम होत असल्याचेही’, मुथ्था यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जैन संघटनेचे शाळा समितीचे अध्यक्ष शांतीलाल बोरा, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, अभय मुनोत, डॉ. किंजल गोयल, डॉ. आशुतोष चौहान, मुख्याध्यापक संतोष भंडारी, डॉ. बाबासाहेब सांगळे, सुरेश साळुंके आदी उपस्थित होते. २२ वर्षांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या भूकंपातील विद्यार्थ्यांना पुण्यात आणून, त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यातून, या केंद्राची स्थापना झाली. पुढे गुजरात, नेपाळ, जम्मू काश्मीर, अंदमान येथील भूकंपामध्ये होरपळलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात आणून, त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले. आता या ठिकाणी ठाणे आणि मेळघाट मधील आदिवासी विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले शिकत आहेत.