सांस्कृतिक राजधानीत पुरस्कारांवरच ‘संक्रांत ‘
सरसकट निर्बंधातून राज्यशासनाने पुण्याला वगळावे
:माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी
पुणे- सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला अनेक महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत . गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या- त्या महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो मात्र राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडण्याची ‘संक्रांत ‘ ओढवल्याने सरसकट निर्बंधातून राज्यशासनाने पुण्याला वगळावे अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
याबाबत माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी महापौरांना तात्काळ बैठक घेऊन शासनाकडे पुणे शहराची परंपरा आणि या पुरस्कारांच्या वितरणाबाबत ठोस भूमिका मांडण्यासंदर्भांत निवेदन दिले आहे. आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, काही महापालिका आणि तेथील पदाधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी केलेल्या खर्चावरून न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यशासनाने पुरस्कार वितरणाला हरकत घेऊन त्यावर निर्बंध घातले आहेत.तसे परिपत्रक राज्यातील सर्व महापालिकांना पाठवले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे शहराची परंपरा शासनाच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. महनीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि त्यासाठी येणारा खर्च पाहता कोणतीही उधळपट्टी पुणे महानगरपालिकेकडून होत नसल्याचे निदर्शनास आणून देऊन या पुरस्कारांवर बंदीचे निर्बधांबाबत राज्यशासनाने पुनर्विचार करावा आणि सरसकट निर्बंधातुन पुणे शहराला वगळावे अशी मागणी केली आहे असे आबा बागुल यांनी सांगितले.
परंपरा खंडित होऊ नये…
जर महापालिकेला पुरस्कार वितरण समारंभ आणि त्यासाठी येणारा खर्च पेलवत नसेल तर इतर संस्थांचा सहभागाच्या दृष्टीने पुढाकार कसा वाढेल यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. या पुरस्काराची परंपरा खंडित होऊ नये यासाठी वेळप्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यास पुणे नवरात्रौ महोत्सव तयार आहे. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट करीत उधळपट्टी कोण करतात याचाही शोध शासनाने घ्यावा मात्र कोणा एका महापालिका आणि पदाधिकाऱ्यांमुळे सरसकट सर्वांना दोषी धरणे हे अयोग्य असल्याचे नमूद केले आहे.