निष्ठावंत रंगकर्मी गमावला – मुख्यमंत्री
मुंबई: भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची निष्ठेने सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्थापक, अभिनेते, गायक, संगीतकार अशा विविध भूमिकेतून श्री. पेंढारकर यांनी रंगभूमीची निस्वार्थपणे सेवा केली. ललितकला दर्श संस्थेच्या माध्यमातून ते नाट्यक्षेत्रासाठी आयुष्यभर झटत होते. विशेषत: संगीत रंगभूमीला त्यांच्या योगदानाचा कधीही विसर पडणार नाही. त्यांच्यासारखा हरहुन्नरी रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
संगीत रंगभूमीचा आधारवड हरपला – विनोद तावडे
ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने संगीत रंगभूमीचा आधारवड हरपला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे जाऊन श्री. तावडे यांनी भालचंद्र पेंढारकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अभिनय, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रात तितक्याच ताकदीने वावर असणारे श्री. पेंढारकर संगीत रंगभूमीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. अत्यंत व्यासंगी, शिस्तप्रिय आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे ते रंगकर्मी होते. त्यांच्या निधनाने रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात श्री. तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
श्री. पेंढारकरांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये प्रामुख्याने दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास यांचा विशेष उल्लेख करता येईल. रंगभूमीला ते तीर्थासारखे पवित्र मानत. संगीत रंगभूमीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेल्या या तपस्वी, हळव्या कलाकाराच्या निधनाबद्दल श्री. तावडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मराठी रंगभूमीने चतुरस्त्र कलावंत गमावला – गिरीष बापट
ज्येष्ठ नाट्य कलावंत भालचंद्र पेंढारकर (वय 94) यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने चतुरस्त्र कलावंत गमावला. पेंढारकर यांनी अभिनयाबरोबच दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण या क्षेत्रातही त्यांनी छाप पाडली होती. ललितकलादर्श नाटकमंडळी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली.
रक्त नको मज प्रेम हवे, दुरितांचे तिमीर जावो, जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ, पंडित जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास ही पेंढारकर यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार, १९७३, बालगंधर्व पुरस्कार, १९८३
केशवराव भोसले पुरस्कार, १९९०, जागतिक मराठी परिषद, १९९६, संगीत नाटक कला अकादमी, २००४, तन्वीर सन्मान पुरस्कार, २००५, चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, २००६ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
रंगभूमीच्या सेवेचे व्रत आयुष्यभर समर्थपणे पेलणा-या या कलावंतास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.