मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख 20 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून या कामांमुळे आगामी काळात राज्याच्या कृषि क्षेत्राच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे, अशी माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) माध्यमातून लहान शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावी व सर्व जिल्ह्यांतील जल स्त्रोतांचे मॅपिंग करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते पुढे म्हणाले, हे अभियान राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबईत काल (दि. 11) झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी जलयुक्त शिवार अभियानाची जाहीररित्या प्रशंसा केली होती. त्यामुळे हे अभियान अधिक यशस्वी करून देशासमोर राज्याचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एक लाख 20 हजारे कामे पूर्ण झाली असून 35 हजार कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात खोलीकरण व रुंदीकरणाची 1500 किमी लांबीची कामे झाली आहेत, ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे.
प्रत्येक तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविणारी आदर्श गावे तयार झाली पाहिजेत. त्यातून प्रेरणा घेऊन राज्यातील अन्य गावेही आदर्श होण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच या अभियानात लोकसहभाग देखील मोठ्या संख्येने वाढेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘नरेगा’च्या माध्यमातून शेततळ्यांच्या कामांवर भर देऊन राज्यात लहान शेततळ्यांची कामे जास्त प्रमाणावर होण्यासाठी मजुरांचे समूह तयार करावेत. पुढील तीन वर्षात एक लाख 50 हजार शेततळी करण्याचे नियोजन पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे मॅपिंग करणे आवश्यक असून जुन्या जलस्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात धडक सिंचन विहिरींच्या कामाला गती देण्यात यावी. आतापर्यंत 35 हजार 985 धडक सिंचन विहीरींची कामे पूर्ण झाली असून 1534 कामे प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी सादरीकरण केले.