महाराजस्व अभियान 2015-16 चा शुभारंभ
सातारा (जि.मा.का) : महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री.प्रमोद यादव यांनी केले.
सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालात काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये दि.1 ऑगस्ट 2015 पासून राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या अभियानाची अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव बोलत होते.
श्री. यादव पुढे म्हणाले की, अभियानाबाबत शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे तो सुस्पष्ट असून त्याचे काटेकोरपणे पालन केले तर हे अभियान राबविण्यात आपण निश्चिपणे यशस्वी होऊ. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना ज्या काही त्रुटी राहून जातात किंवा ज्या बाबतीत काळजी घेतली जात नाही, ती घेणे कसे आवश्यक आहे ही श्री. यादव यांनी समजावून सांगितले.
सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली व ते कशा प्रकारे राबवावयाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. महाराजस्व अभियानाचे लोकाभिमुख घटक आणि प्रशासकीय कामकाज असे दोन भाग असून त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी अनुक्रमे उपजिल्हाधिकारी (महसूल) व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकाभिमुख घटकांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पराग सोमण तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.