सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झाले. भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतली. भाजपने कॉंग्रेसपुढे पालघर लोकसभा मतदार संघात तहाचा हात पुढे केला होता, तो यशस्वी झाला नाही, तरीही पलूस-कडेगावमधून भाजपने माघार घेतली.
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगावची पोटनिवडणूक लागली. त्यात विश्वजीत कदम यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बिनविरोधच्या चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीने पाठींबा जाहीर केला, मात्र भाजपबाबत संदिग्ध स्थिती होती. कदमांचे पारंपारिक विरोधक असलेल्या देशमुखांनी पक्षादेशाप्रमाणे काम करू, असे जाहीर केले होते. भाजपने राज्यातील पोटनिवडणुकांचा रागरंग लक्षात घेऊन तह करण्यासाठी पलूस-कडेगाव मतदार संघात देशमुखांना अर्ज दाखल करायला सांगितला. अर्थात, हा डाव आहे, असे भासणार नाही, याची खबरदारी घेतली होती.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याऐवजी त्यांचे चुलतबंधू, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी भाजपचा नियोजित राजकीय डावपेच होता. तह झाला नाही तर आम्ही ताकदीनेच लढू, विश्वजीत विरुद्ध संग्राम हा नवा रणसंग्राम घडवू, असा स्पष्ट संदेश त्यामाध्यमातून दिला गेला होता. त्यामुळे माघारीच्या क्षणापर्यंत भाजप लढेल का, असे चित्र राहिले. पालघरमध्ये कॉंग्रेसने मदत केली तर पलूस-कडेगावमधून माघार घेऊ, हा भाजपचा प्रस्ताव कॉंग्रेसने बेदखल केला होता. त्यामुळे संदिग्ध स्थिती होती. अखेरच्या क्षणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माघारीची घोषणा झाली. भाजपने इथे माघार घेऊन राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. डॉ. पतंगराव कदम हे असामान्य नेते होते. त्यांच्या अकाली निधनानंतर सहानुभुतीचा फायदा विश्वजीत कदम यांना होणार, हे सरळ होते. अशावेळी भाजप लढले असते, मात्र त्यात पक्षाची आणि सोबतच देशमुखांच्या प्रतिमेविषयी नाहक नकारात्मक चर्चा झाली असती. त्याचा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.संग्रामसिंह देशमुख हे आश्वासक नेते आहेत. त्यांची मतदार संघात चांगली प्रतिमा आहे. ती पुढील निवडणुकीसाठी जपून ठेवण्याचा भाजपचा इरादा स्पष्ट आहे. दुसरीकडे पतंगराव कदम यांचे सर्वपक्षिय सलोख्याचे, मैत्रीचे संबंधही येथे कामी आल्याचे सांगितले जातेय. भाजपमध्येही त्यांचे अनेक मित्र राहिले आहेत. त्यामुळेच विश्वजीत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला गेला.