तुळजाभवानी कामगार संघटनेने, ऊसतोड कामगारांच्या रखडलेल्या शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणीबाबत डॉ. गोऱ्हे यांना दिले निवेदन

पुणे.:ऊसतोड कामगारांसाठी मंजूर झालेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी रखडल्याबाबत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात समाजकल्याण आयुक्तांसोबत लवकरच बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

धाराशिव येथील तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश हरिश्चंद्र पवार यांनी डॉ. गोऱ्हे यांची आज दि.२१ जुलै रोजी डॉ. गोऱ्हे यांच्या पुणे येथील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात, दि.९ जुलै २०२५ रोजी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत संघटनेने मांडलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय विभागाने काही योजनांबाबत शासन निर्णयही जारी केला. मात्र, सानुग्रह अनुदान, वस्तीगृह तसेच इतर वैयक्तिक लाभांच्या काही महत्त्वाच्या योजना शासन निर्णयातून वगळण्यात आल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, शासन निर्णय होऊन वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर काही महत्त्वाचे शासन निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने ऊसतोड कामगारांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतली. प्रलंबित योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी समाजकल्याण आयुक्त दीपा मुंढे-मुधोळ यांच्यासमवेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विषयाचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.


