कुपवाड -देशात आणीबाणी येवू शकते अशी भीती लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पाशवी बहुमताच्या जोरावरील सरकार आणीबाणी लादू शकते काय ? अशी चर्चा उसळली असताना शरद पवार यांनी तिला हवा देण्याचे काम आज येथे केलेसुषमा स्वराज यांच्याविषयीची चर्चा निरर्थक आहे असेही नमूद करून अडवाणी यांचे आणीबाणी बद्दलचे विधान गंभीरतेने घ्यायला हवे असे ते म्हणाले
ते म्हणाले ‘भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वीच्या आणीबाणीच्या झळा सोसलेल्या आहेत. त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत त्यांना साम्य वाटत असावे. म्हणूनच त्यांचे विधान देशाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी अंजनी (तासगाव) येथे बोलताना व्यक्त केले.
तासगाव तालुक्यातील अंजनी येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे आर. आर. पाटील असे नामकरण आणि शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शरद पवार रविवारी अंजनीत आले होते. या वेळी आमदार पतंगराव कदम, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रयतचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘सरकारने साखर कारखानदारांना दिलेले सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज फसवे आहे. ती रक्कम मिळायला आणखी आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. शिवाय चार महिन्यांचे व्याजही कारखानदारांना द्यावे लागणार आहे. कर्जाची मुदत एक वर्षाची आहे. आमचे सरकार असताना साखर कारखानदारांना दीर्घ मुदतीचे कर्ज दहा टक्के व्याज दराने दिले होते. व्याजाची रक्कम सरकारने स्वतः भरली होती.’
दरम्यान, जयंत पाटील, खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या जिल्हा बँकेच्या युतीबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची स्थिती उत्तम आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने छोट्या छोट्या युत्या होत असतात. त्यामुळे कोण कोणाबरोबर गेला आणि कोण आपल्याबरोबर आला, याला फारसे महत्व देण्याचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढेही राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे.’
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, ‘लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि नितीशकुमार यांचा पक्ष असे आम्ही चार पक्ष एकत्र येवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची तेथील जनतेची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अगोदर तेथील विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याचे जागावाटप झाले असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली आहे. सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाही लवकर तयार केला जाणार आहे.
सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि ललित मोदी यांच्या भेटीवरुन होत असलेली चर्चा निरर्थक आहे. परदेशात असलेल्या भारताच्या नागरिकाला भेटणे हा काही गुन्हा नाही. नको त्या गोष्टीचे राजकारण केले जात असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.