राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आशयघन चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरतात मात्र सामान्य प्रेक्षकांचा त्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरतात असा एक समज आपल्याकडे प्रचलित झाला आहे. यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी आता मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे आणि याचं उत्तम उदाहरण ठरला आहे ‘किल्ला’ हा चित्रपट. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या किल्लाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड दिमाखात झळकवत पहिल्या तीन दिवसात कोटींची उड्डाणे घेत तीन कोटी पंचवीस लाख एवढी कमाई केली आहे. चित्रपटात स्टार पॉवर असलेले कलाकार नसताना, मनोरंजनाचा नेहमीचा मसाला नसतांना, सशक्त कथा आणि तेवढ्याच जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘किल्ला’ ने हे यश मिळवलंय. पहिल्या आठवड्यात २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किल्ला’च्या शोज् मध्ये प्रेक्षकांच्या मागणीतून वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई – पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर मध्येही ‘किल्ला’ला असाच तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मराठी चित्रपट आणि आशयघनता हे एक समीकरणच बनलेलं आहे. कथेचा सशक्तपणा हे मराठी चित्रपटांचं वैशिष्ट्य आणि ‘किल्ला’ तर दमदार कथेसोबतच प्रेक्षकांना अप्रतिम दृश्यानुभव देतोय. निसर्गरम्य कोकणाला आपल्या सुंदर छायाचित्रणातून अधिक देखणं बनवलंय ते छायालेखक आणि दिग्दर्शक अविनाश अरूणने. लहान मुलांचं भावविश्व अतिशय संयतपणे चितारण्याचं काम त्याने या चित्रपटातून केलं आणि त्या विश्वात प्रेक्षकांनाही अलगदपणे नेलं. आज ‘किल्ला’ ला मिळणा-या प्रतिसादावरून त्याची प्रचिती येतच आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार पटकावित असतानाच किल्ला’ने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. हे यश मिळत असतानाच प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार किल्लाला मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि या शुक्रवारी त्याचं उत्तर थिएटरबाहेर लागलेल्या लांब रांगा आणि दिमाखात झळकणा-या हाऊसफुल्लच्या बोर्डमधून रसिकांनीच दिलं. पहिल्या तीन दिवसात तीन कोटी २५ लाख एवढी घसघशीत कमाई या चित्रपटाने केली.
‘किल्ला’च्या कथेबद्दल, यातील बालकलाकारांच्या अभिनयाबद्दल अनेक जाणकार समीक्षकही भरभरून बोलत आहेत. हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय कलाकारही किल्ला बघून भारावून गेलेत याचं मोठं उदाहरण म्हणजे सोशल नेटवर्कवरून किल्लाच्या आलेल्या प्रतिक्रिया. ट्वीटरवर तर किल्ला ट्रेडींग मध्ये टॉपवर होता. अशा प्रकारे ट्वीटर वर ट्रेंड होणाराही किल्ला हा पहिलाच मराठी चित्रपट असावा. या चित्रपटाने बॉलीवूडमध्येही जबरदस्त खळबळ माजवलीय. रितेश देशमुख, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, अनुराग कश्यप, अमोल गुप्ते, स्वानंद किरकिरे, अतुल कुलकर्णी, राजकुमार यादव या आणि अतर अनेक कलावंतांनी फेसबुक, ट्वीटरवर या चित्रपटाबद्दल आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
‘किल्ला’ ला मिळालेल्या या यशाबद्दल या चित्रपटाची सहनिर्मिती आणि वितरण करणारे एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की ,“‘किल्ला’ चं यश हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. किल्लाच्या यशाला ‘टाइमपास’ किंवा ‘लय भारी’ या चित्रपटांच्या यशाबरोबर तुलना करणं चुकीचं ठरेल कारण या चित्रपटाची जातकुळी पूर्णपणे वेगळी आहे. यात अमृता सुभाष वगळता इतर कुणीही लोकप्रिय कलाकार नाहीये शिवाय इतर सर्व बाल कलाकार आहेत. त्यामुळे मराठीमध्ये विनोदीपटांना, प्रेमकथांना किंवा अॅक्शन चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग किल्लाकडे वळेल का हा एक प्रश्न होता. या चित्रपटात विनोद आहे पण तो रूढार्थाने विनोदी नाहीये.. प्रेमाची गोष्ट आहे पण ती आई – मुलाच्या नात्याची आहे, मैत्रीची आहे. हा चित्रपट बघताना आपण नकळतपणे आपल्या भूतकाळात हरवून जाऊ आणि तोच या चित्रपटाचा युएसपी ठरेल याबद्दल मनात खात्री होती. मराठी चित्रपटाच्या कक्षा रूंदावतायत असं आपण नेहमी म्हणतो पण ‘किल्ला’मुळे आपला चित्रपट आणि प्रेक्षक हा अधिक प्रगल्भ झालाय असं म्हणता येईल. चित्रभाषेचा एवढा अप्रतिम वापर असणारा हा मराठीतील बहुधा पहिलाच चित्रपट असावा आणि त्याला मिळणारा हा प्रतिसाद हे मराठी चित्रपटक्षेत्रासाठी सकारात्मक चित्र आहे असं मी मानतो. हे यश जेवढं चित्रपटाच्या टीमचं आहे तेवढंच प्रेक्षकांचंही आहे.”