कौशल्यसेतू अभियान : १० वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी प्रगतीचा मार्ग
इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणारे ‘कौशल्य सेतू अभियान’ हा उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. इयत्ता १० वी मध्ये नापास झाल्यावर बऱ्याचदा घर, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडूनसुद्धा अशा विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले जात नाही. ‘नापास’ चा हा शिक्का पुसून टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्याना मदतीचा हात पुढे करत या ‘कौशल्य सेतू अभियाना’द्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
योजनेचे स्वरूप : या कौशल्य सेतू अभियानामध्ये इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’ व ‘नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी’ या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी मोबाईल रिपेअरिंग टेक्निशियन,असिस्टंट इलेक्ट्रिशियन,ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन (टू अँड थ्री व्हीलर),मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग,डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लंबर जनरल, हॅन्ड एम्ब्रॉयडरी अशा कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रशिक्षणात प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर दिला जातो. या कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रॅक्टिकल, लेखी व तोंडी परीक्षेद्वारे विद्यार्थ्याचे मुल्याकंन केले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
बऱ्याचदा इयत्ता १० वी मध्ये नापासाचा शिक्का बसल्याने निराशेच्या गर्तेतील विद्यार्थी व्यसन, गुन्हेगारी अशा चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते. म्हणूनच युवापिढीचे भवितव्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘कौशल्य सेतू अभियान’ सुरु केले आहे. सध्या सुमारे २२,००० विद्यार्थी या ‘कौशल्य सेतू अभियानात’ प्रशिक्षण घेत आहेत. अशी माहिती ‘यशस्वी’ संस्थेचे ‘कौशल्य सेतू अभियान’ विभाग प्रमुख प्रशांत पिटके यांनी दिली. या योजनेमुळे इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यानाही स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्किल इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाला आणखी बळ मिळणार असून यामुळे देशाची युवा पिढी स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
योगेश रांगणेकर
मोबा : ७३५००१४५३६ / ९३२५५०९८७०