पुणे : बंदीवास संपल्यानंतर पुन्हा सामान्य नागरी जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी महिला बंदीसाठी सुरु करण्यात आलेले कौशल्य प्रशिक्षण हे योग्य पुनर्वसनासाठी गरजेचे आहे मत पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी व्यक्त केले. येरवडा कारागृहात महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी सुरु करण्यात आलेल्या ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्सच्या पहिल्या बॅचच्या प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अशा प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षणामुळे या महिलांना रोजगार संधी सहजगत्या प्राप्त होऊ शकते. तसेच बंदिवासामुळे आलेले नैराश्य दूर होऊन पुन्हा एकदा स्वतःच्या आयुष्याकडे त्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतात. म्हणूनच त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळावा या हेतूने महाराष्ट्र कारागृह विभागाच्या बंदी कल्याण आणि पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने महिला बंदीसाठी शिवणकाम क्षेत्रातील ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु करण्यात आला असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प संचालिका वर्षा कणिकदळे म्हणाल्या की, आपणही काहीतरी करू नवीन शकतो असा आत्मविश्वास या महिलांना या प्रशिक्षणामुळे मिळाला आहे.
याप्रसंगी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या की, या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची संधी मिळाल्याचे खूप समाधान आहे. विशेष बाब म्हणजे प्रशिक्षणादरम्यान या महिलांचा उत्साह आणि नवनवीन ड्रेस चे प्रकार शिकण्याचे प्रयत्न खूप चांगले होते.
तर येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे या महिलांमध्ये स्वतःप्रती जागृत झालेला आत्मविश्वास त्यांना पुढील आयुष्यासाठी लाभदायक ठरेल.
याप्रसंगी महिला तुरुंग अधिकारी स्वाती पवार, टाटा ट्रस्टच्या कार्यक्रम अधिकारी मंगला होनावर, मुल्यांकन अधिकारी अनुराधा माने, सामाजिक कार्यकर्त्या हिना सय्यद व मीनाक्षी बडवाईक, ‘यशस्वी’ संस्थेच्या प्रशिक्षिका स्वाती कांबळे,’यशस्वी’ च्या समन्वयक प्राची राऊत,यशस्वीच्या प्रशिक्षक प्रतिमा सातळकर आणि स्वाती कांबळे या उपस्थित होत्या.