पुणे : युवकांनी संवेदनशील व सुजाण नागरिक बनणे गरजेचे आहे असे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद साठे यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी महाराष्ट्र दिनानिमित्त ‘यशस्वी ‘ संस्थेतर्फे आयोजित ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, युवकांनी शिक्षण आणि कौशल्याद्वारे स्वतःच्या करिअरचा विकास जरूर करावा, मात्र स्वतः प्रगतीची उंच शिखरे पार करत असताना आपल्या समाजातील प्रश्नांबद्दल संवेदनशील असणे गरजेचे आहे, वेळप्रसंगी आदिवासी पाडे, दलित वस्त्यांमध्ये जाऊन तिथले प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न युवकांनी करायला हवा.’यशस्वी’ सारख्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्याना थेट औद्योगिक कंपन्यांतून ऑन द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी मिळत आहे आणि हजारो विद्यार्थी रोजगारक्षम बनत आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमधील सुप्त गुण वेळीच ओळखून एखाद्या तरी क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त करण्याचा ध्यास घ्यायला हवा, ध्येयाप्रती स्पष्टता असायाला हवी असेही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध कंपन्यांतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले .
यावेळी कॅप्टन डॉ. सी.एम.चितळे, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ‘यशस्वी’ संस्थेद्वारे ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या नोकरीसाठी निवड झालेल्या महेंद्र गिरी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘शिकता शिकता कमवू या’ या समूह गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.यावेळी विद्यार्थ्यानी नृत्य, गायन व काव्य वाचन असे विविध कलाप्रकार सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले.
तर आभार प्रदर्शन ‘यशस्वी’ चे संचालक संजय छत्रे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ च्या संचालिका स्मिता धुमाळ, संचालक राजेश नागरे, रजिस्टार डॉ. विजय कुलकर्णी, संस्थेचे सर्व शिक्षक, सुपरवायजर, फिल्ड ऑफिसर, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्वेता साळी, वैशाली भुसारी, माधवानंद खांडेकर, तेजस लवंगे, कल्याणी कबाळे,उर्मिला सातपुते,वर्षा राणे, सौमीन पात्रा, पूजा दोदे, मेघरंजनी रेवरे, मेघा बोरकर, रश्मी शिंदे व पवन शर्मा,नवल पुट्टा यांनी विशेष सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.