पुणे : एरवी विरंगुळा म्हणून एकत्र भेटणारे टाटा मोटर्स चे निवृत्त सहकारी यावेळी एका विधायक कार्यासाठी एकत्र आले होते. जन्मत:च ऐकू न येणार्या ४० मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी येणार्या खर्चाचा भार उचलून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला. यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला.
इतर मुलांपेक्षा थोडेशे वेगळे आयुष्य जगणार्या वेल्हा तालुक्यातील या ४० मुलांना जन्मजात कर्णबधीरत्व आहे. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्यावर उपचार करणे त्यांच्या पालकांना शक्य नव्हते. ज्ञानप्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या भाग्यश्री पोंक्षे यांनी या मुलांवर उपचार करून त्यांना सर्वसामान्य मुलांसारखे आयुष्य देण्याचा संकल्प केला. याच संकल्पातून त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेवून या मुलांच्या व्यथा सांगितल्या. पालकमंत्र्यांनीही तातडीने याची दखल घेत आपल्या टाटा मोटर्सच्या निवृत सहकार्यांच्या मार्फत या मुलाच्या प्राथमिक उपचाराचा भार उचलला व तातडीने महात्मा फुले वस्तु संग्रहालयामध्ये या मुलांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित केले. येथे डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांनी या मुलांची प्राथमिक तपासणी अत्यल्प मोबदल्यात करून पुढील उपचाराची दिशा ठरवली. केवळ उपचाराचाच खर्च नव्हे तर मुलांचा व त्यांचा पालकांचा प्रवास खर्च, जेवणाची सोय त्यांनी केली. कर्णबधीरपणावर कायमची मात करण्यासाठी या लहानग्यांना यापुढे अनेक वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे. यासाठी विविध सेवाभावी संस्थां व व्यक्तींनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. मदतीसाठी राजीव विळेकर यांना ९४२२५१८१७८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.