पुणे : ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन’चा (एसआयएमएमसी) १५ वा पदवीदान समारंभ संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी रत्न सभागृहात काल अत्यंत उत्साहात पार पडला. ‘एआयसीटीई’ मान्यताप्राप्त व ड्युअल स्पेशलायझेशन मिळवून देणाऱ्या ‘पीजीडीएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर होण्याचा हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. प्रमुख पाहुणे अमेरिकेतील शिकागो येथील ‘टीएमए वर्ल्डवाईड’चे संस्थापक संचालक प्रा. डॉ. तौसिफ मलिक, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे सरसंचालक कर्नल (निवृत्त) शिशीर कुमार, शिक्षण अधिष्ठाता व ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष व सचिव सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदके, तर यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन पदवीने गौरवण्यात आले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी वर्ष २०१५ – २०१७ च्या पंधराव्या ‘पीजीडीएम’ विद्यार्थी तुकडीचे त्यांच्या असाधारण योगदान व यशाबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, “सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आता आपल्या कॅम्पसमधून नव-उद्योजकता संधी मिळवून देणार आहे. तुम्ही उद्योजक म्हणून पुढे येण्याचे स्वप्न बघण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या मातृ संस्थेला प्रशिक्षक म्हणून भेट देऊन संस्थेसाठी मूल्यवर्धन म्हणून स्वतःचा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करावा.” संस्था दरवर्षी २५ डिसेंबरला आयोजित करत असलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात सहभागी होण्याचे आमंत्रणही डॉ. चोरडिया यांनी या विद्यार्थ्यांना दिले.
डॉ. तौसिफ मलिक म्हणाले, “मी संघटनांतर्गत उद्योजक ( इन्ट्राप्रेन्युअर) व स्वतंत्र उद्योजक (आंत्रप्रेन्युअर) अशा दोन्ही भूमिका बजावत आलो असल्याने तुम्हीही केवळ व्यवस्थापक बनण्यापेक्षा या दोन्ही भूमिका बजावाव्यात, यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतो. तुम्ही या दोन्ही भूमिकांचा संगम साधून संघसदस्यत्व आणि नेतृत्वही पेलावे. त्याला एकाग्रतेच्या शक्तीची जोड दिली, की तुम्हाला यश अनुभवता येईल.”
स्वागतपर भाषणात ‘पीजीडीएम’ विभाग प्रमुख प्रा. सुशांत चॅटर्जी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. कंपनी जगतात आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करुन ते म्हणाले, “तुम्ही विद्यार्थी म्हणजे या संस्थेने समाज व देशासाठी केलेली गुंतवणूक आहात, त्यामुळे तुम्ही आपल्या जीवनात व कामात यशस्वी होण्याची गरज आहे.”
‘कठोर मेहनतीमुळेच विद्यार्थी अधिक उत्तम व्यावसायिक होत असल्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात कष्टांची अपेक्षा ठेवा,’ या शब्दांत प्रोत्साहन देऊन कर्नल (निवृत्त) शिशीर कुमार म्हणाले, की उद्योगात व्यवस्थापकीय भूमिका बजावत असताना संघातील सदस्यांचा आदर मिळवणे व काम होण्यासाठी योग्य आज्ञा देणे अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल आशीर्वाद देताना हे विद्यार्थी कठोर मेहनत करतील आणि समाजात व राष्ट्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
परीक्षा नियंत्रक प्रा. अक्षित कुशल यांनी पदवी संपादन करत असलेल्या विद्यार्थी तुकडीला शपथ दिली.