पुणे-देशभरात सध्या भाजपची पिछेहाट सुरू आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून सरकार स्टंट निर्माण करत आहे. हे सरकार इतक संवेदनशील आहे, तर त्यांनी दाभोळकर-पानसरेंच्या खुन्यांना पकडण्याची हिम्मत का नाही दाखवली ? लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याची मार्मिक टीका करत माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी पोलीस जणू राज्यकर्त्यांच्या दावणीलाच बांधले असल्याचा संकेत आपल्या वक्तव्यातून दिला आहे .
पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्याविषयी विचारले असता ते बोलत होते. खोपडे म्हणाले, “पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्याची घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी दिेलेले पुरावे पुरेसे नाहीत” केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी सरकार पोलीस खात्याचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले, “गृहमंत्री असतानाही मुख्यमंत्र्यांना नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबवता आली नाही.तर लोकशाही मार्गाने विद्रोह करणाऱ्यांची दडपशाही केली जात आहे. परंतु यामुळे चळवळ थांबणार नाही तर जेवढे दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढे अधिक लोक उसळून येतील” पोलीस दलात काम केल्यामुळे मला याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.