ज्ञानावर अहंकार चढला तर माओवाद जन्माला येतो – डॉ.श्रीनिवास पाटील
पुणे-ज्ञानाला मर्यादा आहेत, मात्र त्यावर अहंकार चढला तर माओवाद जन्माला येतो. आज उच्चपदावर काम करणारे असे अनेकजण आहेत, जे याकडे वळत आहे. समाजातील तरुणाईचा सकारात्मक हुंकार बंद झाल्यास जशी दुरवस्था होते, तशी आज झाली आहे. परंतु त्यातही अनेक ठिकाणी तरुणाई चांगल्या कार्यासाठी पुढे येत असून मोठया प्रमाणात तरुणाईचा सकारात्मक हुंकार समाजात कायम रहायला हवा, असे मत सिक्किमचे राज्यपाल डॉ.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
लाईफ (लाईक-माईंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्थेतर्फे टिळक रस्त्यावरील नितू मांडके सभागृहात लाईफ स्फूर्ती सन्मान 2018 या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सनबीम एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे अध्यक्ष सारंग पाटील, सोपान कुंजीर, पोपटराव कटके, लक्ष्मणराव कोंढाळकर, लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे आदी उपस्थित होते.
यंदाचे पुरस्कार पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार सेवालय लातूरचे संस्थापक प्रा.रवी बापटले, स्वरा ग्रुप आॅफ हॉटेल्स रिसॉर्टस्चे संचालक रामदास मुरकुटे, आणि झील एज्युकेशन इन्स्टिटयूटचे जयेश काटकर यांना प्रदान करण्यात आले. याशिवाय विशेष युवा सन्मान अभिजीत अनाप, रविकांत वर्पे, कल्याणी माणगावे, सलोनी जाधव यांना प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा 4 थे वर्ष आहे.
डॉ.श्रीनिवास पाटील म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात भेसळीचे प्रमाण वाढत असले, तरीही अनेकजण प्रामाणिकपणे काम करीत आहेत. लाईफ सारख्या शेकडो सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करणा-या तरुणाईमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे अशा संस्थांना आणि गरजूंना मदत करण्याकरीता सामान्यांना आपल्या खिशात हात घालायला हवा. तरच, समाजातील अडचणी दूर होण्यास मदत होईल.