डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘पुलकसागरम्’चे प्रकाशन…
पुणे- महाराष्ट्र व जैन संस्कृतीचा संबंध अतिशय प्राचीन व जवळचा आहे. मराठी भाषेच्या निर्मिती व संवर्धनात जैन संस्कृतीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अहिंसा, नववाद, अनेकांतवाद यांची शिकवण जैन धर्माने जगाला दिलेली आहे. त्या दृष्टीने देशाच्या जडण घडणीत जैन संस्कृतीचा मोठा हातभार लागला आहे,असे उद्गार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व घुमान (पंजाब) अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज काढले.जैन मुनीश्री प.पु.१०८ पुलकसागरजी महाराज यांच्यावरील ‘पुलकसागरम्’ या चित्रावली ग्रंथाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.मोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी,महालक्ष्मी लॉन्स, येथील भव्य मंडपात गुरूपौर्णिमेनिमित्त झालेल्या या कार्यक्रमात मंचावर सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, झोपडपट्टी निर्मूलन प्राधिकरणाचे अध्यक्ष पांडुरंग कोल्हे, उपाध्यक्ष अरविंद जैन, सचिव जितेंद्र शहा, चकोर गांधी, विरकुमार शहा, उत्कर्ष गांधी, अजित पाटील, किरण कोळेकर, आदि. उपस्थित होते.
या प्रसंगी सदानंद मोरे पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे जैनगुरू श्रीमत् रायचंदजी हे होते.त्यांच्या प्रभावामुळे महात्मा गांधींचा अहिंसेवरील विश्र्वास वाढला व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही अहिंसा तत्व अंगीकारण्यावर त्यांनी भर दिला. असे सांगून डॉ.मोरे पुढे म्हाणाले की, पुण्यासारख्या शहरात मुनीश्री पुलकसागरजींचा चातुर्मास होत आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे.
प्रारंभी मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची शेकडो भक्तांनी फुलांनी पाद्यपुजा केली व श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले.या कार्यक्रमात रक्तदान यज्ञाचे आयोजन केले आहे. त्यासाठी आर.एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे सर्व सोयी उपलब्ध असणारी मोठी बस मंडपात लावण्यात आली आहे. पुढील ३ दिवस या रक्तदान मोहिमेत भाविक सहभाग घेणार आहेत.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुंबईच्या सीमा गंगवाल यांनी केले, यावेळी ५००० आसन संख्येचा सभा मंडप पूर्ण भरला होता. त्यात महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती.तसेच मंचावरील मुनीश्रींना वंदन करीत मंचावर विराजमान मुनीश्रींचा गौरव करणारी गाणी व लयबद्ध नृत्ये पुलकमंच – बांसवाडा (राजस्थान) व पुलकमंच (मुंबई) यांच्या युवा व युवती कलाकारांनी सादर केली.गुरुपौर्णिमेनिमित्त अहमदाबाद, सुरत, राजकोट, सिल्व्हासा, ग्वाल्हेर, दिल्ली, मथुरा, जयपूर, इंदुर तसेच महाराष्ट्रातील अनेक भागातून जैन भाविक आले होते.
यानंतर मुनीश्री प.पू १०८ पुलकसागरजी महाराज यांचे प्रवचन झाले.या प्रसंगी महाराजांनी सांगितले की,गुरूपौर्णिमा हा उत्सव अस्था,श्रद्धा, आध्यात्माचा त्रिवेणी संगम आहे.उत्सव माणसामाणसाला जोडण्याचे काम करतात.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई व गुरू हे स्थान अनन्यसाधारण असते. आई ही अशी व्यक्ती असते की जी आपल्याला जगात आणते व गुरू ही अशी व्यक्ति असते जी आपल्याला संसाराच्या मोहातून बाहेर येण्यास मार्ग दाखवते इतकेच नव्हे तर, गुरू हे माणूस व ईश्वरातील दुवा असतात, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात
एकतरी गुरु असायलाच हवा असे प्रवचनात पुलकसागरजी महाराजांनी सांगितले.