पुणे- लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपारिक तसेच ठसकेबाज लावण्या…रसिकांनी टाळयाआणि शिट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव श्री गणेश कलाक्रीडारंगमंच येथे संपन्न झाला.उच्चशिक्षित लावणी साम्राज्ञींचा या सहभाग हे लावणी महोत्सवाचे मुख्य आकर्षणठरले.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत या ‘लावणी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांप्रमाणेच महिलांचीउपस्थिती आणि त्यांनी टाळ्या, शिट्या व वन्समोअरने कलावंतांना दिलेली दाद याने रंगमंच दणाणून सोडले.या रावजी…बसा भावजी, कारभारी दमानं…,, लाडाची ग लाडाची, मी कैरी पाडाची…, सोडा राया सोडा हा नाद्खुळा…., थेंबा थेंबानं…, कारभारी दमानं…,, नटले तुमच्या साठी…,कवडसा चांदाचा पडला…, आज पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब…, कसं काय पाटील बरं हाय का…तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला…. यावं यावं दिलाच्या दिलवरा… यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण, कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. टाळ्या, शिट्या आणि वन्समोअरने प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले.विविध लावणी ग्रुपच्या एकाच ठिकाणी सादर झालेल्या या दिलखेचक अदाकारीच्या आविष्काराने रसिकांना घायाळ केले. लावणी पार्टीमधील लावणी सम्राज्ञीची मुलाखत हे यावेळचे वैशिष्ट्य होते. पारंपारिक पद्धतीनुसार ते थिएटर शोपर्यंत सादर करण्यात येणाऱ्या लावण्या यावेळी सादर करण्यात आल्या. विशेष म्हणजे या महोत्सवात उच्चशिक्षित महिलांनी सादर केलेल्या लावण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष माजी उपमहापौर,नार्सेवक आबा बागुल व गीतकार प्रदीप कांबळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. लावणी सारखी लोककला ही महाराष्ट्राचे भूषण असून ही लोककला विविध माध्यमातून जगभर पोहचत आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगत त्यांनी ते राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. हा लावणी महोत्सव दुपारी १२ पासून रात्री १० वाजेपर्यंत चालू राहिला.
शिवानी- रेश्मा- सीमा ग्रुप च्या शिवानी या एम.एस्सी.अॅग्रीकल्चर झाल्या असून त्यांनी एम.पी.एस.सी.ची परीक्षा दिली आहे. त्या यावेळी बोलताना म्हणाल्या लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती लोककला आहे. नखापासून तेकेसापर्यंत शृंगार करून सादर करण्याची ती एक कला आहे. माझ्या आदर्श सुरेखा पुणेकर व माया खुटेगावकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे. त्यांची कला जपण्याचे काम आम्ही करतो आहोत. लावणीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, तो दृष्टीकोन बदलण्याचे काम मी व माझे सहकारी करत आहोत. आज एकही मराठी सिनेमा लावणीशिवाय पूर्ण होत नाही यावरून लावणीला किती महत्व आले आहे हे संगायला नको. ज्या महिलांना अथवा मुलींना लावणी शिकायची आहे त्यांना नाट्य निर्माता संघाच्या माध्यमातून शिकावी,मुलींनी लावणी जरूर शिकावी तरच मराठमोळी लावणी वर्षानुवर्षे चालत राहिल असे आवाहन त्यांनी केले.दुसऱ्या उच्चशिक्षित लावणी सम्राज्ञी शलाका पुणेकर यांचे शिक्षण एम.बी. ए. झाले आहे. त्या म्हणाल्या मला लावणीची आवड होती. लावण्या बघितल्यानंतर आपणही लावणी करू शकतो असं विचार मनात आला. चांगल्याघरातील मुलींनी लावणी करणे यात गैर काहीच नाही असे त्या म्हणाल्या.राणी मुंबईकर म्हणाल्या,मी गेली १४ वर्षे लावणी करते आहे. लावणीकडे पहिल्यांदा बघण्याचा दृष्टीकोन आणिआत्ताचा दृष्टीकोन यामध्ये खूप फरक झालं आहे. आता महिलांची संख्याही खूप असते. आम्ही जेव्हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम करतो तेव्हा ज्या महिलांना शिट्या वाजवता येत नाहीत त्या प्लास्टिकच्या शिट्या वाजवतात व आम्हाला दाद देतात.
लावण्यांबरोबरच या महोत्सवात देवीचा गोंधळ,भारुड आणि चित्रपटातील गीतेही सादर करण्यात आली. प्रसिध्द गीतकार प्रदीप कांबळे यांनी त्यांचे गाजलेले ‘आई गोंधळाला,गोंधळाला आली, तुळजा भवानी आई’ हे गाणे गायले. स्वप्नील कांडेकर याने ‘सुया घे ,पोत घे..’ हे भारुड पाश्चिमात्य पद्धतीने सादर केल तर भवानी आईचा गोंधळाने सर्वांच्या डोळ्यांची पारणे फेडली.
यावेळी बोलताना प्रदीप कांबळे म्हणाले, माझ्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले हा मी माझा सन्मान समजतो. मी आत्तापर्यंत ११०० गाणी लिहिली आहेत. परंतु मी फक्त एक माध्यम असून माझ्या आईचा आशीर्वाद आणि आई जगदंबेचा आशिर्वाद यामुळेच हे घडू शकले.
स्वप्नील कांडेकर म्हणाला, ‘अग्निहोत्र’या मालिकेत मी काम्कारतो आहे मात्र मला मालिकेपेक्षा ‘स्टेज शो’ आवडतात. कारण रसिकांचा प्रत्यक्ष प्रतिसाद मला त्याठिकाणी मिळतो. गेली १५ वर्षे मी या क्षेत्रात आहे. या लावणी महोत्सवात लावणी सम्राज्ञी भारती पुणेकर, राणी मुंबईकर यांचा ‘लावण्य जल्लोष’, शिवानी- रेश्मा- सीमा यांचा ‘शिवणीचा नाद खुळा, संगीता तळेगावकर,दर्शना मुंबईकर यांचा लावणी धमाका, कल्पना पुणेकर,अर्चना मुंबईकर यांचा ‘बारा गावच्या बारा जणी’, सुप्रिया जावळेकर ,मीनल मुंबईकर यांचा ‘इश्काचा दरबार’, भाग्यश्री नगरकर, रेश्मा करडकर यांचा ढोलकीच्या तालावर आणि अर्चना सावंत व सहकलाकारांचा ‘सख्या सजणा’ या ग्रुपने सहभाग घेतला. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, राजेंद्र बागुल, घन:शाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.