सातारा : 105 लोकांचे जीव घेतलेल्या नोटाबंदीने अखेर देशाला काय मिळाले?असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नोटाबंदी पहिल्या दिवसांपासूनच अपयशी ठरली आहे. ना काळा पैसा बाहेर आला, ना आतंकवाद थांबला. रिझर्व्ह बॅंकेचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असाही सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मोदींच्या नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बॅंकेने अहवाल प्रसिध्द केला. यामध्ये 99 टक्के नोटा परत जमा झाल्या. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय अपयशी होणार. हे विधानसभेतील भाषणातही सांगितले होते. यातून देशाचा विकासाचा दरही घटणार असे सांगितले होते. नऊ महिने मोदींनी प्रयत्न केला. नोटा बंदीनंतर काळा पैसा बाहेर येणार, आतंकवाद कमी होईल, सर्व पैसा शंभर टक्के परत येणार असे सांगितले जात होते. पण मोदींच्या या निर्णयाने धड काळा पैसा बाहेर आला नाही, ना आतंकवाद कमी झाला. उलट तीन हजार कोटी फटका रिझर्व्ह बॅंकेला बसला. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेत रांगेला उभ्या असलेल्या 105 लोकांना जीव गमवावा लागला. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असा प्रश्न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.