पुणे: शाळा-महाविद्यालये देशाची भविष्यातील पिढी घडवित असतात. त्यामुळे शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे. ही लोकसंख्या अशिक्षित राहिली तर, देशाला मोठा धोका आहे. म्हणून सरकारने शिक्षणावर विशेष लक्ष दिले पाहिजे, असे ठाम मत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी आज व्यक्त केले.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे लोकसेवा करीअर अकॅडमीचे उद्घाटन किरण ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचा गौरव करीत ठाकूर यांनी लोकसेवाला लोकमान्य संस्थेच्या वतीने 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी केली. याप्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, लोकसेवाचे अध्यक्ष दीपक पायगुडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, दीपक दराडे, प्राचार्या रश्मी वासुदेवन, संपत गाडे, भानुदास साकोरे, सचिन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फुलगाव येथे सुरु करण्यात आलेल्या लोकसेवा करीअर अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांसह सर्व प्रकारच्या नोकर भरती, सैन्य भरती, पोलीस भरती यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रात्यक्षिकांसह हे मार्गदर्शन असून याठिकाणी ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय आहे.
देशावर प्रेम करणाऱ्या समाजाची निर्मिती शिक्षणातून व्हायला हवी असे सांगून ब्रिगेडियर (निवृत्त) महाजन यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्व असल्याचे सांगितले. सर्वप्रथम देश हीच भावना लोकांमध्ये रुजायला हवी, असेही ते म्हणाले.
शिक्षणातून परिवर्तन होत असते. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना देशाला मजबूत करणारे फक्त शिक्षणच असू शकते. त्यामुळे सरकारसह सर्वांनीच गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे राजीव जगताप यांनी सांगितले.
माणूस त्याच्या कृतीने व कार्याने मोठा होतो. एकाएकी हे मोठेपण मिळत नाही. त्यामुळे आजच्या पिढीसाठी ही मोठी माणसं दीपस्तंभासारखी आहेत. आजच्या लहान मुलांनीही या माणसांप्रमाणे मोठे होण्याची स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्यासाठी कृती करावी, असे आनंद सराफ म्हणाले.