पुणे, 25 जून : प्लास्टिक बंदी कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणी विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा बडगा उगारताच महापालिका प्रशासनाने चुकीची कारवाई यापुढे होणार नाही असे स्पष्ट आश्वासन आज व्यापाऱ्यांबरोबरील चर्चेदरम्यान दिले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, चुकीची कारवाई व्यापाऱ्यांवर झाल्यास पुन्हा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करु, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी आज दिली.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने आज प्लास्टिक बंदी कायद्याच्या चुकीच्या कारवाईविरोधात आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. तसेच, महापालिकेसमोर आंदोलन केले. यादरम्यान, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि मिठाई व फरसाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक व भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्लास्टिक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या हुकुमशाही व चुकीच्या पद्धतीच्या कारवाईबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बैठकीस पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पुणे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सोमाराम राठोड, नवनाथ सोमसे, सारंग राडकर, सुनील गेहलोत, अशोक साळेकर, रविंद्र सारुक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असताना त्यांच्यावर ही कारवाई करणे योग्य नाही. खाद्य पदार्थाला प्लास्टिकचे आवरण नसेल तर, ते खराब होतात. अशा परिस्थितीत कायदाचा विपर्यास करीत अंमलबजावणी करून व्यापाऱ्यांना त्रास देणे योग्य नाही. जागेवर 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड भरणे किरकोळ व्यापाऱ्यांना शक्य नाही. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत सरसकट प्लास्टिकवर कारवाई करणे हिताचे नाही. प्लास्टिक पिशव्यांबाबत मात्र ठोस कारवाई करावी, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. त्यावर पालकमंत्री बापट यांनी याविषयी बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडतो असे आश्वासन दिले. तर, महापौर मुक्ता टिळक व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापुढे व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची चुकीची कारवाई होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले.