पुणे : राज्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आंतरखोरे जोडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावावर राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र पाणी परिषदेच्या वतीने राज्यातील आंतरखोरे पाणी वहन प्रस्तावाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात झालेल्या या सादरीकरणास परिषदेचे अध्यक्ष आणि आमदार गणपतराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव शिवाजी उपासे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांशी भागात पाण्याची कमतरता आहे. ही कमतरता पावसाच्या अभावी आहे. या भागात पाऊस पडतच नसल्यामुळे जलसंधारणाची कामे करणेही अशक्य आहे. या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्या ज्या भागात जास्तीचे पाणी आहे तेथून ते आणावे लागेल. त्यासाठी पाण्याचे आंतरखोरे वहन करावे लागेल.
पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावातील सूचना गोदावरी खोऱ्याचा आराखडा तयार करताना विचारात घ्याव्यात अशा सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी सांगितले की, परिषदेच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक आहे. मात्र दुष्काळी भागाला पाणी देताना पाणी असलेल्या भागात नव्याने पाणी प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. या प्रकल्पामुळे सध्या पाणी नसलेल्या भागातील शेतकऱ्याला पाणी देता आले पाहिजे.
या प्रस्तावातील काही बाबी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पात समाविष्ठ करता येतील का ? यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रकल्प आराखडा तयार करताना उपसा सिंचन योजनेचा समावेश नसावा. कारण उपसा सिंचन योजनेला मोठ्या प्रमाणात वीज लागते. मग ते प्रकल्प फायदेशीर ठरत नाहीत. त्याऐवजी पाण्याचे वहन करण्यासाठी बोगद्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याबाबत प्राधान्याने विचार करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केल्या.
डॉ. विखे-पाटील यांनी या प्रस्तावामुळे राज्यातील दुष्काळ कमी होईल. रोजगाराच्या संधीत आणि आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असे सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागाचे सहसचिव व्ही.एम. कुलकर्णी, गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सी.ए. बिराजदार, मुख्य अभियंता एच.एम. शिंदे, विलास राजपूत त्याचबरोबर पाणी परिषदेचे डॉ. एस. बी. वऱ्हाडे, वाय.आर. जाधव, बापूसाहेब भांगरे, व्ही.जे. आपटे, जे.टी. जंगले आदी उपस्थित होते.