‘देशविघातक संघ विचार आणि वित्तीय भांडवलशाहीतून देश रक्षणाची गरज’ : भाई वैद्य
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लक्ष्य २०१७’ कार्यकर्ता प्रशिक्षण मोहिमेचे उद्घाटन
पुणे :
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय पद्धतीचा हिटलर असल्याने संघाचा विचार हा देश विघातक आहे. जगात आणि भारतावर वित्तीय भांडवलशाही राज्य करीत आहे. त्यामुळे आपले भेद बाजूला ठेवले पाहिजेत. आत्ताची लढाई ही देशाच्या रक्षणाची लढाई आहे, ती ‘ग्लोबल’ विचार करून लोकल पातळीवर गल्ली-गल्लीत लढली पाहिजे, जातीवाद-धर्मवादाला हरवले पाहिजे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लक्ष्य’ या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण शिबीराचे भाई वैद्य यांनी उद्घाटन केले.
गंजपेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, रवींद्र माळवदकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघ निहाय ही प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. प्रारंभीचे शिबीर 23 सप्टेंबर रोजी सकाळी सुरु झाले. यावेळी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर मोहनसिंह राजपाल, प्रवक्ते अकुंश काकडे, रवींद्र माळवदकर, सुरेश बांदल, निलेश निकम, अॅड. भगवान साळुंखे, अशोक राठी, राकेश कामठे, इकबाल शेख, मनाली भिलारे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिबिराचे प्रथम सत्र होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विचार मंथनाचे स्वागत करून भाई वैद्य म्हणाले ,‘कार्यकर्त्यांनी ग्लोबल विचार करून लोकल लढाई लढावी. गल्लीत काम करण्याची अधिक गरज आहे. ‘विषमता’ आणि ‘जमात वाद’ या दोन भयंकर समस्या सध्या देशाला भेडसावत आहेत.
संघावर टीका करताना ते म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाऐवजी मनुस्मृतीवर त्यांना देश चालवायचा आहे. मुस्लिम, मागास द्वेषाचे राजकारण त्यांना करायचे आहे. प्रत्यक्षात विषमता दूर करण्याची गरज आहे.’
दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत ही प्रशिक्षण शिबिरे पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघ निहाय होणार आहे. ‘पुणे शहराचा झालेला विकास व यापुढील काळातील आव्हाने’, ‘देश आणि राज्यातील चिंताजनक राजकीय व सामाजिक स्थिती’, ‘संघटना बांधणी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी’ या मुद्यांवर या शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘कार्यकर्त्यांनी मनापासून कामे करावीत, जबाबदारी समजून घ्यावी. मतदारसंघ निहाय शिबिरे होत असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना आदान-प्रदानाची संधी मिळणार आहे. यातून ’लक्ष्य 2017 ’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे. सामान्य माणसाला त्याच्या कामासाठी उंबरठे झिजवावे लागू नयेत,’ असे प्रतिपादन खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी केले.
‘जुन्या पिढीतील नगरसेवक तेज पारवाणी यांच्या सारख्या कार्यशैलीचा आदर्श कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. कर्तृत्व आणि तुमचं कामचं शेवटपर्यंत टिकते, त्यामुळे चांगल्या विधायक कामावर भर द्यावा. भारत हा विकसनशील देश आहे, विकसित नाही, त्यामुळे सगळेच प्रश्न सुटतील असे नाही, मात्र तसा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी पक्षालाही काही मुद्दे सुचवले पाहिजेत, सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. आपल्या कामाने पक्षाची ओळख निर्माण केली पाहिजे. या शिबिराच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि भावी नगरसेवक यांच्याशी संवाद साधता आला हे महत्वाचे आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांनी यावेळी केले.