पुणे : वीज ही आता मुलभूत गरज झालेली आहे. त्यामुळे सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर व सकारात्मक राहा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी बुधवारी (दि.20) केले.
महावितरणमध्ये विविध पदांसाठी नुकतीच भरती प्रक्रिया झाली. पुणे परिमंडलात रुजू होण्यासाठी निवड झालेल्या 27 सहाय्यक अभियंता आणि 62 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महावितरणमध्ये नव्यानेच रुजू होणार्या या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ सहाय्यकांशी रास्तापेठ येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी संवाद साधला व शुभेच्छापर मार्गदर्शन केले.
श्री. मुंडे म्हणाले, की विजेच्या उपलब्धतेचा पूर्वीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. त्यामुळे महावितरणसारख्या सेवाक्षेत्रातील महत्वाच्या सार्वजनिक कंपनीत काम करताना ग्रामीण व शहरी भागातील वीजग्राहकांना उत्कृष्ट दर्जाची सेवा देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सकारात्मक ग्राहकसेवेला प्रतिसादही सकारात्मक मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नियुक्तीपत्र मिळालेल्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ सहाय्यकांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्ग पवार, दिनेश अग्रवाल, दीपक सोनोने, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत आदींची उपस्थिती होती.