पुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षण आणि गुरू हा पाया होता, तोपर्यंत समाज अनेक अर्थांनी विकसित होता. परकीय आक्रमक आणि नंतर ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे या ज्ञानपरंपरेचे खच्चीकरण केले. त्या मानसिक गुलामगिरीचे जोखड दूर करा आणि शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान बाळगा, असे आवाहन राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. समाज युवा पिढीत विकासाची, प्रगतीची स्वप्ने पाहतो. ती युवा पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. त्यामुळे शिक्षक हा घटक समाजाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा शिक्षक आघाडी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार आणि शिक्षणरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. शैलेंद्र देवळाणकर बोलत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला अध्यक्ष केतकी कुलकर्णी, सरचिटणीस वृषाली शेकदार, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, निमंत्रक स्वाती बहुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. रत्नदीप जोशी, डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. रोहिणी जोशी, डॉ. श्रीपाद उंडे, डॉ. छाया कुलकर्णी-अनासपुरे आणि प्रा. वाणी लातूरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर रायसोनी कालेजचे कुलगुरू डॉ. रवींद्र खराडकर यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
संघातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील सादरीकरणांचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख आणि डॉ. सुलभा विधाते यांनी केले. स्पर्धेत होमी भाभा गट (प्रथम क्रमांक), डॉ. राधाकृष्णन गट (द्वितीय क्रमांक) आणि भास्कराचार्य तसेच रामानुजन गट (तृतीय क्रमांक विभागून) यांना पारितोषिके देण्यात आली. डॉ. देवळाणकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऋणानुबंध आणि सर्वार्थ या दोन उपक्रमांच्या पोस्टर आणि पोर्टलचे प्रकाशनही यावेळी झाले. या उपक्रमांची माहिती स्मिता कुलकर्णी आणि श्रृती कुलकर्णी यांनी दिली.
डॉ. देवळाणकर म्हणाले, आपली ज्ञानपरंपरा नालंदा गुरुकुलाची आहे. जिथे देशातलेच नव्हे तर विदेशी विद्यार्थीही ज्ञानार्जनासाठी येत असत. ब्रिटिशांनी आपल्यावर मानसिक गुलामगिरी लादली. शिक्षकी पेशाचे अवमूल्यन केले. आपले ते सारे कनिष्ठ, दुय्यम हे बिंबवले. शिक्षकांची खिल्ली उडवली. त्यामुळे आपल्याकडे शिक्षक आणि शिक्षण दोन्ही व्यवस्थांवर विश्वास राहिला नाही. जगातील ४४ देशांत शिक्षकी पेशा हा व्हीव्हीआयपी या विभागात असताना, आपल्याकडे मात्र हे क्षेत्र सर्वांत बाधित झाले. महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकसंख्येपैकी तब्बल ९ कोटी लोक या ना त्या पद्धतीने शिक्षणाशी निगडीत आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, पुढच्या २५ वर्षांत कठोर आत्मपरीक्षण करून शिक्षण आणि शिक्षक हे दोन्ही घटक पुनर्वैभव कसे प्राप्त करतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांनी देशात पूर्ण केले पाहिजे. आधुनिक काळात कौशल्याधिष्ठित शिक्षणाची अपरिहार्यता ओळखून, तसे बदल आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आले आहेत आणि कौशल्यशिक्षण केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मानसिकता बदलून आपल्या पेशाचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
निखिल लातूरकर यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आंधळा वापर न करता, पूरक वापर करण्याचा सल्ला दिला. नव्याचा ध्यास, नवे शिकण्याची जिज्ञासा आणि कालबाह्य घटकांचा त्याग, यांचा अवलंब करण्याविषयी रत्नदीप जोशी यांनी मार्गदर्शन केले. मंदार रेडे यांनी संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. ब्राह्मण समाजाचे संघटन आणि प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व, यांना अग्रक्रम असल्याचे ते म्हणाले. केतकी कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, स्वाती बहुलेकर यांनीही मनोगत मांडले. निर्मल पंडित व गायत्री वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले.

