आळंदीत राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; आंतरराष्ट्रीय पंच सोपान कटके यांचा विशेष सत्कार
पुणे :
महाराष्ट्रातील वुशू खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च कामगिरी करावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित 23 व्या सब-ज्युनियर आणि 24 व्या ज्युनियर राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मोहोळ यांनी डिजिटल माध्यमातून खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
व्यस्त वेळापत्रकातून स्पर्धेला शुभेच्छा देताना मोहोळ यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
‘महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळलाच पाहिजे’
“ऑलिम्पिक असो, एशियन गेम्स असोत किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप; महाराष्ट्राचा खेळाडू या सर्वोच्च व्यासपीठावर खेळलाच पाहिजे,” असा निर्धार महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.
खेळाडूंना दर्जेदार स्पर्धा, प्रशिक्षण, मार्गदर्शन, पंचगिरीचे प्रशिक्षण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. समन्वयक सोपानराव कटके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वुशू खेळ अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असल्याचेही खर्डेकर यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय पंच सोपान कटके यांचा विशेष सन्मान
उद्घाटन समारंभात वुशू फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव, आंतरराष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे समन्वयक सोपानराव कटके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी एशियन गेम्ससाठी भारतातून निवड झालेल्या वुशू आंतरराष्ट्रीय पंचांमध्ये कटके यांचा समावेश झाला आहे. त्यांनी यापूर्वी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आशियाई स्पर्धा, साऊथ एशियन गेम्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
खेळाडूंसोबतच जागतिक दर्जाचे पंच घडविण्याच्या दृष्टीनेही महाराष्ट्रात काम होत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे ‘कबीर’, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या महासचिव ललिता कटके, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त संदीप शेलार, प्रतीक्षा शिंदे आणि तृप्ती चांदवडकर, तसेच अशोकराव उनेरगरकर, संजय घुंडरे पाटील, राजन परदेशी, मनोज नायर, गोकुळ शेलार, मनोज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
या राज्यस्तरीय स्पर्धेतून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धांसाठी संधी दिली जाणार असल्याचे महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या महासचिव ललिता कटके यांनी सांगितले.
“ही स्पर्धा केवळ पदकांसाठीची लढत नाही, तर महाराष्ट्रातील भविष्यातील आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक खेळाडू घडविण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेले सब-ज्युनियर आणि ज्युनियर गटातील खेळाडू ताऊलू आणि सान्सू या विविध प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध करत आहेत.
“महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळलाच पाहिजे” हा संघटनेचा मुख्य संकल्प असल्याचे सोपानराव कटके यांनी स्पष्ट केले.

