पुणे-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 1997 नंतर पहिल्यांदाच एमपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
एमपीएससी प्रवेशपत्रावर ज्यांची सही असते, त्यांच्याकडूनच पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एक उदाहरण समोर आले आहे. नंदुरबारमधील एका तरुणीला औषध निरीक्षक बनवण्यासाठी तिचे वडील एका अकॅडमीत गेले. त्यांनी पेपरची मागणी केली असता, अकॅडमी चालकाने मुंबईतील एमपीएससी आयोगाच्या पार्किंगमधून पेपर विकत आणल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह इतर परीक्षांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. पुढील परीक्षाही हीच यंत्रणा घेणार असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत आणि अभ्यास करताना त्यांना भीती वाटत आहे. केवळ औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटलेला नसून, अचानक इतर परीक्षांचे मेरिट वाढले आहे. एकाच ठिकाणचे अनेक विद्यार्थी पास होणे ही बाब चिंताजनक असल्याचे मत स्पर्धा परीक्षा क्लासेसचे शिक्षक निलेश निंबाळकर यांनी व्यक्त केले.
निंबाळकर यांनी मागणी केली की, एमपीएससी परीक्षा घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. त्यांनी वापरलेल्या मोबाईलची माहिती काढून चौकशी करावी आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जावी. परीक्षा पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या तक्रारदारांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष, सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून त्यांची चौकशी करावी. तरच विद्यार्थ्यांचा परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. आता एमपीएससीमध्ये प्रथमच लिखित स्वरूपात परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्यात दिलेल्या गुणांमध्ये संशयास्पद तफावत आहे. वस्तुनिष्ठ मूल्यांकन जाहीर करावे, प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा निर्माण करावी, तसेच प्रश्नपत्रिकांच्या गुणवत्तेसाठी बहुस्तरीय तपासणी व्यवस्था असावी.
यावेळी तज्ञांची निवड आणि प्रश्नांच्या स्त्रोतामध्ये पारदर्शकता आणावी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू करावे, स्पोर्ट्स, हॅंडीकॅप, टायपिंग व इतर विशेष कोट्यांचे पुनरावलोकन करावे, परीक्षा गैरप्रकारांच्या चौकशीसाठी ठराविक मुदतीत चौकशी यंत्रणा स्थापन करावी, आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता असावी, परीक्षा केंद्रांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सुविधांचे पुनरावलोकन करावे, परीक्षा केंद्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम असावी, बैठक व्यवस्था पारदर्शक आणि विद्यार्थ्यांना अनुकूल असावी, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांकन कार्यपद्धती स्पष्ट करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी डॉ. सचिन भस्के, धनंजय मते, सचिन ढवळे, यशवंत सोलटे, दिप्ती नायर आणि संदीप जाधव उपस्थित होते.

