पुणे : किंग्ज इंडियन चेस क्लब (KICC) आणि बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘व्हिझ-किड वन-डे रॅपिड चेस टूर्नामेंट’मध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील २५० हून अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला. रविवारी (दि. ३०) वाकड येथील युरो स्कूलमध्ये ही स्पर्धा झाली.
स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी ६० हजार रुपयांचे एकूण पारितोषिक ठेवण्यात आले होते. ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, ३५ वर्षांवरील तसेच मुलींसाठी विशेष अशा पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
११ वर्षांखालील खुल्या गटात आयुष जगतापने प्रथम, तीर्थ कोद्रा याने द्वितीय, तर विश्वजा देशमुखने तृतीय क्रमांक मिळविला. १३ वर्षांखालील गटात एएफएम कविश लिमये प्रथम, विभव गुप्ता द्वितीय आणि विहान शाह तृतीय ठरले. १५ वर्षांखालील गटात चंद्रमौली जयकृष्णनने विजेतेपद पटकावले. डब्ल्यूसीएम अन्वी हिंगे द्वितीय तर प्रथमेश सुतार तृतीय आला.
३५ वर्षांवरील खुल्या गटात एफएम गौरव बाकलीवालने प्रथम क्रमांक मिळविला. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी द्वितीय आणि राहुल वर्मा तृतीय ठरले. मुली व महिलांच्या विशेष गटात ११ वर्षांखाली शाल्वी चस्कर, १३ वर्षांखाली अन्वी शेळके, १५ वर्षांखाली समायरा राय आणि ३५ वर्षांवरील गटात आशा ठोंबरे यांनी विजेतेपद मिळविले.
स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये राजस्थान राज्याचे माजी बुद्धिबळ विजेते तसेच जेईई १९९४ मध्ये अखिल भारतीय २२८२ वा क्रमांक मिळविलेले गौरव बाकलीवाल यांचा समावेश होता. बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक व संचालक वैभव बाकलीवाल यांनी विजेत्यांचा गौरव केला. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांसोबत कोडी व बुद्धिबळाशी संबंधित प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून संवाद साधला. दोन्ही बाकलीवाल बंधू फिडे मानांकित बुद्धिबळपटू असून, बुद्धिबळामुळे विकसित होणारी एकाग्रता, संयम, दूरदृष्टी आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतही उपयुक्त ठरते, असा आयोजकांचा विश्वास आहे.
स्पर्धा संचालक व बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल म्हणाले, “या स्पर्धेच्या माध्यमातून युवा बुद्धिमत्तेला एकत्र आणता आल्याचा आनंद आहे. बुद्धिबळामुळे एकाग्रता वाढते आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते. सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन आणि विजेत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”
या स्पर्धेमुळे पुण्यातील विद्यार्थी व युवा बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. तसेच शिस्त, रणनीती, खिलाडूवृत्ती आणि निरोगी स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

