2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक उपस्थित, कडक सुरक्षा आणि थेट CCTV देखरेख
नवी दिल्ली, दि. 30 : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) तर्फे रविवारी देशभरात NEET-PG 2026 परीक्षा कडक सुरक्षा आणि थेट देखरेखीखाली घेण्यात आली. देशातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, जयपूरमधील दोन परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे 2,445 उमेदवारांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. या उमेदवारांची पुनर्परीक्षा 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जयपूरमध्ये घेण्यात येणार आहे.
देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 339 शहरांमध्ये 1,111 परीक्षा केंद्रांवर 2,73,096 उमेदवारांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी 2,65,980 उमेदवार उपस्थित राहिले, तर सुमारे 2,63,535 उमेदवारांची परीक्षा निर्विघ्नपणे पूर्ण झाली.
2,527 स्वतंत्र निरीक्षक, 700 जणांची भरारी पथके
परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली होती. देशभरात 2,527 प्राध्यापकांची स्वतंत्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अधिष्ठाता, संचालक, वैद्यकीय अधीक्षक आणि वरिष्ठ प्राध्यापकांसह 700 हून अधिक सदस्यांची भरारी पथके तैनात करण्यात आली होती.
देशभरातील परीक्षा केंद्रांशी समन्वय आणि देखरेखीसाठी NBEMSची 16 प्रादेशिक नियंत्रण केंद्रे कार्यरत होती.
द्वारकातील कमांड सेंटरमधून थेट CCTV देखरेख
परीक्षा केंद्रांवरील CCTVचे थेट प्रक्षेपण दिल्लीतील द्वारका येथील NBEMS मुख्यालयातील कमांड सेंटरमधून पाहण्यात आले. यासाठी NBEMS आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 190 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते.
NBEMSसह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) आणि TCSच्या अधिकाऱ्यांनीही परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवले.
तोतयेगिरी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित उमेदवार प्रमाणीकरण करण्यात आले.
जयपूरमध्ये अंतर्गत वीजपुरवठ्याचा तांत्रिक बिघाड
जयपूरमधील iON Digital Zone, iDZ सीतापुरा (TC क्रमांक 41682 आणि 41683) या दोन केंद्रांवर अंतर्गत वीजपुरवठ्याशी संबंधित तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे 2,445 उमेदवारांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही.
या प्रकाराबद्दल NBEMSने उमेदवारांची दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित विद्यार्थ्यांना इतर उमेदवारांप्रमाणेच निष्पक्षपणे परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या 2,445 उमेदवारांची पुनर्परीक्षा शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता जयपूर येथे होणार आहे. परीक्षा केंद्र आणि इतर सूचना संबंधित उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहेत.

