पुणे: समाविष्ट गावांतील नागरिकांवर लादण्यात आलेल्या करवाढीचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे गटनेते काकासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महापालिका सभागृहात सर्व विरोधी पक्षांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन आणि सत्ताधारी केवळ आश्वासने देत असून प्रत्यक्ष निर्णय घेण्यास मात्र टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राज्यात आणि महापालिकेत महायुती सरकार सत्तेत असताना समाविष्ट गावांच्या करप्रश्नावर निर्णय घेण्यास एवढा विलंब का होत आहे? नागरिकांकडून करवसुली करण्यासाठी प्रशासनाची घाई असते, मग त्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यासाठी एवढी दिरंगाई का? असा थेट सवाल काकासाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला.
गत १६ मार्च रोजी महापौरांसोबत झालेल्या बैठकीत समाविष्ट गावांतील सर्व सभासदांना विश्वासात घेऊन करप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल पाच महिने उलटूनही एकही बैठक झालेली नाही किंवा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दिलेली आश्वासने केवळ वेळकाढूपणासाठी होती का, असा सवालही चव्हाण यांनी केला.
याचबरोबर, सभागृह नेत्यांनी पहिल्याच मुख्य सभेत शहराच्या विकासासाठी नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा न टाकता महापालिकेच्या उत्पन्नाचे पर्यायी स्रोत बळकट करण्यावर भर देण्याचे स्पष्ट केले होते. समाविष्ट गावांच्या करवाढीचा प्रश्न आगामी अर्थसंकल्पापूर्वी विशेष सभा घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, अर्थसंकल्प सादर होऊनही अद्याप विशेष सभा घेण्यात आलेली नाही.
समाविष्ट गावांतील नागरिकांवर अन्यायकारक करवाढीचा भार टाकण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे आणि उपलब्ध नागरी सुविधांकडे महापालिकेने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. कर आकारणीच्या बाबतीत शहरातील इतर भागांप्रमाणे सुविधा आणि सेवा देण्याची जबाबदारीही महापालिकेची आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
प्रशासनाच्या या चालढकल कारभाराचा निषेध करत, समाविष्ट गावांच्या करप्रश्नावर येत्या एका महिन्याच्या आत विशेष सभा घेऊन निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी काकासाहेब चव्हाण यांनी केली. नागरिकांवर अन्यायकारक करवाढ लादण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन महापालिकेत आणि सभागृहाबाहेरही संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष नेते निलेश निकम, गटनेते चंदू कदम, गटनेते नितीन गावडे, अनिता इंगळे यांच्यासह सर्व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

