मुंबई/नाशिक, दि. २४ ऑगस्ट २६
संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख आशुतोष शिर्के आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजाराम पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम, प्रभावी आणि जनतेशी थेट जोडणारे करण्याच्या उद्देशाने या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना काँग्रेसची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापन तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी संवाद निर्माण करून पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर या प्रशिक्षण शिबिरात विशेष भर देण्यात येणार आहे.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसप्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संघटन सृजन अभियानाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांसाठी हे १० दिवसांचे शिबिर आहे. या दहा दिवसात काँग्रेसचे वरिष्ठ नेते,विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या ९ व्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल मार्गदर्शन करणार आहेत. तर समारोपासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी येणार आहेत. अशा प्रकारचे शिबिरे काँग्रेस पक्षात सातत्याने होत असतात.या शिबिरात विचारमंथन, कार्यानुभवही असणार आहे. राहुल गांधी जी भूमिका मांडत आहेत ती भूमिका जिल्हाध्यक्ष पुढे घेऊन जातील. नाशिकमध्ये हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे.
महिला विधेयकावर भाजपाकडून बुद्धीभेद.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. या कार्यक्रमात राहुल गांधी हे सर्व जाती धर्माच्या महिलांबद्दल बोलले, त्यांच्या व्यथा मांडल्या पण भाजपा मात्र त्याला धार्मिक रंग देत आहे. महिला विधेयकाबद्दल भाजपाच बुद्धीभेद करत आहे. २०२३ रोजीच महिला विधेयक संसदेत मंजूर झालेले आहे. पण भाजपाला महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक आणायचे आहे. देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.
एसआयआरचे काम घाईगडबडीत..
एसआयआरचे काम घाईगडबडीत सुरु आहे.१७ ऑगस्टची मुद्दत ही आणखी दोन तीन महिने ठेवली असती तर काम सुरुळीत झाले असते. भाजपा मतचोरी करत होते पण आता तर मतदार याद्याही चोरत आहेत, हा प्रकार हुकूमशाहीकडे घेऊन जाणारा आहे. नागपुरमधील हैदराबाद हाऊसमध्ये बीएलओ यांना बोलावण्यात आले. हे हैदराबाद हाऊस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व कार्यालय आहे, या ठिकाणी बीएलओ यांनी मॅपिंगचे सर्व दस्ताऐवज घेऊन बोलावून घेतले गेले, अशाच पद्धतीने त्यांना सुप्रीम कोर्ट व हाय कोर्टही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालवायचे आहे का, असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला.

