ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालकांचाही विचार करा; पोलीस आयुक्तांनी सर्व घटकांशी संवाद साधावा — जागृत पुणेकरांची अपेक्षा
पुणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अविभाज्य घटक असले, तरी उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालके, नुकत्याच प्रसूत झालेल्या माता तसेच रुग्णालये आणि दवाखान्यांतील रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत निर्धारित मर्यादांचे काटेकोर पालन व्हावे आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे, अशी भूमिका जागृत पुणेकरांकडून मांडली जात आहे.
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती . गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणारे स्पीकर व ध्वनिक्षेपक, त्यावरील निर्बंध, डेसिबल मर्यादा आणि ध्वनीव्यवस्थेसाठी देण्यात येणाऱ्या परवानग्या या विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने उत्सवाच्या उत्साहावर अनावश्यक निर्बंध लादले जाऊ नयेत, अशी भूमिका काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरही काही कार्यकर्त्यांकडून ‘स्पीकरवर बंदी मान्य नाही’ अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.
मात्र, गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना आणि अडचणी समजून घेतल्या जातात, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचा थेट परिणाम होणाऱ्या नागरिकांचे म्हणणेही ऐकून घेणे आवश्यक असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, रुग्णालयांचे प्रतिनिधी, विविध आजारांनी त्रस्त नागरिक, नुकत्याच प्रसूत झालेल्या महिला तसेच लहान बालके असणाऱ्या मातांशीही प्रशासन आणि पोलिसांनी संवाद साधावा. हे नागरिक संघटित नसल्यामुळे त्यांचा आवाज निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षित होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी होत आहे.
उत्सवाला विरोध नाही; अतिरेकाला, धिंगाण्याला विरोध आहे, अशी या नागरिकांची भूमिका आहे. भक्तिभाव, मांगल्य आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत उत्सव साजरा व्हावा. मात्र उत्सवाच्या नावाखाली अनियंत्रित ध्वनी प्रदूषण किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे प्रकार खपवून घेतले जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्साहात साजरी व्हावी; मात्र त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा अधिकारही जपला जावा. उत्सवाचा आनंद आणि नागरिकांचे आरोग्य यांचा समतोल राखण्याची जबाबदारी मंडळे, आयोजक, पोलीस आणि प्रशासन या सर्वांचीच आहे, अशी भूमिका पुणेकरांकडून मांडली जात आहे.

