आरटीओची भरारी पथके करणार तपासणी; नोटिशीनंतरही मराठी न शिकल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित
मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्याच्या निर्णयाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. गुरुवार, २० ऑगस्टपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
परिवहन विभागाच्या आरटीओ भरारी पथकांकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान चालकाला प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेले मराठी बोलता आणि समजता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे.
मराठीचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित चालकावर तातडीने कठोर कारवाई करण्याऐवजी प्रथम नोटीस देऊन मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही चालकाने नियमाचे पालन न केल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. वारंवार नियमभंग झाल्यास पुढील टप्प्यात परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
२० ऑगस्टपासून राज्यभर मोहीम
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओच्या भरारी पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांची अचानक तपासणी केली जाणार आहे. मराठी भाषेच्या ज्ञानाची पडताळणी करताना पारदर्शकता राहावी यासाठी काही तपासणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. नवीन ऑटो-टॅक्सी बॅज देतानाच्या मराठी भाषा पडताळणी प्रक्रियेचे २० ऑगस्टपासून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असल्याचेही वृत्त आहे.
१.६५ लाखांहून अधिक चालकांनी घेतले प्रशिक्षण
राज्यात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी गेल्या काही महिन्यांपासून मूलभूत मराठी भाषा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन मंत्र्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार चालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे.
राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. चालक आणि प्रवाशांमध्ये सहज संवाद व्हावा तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
‘रोजगार हिरावून घेण्याचा उद्देश नाही’
“कोणाचाही रोजगार बुडावा, अशी सरकारची भूमिका नाही. चालकांना आधी मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. मात्र महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे,” अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमधील तरतुदींनुसार रिक्षा, टॅक्सी तसेच संबंधित व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यासाठी आता राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

