खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे १०० टक्के; मुठा नदीतील विसर्ग सायंकाळी ६ वाजता ९,४१६ क्युसेक्सवर
पुणे, दि. २ ऑगस्ट : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये एकूण २८.९० टीएमसी म्हणजेच ९९.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणसाखळीत २५.६४ टीएमसी म्हणजे ८७.९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा तब्बल ३.२६ टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, टेमघर धरणातील पाणीसाठा ९३.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ८३० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.
खडकवासला धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात दिवसभरात २ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत ६६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ३४० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आतापर्यंत एकूण ६.५५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
पानशेत धरणात १०.६५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात १९५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. पानशेत धरणाच्या जलविद्युत गृहातून ६०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सांडव्यावरून सायंकाळी सहा वाजता सुरू असलेला ५,६४२ क्युसेक्स विसर्ग कमी करून १,७१३ क्युसेक्स करण्यात आला.
वरसगाव धरणात १२.८२ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात २७८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी पाच वाजता सांडव्यावरून ७,१९२ क्युसेक्स आणि जलविद्युत गृहातून ६०० क्युसेक्स विसर्ग सुरू होता.
टेमघर धरणात ३.४६ टीएमसी म्हणजे ९३.२८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात १७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. धरण क्षेत्रात दिवसभरात २२ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत २,५७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत घट होत असल्याने मुठा नदीतील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता २४,२७७ क्युसेक्स असलेला विसर्ग प्रथम १८,४१४ क्युसेक्स आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ९,४१६ क्युसेक्स करण्यात आला.
पावसाचे प्रमाण आणि धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रातील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.

